नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते, ते काही चुकीचे नाही. ओला नारळ, सुखे खोबरे, नारळपाणी, नारळाचे दूध, नारळाचे तेल आणि तूप उपयुक्त आहे. एवढेच नव्हे तर नारळाची शेंडी आणि करवंटीसुद्धा उपयोगी आहे. अंगाची आग होणे, संडास किंवा थुंकीतून रक्त पडत असेल तर ओले खोबरे, काळा मनुका किंवा खडीसाखरेसोबत चघळून खावे. गळय़ात खवखवून खोकला येत असेल किंवा तहानेने घशाला शोष पडत असेल तर ओला नारळ चावून खावा. खोबरे हे बलवर्धन आहे. अशक्त माणसांनी खडीसाखरेसोबत खावे. (त्याने थोडा मलावरोध होतो. त्यामुळे औषधी उपयोग करताना काळय़ा मनुकांबरोबर खावे.) पुरुषांमधील वंध्यत्वात शुक्राणूवृद्धीसाठी हा प्रयोग अवश्य करून पाहावा. पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते.