Why more young Indians are buying insurance: पूर्वी विमा म्हणजे वयस्कर व्यक्तींची गरज अशी धारणा होती, पण हल्ली ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. विशेष म्हणजे आता अधिकाधिक तरुण भारतीय विमा खरेदी करत आहेत. ही बदललेली जाणीव अचानक आलेली नाही. यामागे रुग्णालय खर्च, नोकरीतील अस्थिरता, कोविड-१९ चा धक्का आणि सुरक्षिततेच्या गरजेची जाणीव अशी कारणे आहेत. आजच्या तरुण प्रोफेशनल्समध्ये “कॅशलेस क्लेम”, “टर्म प्लॅन” यांसारख्या गोष्टींच्या चर्चा वीकेंड प्लॅन्स ऐवजी अधिक होताना दिसत आहेत.
करोना काळाने संपूर्ण जगाला धक्का दिला. अनेक कुटुंबांनी वैद्यकीय खर्चाचा मोठा फटका बसल्याचे अनुभवले. यामुळेच आजच्या तरुण पिढीला आरोग्य विमा आणि जीवन विम्याचं महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे उमगलं. २०१५ मध्ये नॅट हेल्थच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे ७० टक्के लोकांकडे कोणताही आरोग्यविमा नव्हता. विशेषतः २४ ते ३० वयोगटातील ७५ टक्के लोक केवळ नोकरीतून मिळणाऱ्या विम्यावर अवलंबून होते. मात्र, आता हे प्रमाण बदलत आहे. २०२५ मध्ये बजाज आलियान्झ लाईफ इन्शुरन्स आणि नील्सन आयक्यूच्या सर्वेक्षणात आढळले की, विमा खरेदी करणाऱ्यांचं सरासरी वय ३३ वरून २८ वर्षांवर आलं आहे. या बदलातून तरुणांमध्ये आर्थिक सुरक्षेबद्दल वाढती जाणीव दिसून येते.
एलिना अमोलिक (२५) ही २०१९ मध्ये मलेरियामुळे रुग्णालयात दाखल झाली होती. “तेव्हाच समजलं की उपचार किती खर्चिक असतात,” असं ती सांगते. तिने नंतर स्वतंत्र आरोग्यविमा घेतला. तिच्या मित्रपरिवारातही आता कंपनीच्या पॉलिसीव्यतिरिक्त वैयक्तिक विमा घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. एम देसाई (३१), मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. “विमा म्हणजे माझ्या कुटुंबासाठी सुरक्षिततेचं जाळं आहे,” असं ते सांगतात. “सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसी समजून घेणं आणि बारकाईने वाचन करणं,” असा त्यांचा सल्ला आहे.
विमा किती असावा?
Germinate Investor Services चे सीईओ संतोष जोसेफ सांगतात, “जीवनविमा म्हणजे तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट रक्कम असावी.” उदाहरणार्थ, तुमचं उत्पन्न १० लाख रुपये असेल, तर विमा रक्कम १ कोटी ते १.५ कोटीदरम्यान असावी. खूप कमी कव्हरेज घेतल्यास कुटुंब सुरक्षित राहणार नाही आणि खूप अधिक घेतल्यास प्रीमियम नाहक वाढतो.
विमा कंपन्या बदलता येतात का?
आरोग्यविम्याच्या बाबतीत संतोष सांगतात, “जर एखाद्या कंपनीत काही वर्षे पॉलिसी घेतली असेल आणि दुसरीकडे चांगली सुविधा मिळत असेल, तर रिन्युअलवेळी कंपनी बदलता येते. आधीचा वेटिंग पीरियडही ट्रान्सफर होतो. पण, जीवनविम्याच्या बाबतीत नवीन पॉलिसी घ्यावी लागते. दर चार ते पाच वर्षांनी एकदा गरजांनुसार तुलना करणं शहाणपणाचं ठरतं.”
कंपनीचा विमा का अपुरा ठरतो?
कंपनीकडून मिळणाऱ्या विम्याची मर्यादा असते. गौरी सांगतात, “तरुणांनी Comprehensive Health Insurance निवडावा. ज्यात ICU/रूम भाडं मर्यादा नसते, गंभीर आजारासाठी कव्हर आणि वेगवान क्लेम प्रोसेस असतो.”
चांगल्या पॉलिसीसाठी तपासायच्या गोष्टी
जीवनविमा:
- फक्त टर्म प्लॅन घ्या.
- रक्कम उत्पन्नाच्या १०-१५ पट असावी.
- अपघात/गंभीर आजारासाठी Riders जोडा.
आरोग्यविमा:
- हॉस्पिटल रूमसाठी मर्यादा नसावी.
- Sum Reinstatement, No Claim Bonus बघा.
- Cashless नेटवर्क, वेटिंग पीरियड, क्लेम रेशो तपासा.
आजच्या तरुण पिढीची ही जागरूकता म्हणजे केवळ आर्थिक ज्ञान नाही, तर जबाबदारीची जाणीव आहे. विमा आता केवळ टॅक्स वाचवण्यासाठी नसून, भविष्यासाठी घेतलेलं सजग पाऊल आहे.