आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

महिलांच्या आरोग्याचा प्रश्न बऱ्याचदा मासिक पाळीशी निगडीत असतो. त्यामुळे या काळात वापरण्यात येणारे सॅनिटरी नॅपकीन स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असण्यासोबतच महिलांच्या आरोग्यासाठी योग्य असणे आवश्यक असते. दिल्लीच्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही गोष्टींची पूर्तता करणारे सॅनिटरी नॅपकीन्स केळ्याच्या तंतूपासून तयार केले आहेत.

बाजारात उपलब्ध असणारे बहुतांश सॅनिटरी नॅपकीन हे सिंथेटिक आणि प्लास्टिकपासून बनलेले असतात. त्यामुळे बरेचदा त्याच्या वापरानंतर अंगावर पुरळ येतात. मात्र, आर्चित अग्रवल आणि हॅरी सेहरावत यांनी तयार केलेले नॅपकीन महिलांच्या आरोग्याचा विचार करुनच तयार करण्यात आले आहेत. हे दोन्ही विद्यार्थी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांला असून दिल्ली आयआयटीशी निगडीत एका नव्या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी हे संशोधन केले आहे. महिलांच्या कल्याणासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था नियमितपणे ग्रामीण आणि निमशहरी भागात सॅनिटरी नॅपकीन वितरीत करतात, पण बरेचदा पर्यावरणाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. कारण वापरलेले नॅपकीन उघडय़ावर, पाण्याच्या डबक्यात, शौचालयात टाकले जातात. बरेचदा ते जाळले जातात किंवा जमिनीत गाडले जातात. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले नॅपकीन पर्यावरणपूरक असण्याबरोबरच ते पूनर्वापर करता येण्यासारखे आहेत. ते धुतल्यानंतर पुन्हा वापरता येतात.

विल्हेवाटीचे प्रमाण कमी

मेनस्ट्रल हायजीन अलायन्स ऑफ इंडियाच्या अभ्यासानुसार, भारतात मासिक पाळी येणाऱ्या स्त्रियांच्या संख्येपैकी ३६ टक्के स्त्रियाच विल्हेवाट लावता येऊ शकणारे सॅनिटरी नॅपकीन वापरतात. भारतात दरवर्षी १२३० कोटी वापरलेल्या नॅपकीनपैकी बहुतांश नॅपकीनचे जैववर्गीकरण होऊ शकत नाही. जे विघटित होण्यासाठी पाच ते सहा दशके लागतात. त्यामुळे पर्यावरणााल हानी पोहोचते.