|| डॉ. दीपा दिनेश जोशी पावसाची रिमझिम, हवेतील गारवा, सर्वत्र दाट हिरवळ असा हा सुंदर पावसाळा ऋतू मुलांसह सर्वाना आतुरतेने वाट पाहायला लावतो. त्याचप्रमाणे या ऋतूत दूषित अन्न आणि पाण्यातून अनेक प्रकारचे साथीचे आजारही डोके वर काढतात. उदा. कावीळ, विषमज्वर, अतिसार या रोगांमुळे मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जगभरातील पाच वर्षांखालील १५ लाख बालकांचा मृत्यू अतिसारामुळे होतो. अतिसार रोगाची प्रमुख कारणे - विषाणू- रोटावायरस, अँटरोवायरस अॅडेनोवायरस जिवाणू - इ कोलाय, व्हिब्रिओ कॉलरा, इशगेला परजीवी- अमिबियासीस, जिआर्डीआसीस प्रमुख लक्षणे सर्दी, खोकला, ताप मळमळ, उलटय़ा त्यानंतर वारंवार पाण्यासारखे पातळ जुलाब जुलाबाचे प्रमाण वाढत जाते तसे निर्जलीकरणास सुरुवात होते. प्राथमिक अवस्थेत- खूप तहान लागते लघवीचे प्रमाण कमी होते तोंड, जीभ कोरडी पडते डोळे, टाळू खोल जाते त्वचेवर सुरकुत्या पडतात मूल रडताना अश्रूंचे प्रमाण कमी होते. पुढील अवस्थेत- बाळ मलूल किंवा निस्तेज होते. बाळ जास्त झोपते अथवा बेशुद्ध होते. अन्नपाण्यास नकार देते. बाळाचे वजन कमी होते. निर्जलीकरणाची प्रक्रिया कुपोषित बालकांमध्ये जास्त वेगाने घडते. अतिसार रोगामधील धोक्याची लक्षणे- कुपोषण - तीन महिन्यांपेक्षा लहान बाळ १० टक्के किंवा त्यापेक्षा वजनात घट नुकतेच गोवर किंवा इतर संक्रमित रोगाची लागण झालेले बाळ पोट फुगणे संडासमध्ये रक्त पडणे आठ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लघवी न होणे बेशुद्ध होणे व झटके येणे बाळाला जुलाब होत असताना त्याचा आहार खिचडी, दहीभात, केळं, नारळपाणी, लिंबूपाणी, भाताची पेज, वरणाचे पाणी असा हलका आहार द्यावा. यामुळे पोषणमूल्ये मिळतात आणि वजनात घट होत नाही. आईचे दूध पचायला हलके आणि प्रतिकारशक्ती वाढवते. हे सर्व मातांनी लक्षात ठेवून त्याचा वापर बाळाच्या आजारपणात जरूर करावा. अशा वेळी स्तनपानाची मात्रा वाढवावी. झिंकच्या (जस्त) गोळीचा वापर करून बाळाच्या आतडय़ाची झालेली झीज भरून निघते. जुलाबाची तीव्रता कमी होते. पचनशक्ती वाढते. भूक लागण्यास मदत होते. उपाय जलसंजीवनी - जलसंजीवनी या आजारावरील महत्त्वपूर्ण उपाय आहे. जलसंजीवनी बनवताना त्यावर दिलेल्या माहितीनुसार आधी उकळून थंड केलेल्या पाण्यात करावे. एकदा बनवल्यानंतर २४ तासांच्या आतच वापरावे. बाळाला उलटी होत असल्यास हळूहळू चमच्याने द्यावे. सरकारी दवाखान्यात हे मोफत उपलब्ध आहे. ओ. आर. एस. बनवण्याची घरगुती पद्धत -निर्जलीकरण होऊ नये यासाठी घरच्या घरी एक लिटर पाणी उकळून थंड केलेल्या पाण्यात सहा चमचे साखर, एक चमचा मीठ टाकून ते व्यवस्थित विरघळून घ्यावे. त्यात दोन ते तीन थेंब लिंबू पिळावे. दर जुलाबानंतर अर्धा ते पाऊण ग्लास ओआरएस घोट घोट करून देत राहावे. ओ.आर.एस.च्या योग्य वेळी योग्य प्रमाणात देण्याचे फायदे - बाळाला रुग्णालयात दाखल केल्यास सलाइन लावण्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील क्षारांचे प्रमाण व्यवस्थित राहते. प्रतिजैविकाचा अनावश्यक वापर टाळला जातो. जुलाब लवकर नियंत्रणात येतात. या उपायात खर्च कमी होतो. drdeepajoshi@gmail.com