नवी दिल्ली : मोबाइल फोन लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण सकाळी उठल्यानंतर लगेचच मोबाइल हातात घेतात आणि रात्री मोबाइल पाहतच झोपतात. एवढेच नव्हे, काहींना तर त्याची एवढी सवय झाली आहे की, ते स्वच्छतागृहातही मोबाइल घेऊन जातात; पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे, हे संशोधनात स्पष्ट झाले आहे. पचनासंबंधी समस्येमुळे मूळव्याध होते; परंतु स्वच्छतागृहात मोबाइलचा वापर हेसुद्धा या व्याधीचे एक प्रमुख कारण ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्यानंतरही त्यामध्ये किटाणू कसे असू शकतात, असे अनेकांना वाटते; पण, मोबाइलमुळे स्वच्छतागृहात अधिक वेळ जातो. या दरम्यान किटाणू मोबाइलला चिकटतात. त्यांचा संसर्ग झाल्यानंतर पोटदुखी आणि युरिनल ट्रक्स इन्फेक्शन यांसारखे आजार होतात. विशेष म्हणजे मोबाइल घेऊन स्वच्छतागृहात गेल्यानंतर त्याच्यासोबत असंख्य किटाणू आणि जिवाणू येतात आणि ते घरात पसरतात. हे संपूर्ण कुटुंबासाठी धोकादायक ठरते. स्वच्छतागृहातील वस्तूंवर ई-कोली हे जिवाणू असतात. ते फक्त आतडय़ांसंबधी आजारांचेच कारण ठरत नसून ते अतिसारासारख्या आजारालाही आमंत्रण देणारे ठरतात, असेही संशोधनातून स्पष्ट झाले आहे.