डॉ. अभिजीत देशपांडे ‘ऑक्टोबर हिट’चे तापणारे ऊन ओसरल्यानंतर एकदम गारवा वाढू लागतो. काही तापमानात चढउतार होत राहतात. या वातावरणबदलाचा अनेक जणांना त्रास होतो. सर्दी, खोकला, ताप यांबरोबरच दम्याच्या रुग्णांचा त्रासदेखील वाढतो. मात्र आहाराची आणि प्रतिबंधात्मक काळजी घेतली तर थंडीचा आनंद नक्कीच चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकतो जूनपासून सुरू होणारा पावसाळा, नंतर ऑक्टोबरमधील उष्णता आणि पुढच्याच महिन्यात जाणवणारी थंडी, अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम कमी-जास्त प्रमाणात मानवी आरोग्यावर होत असतो. थंडीच्या सुरुवातीला विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला, ताप असे आजार वाढताना दिसतात. सततच्या सर्दीमुळे काही जणांना कफ वाढून श्वास घेण्यास अडथळा होतो. सर्दीमुळे कानाचा संसर्गही होतो. हिवाळ्यात हिवताप हा आजारही सतत भेडसावत असतो. वातावरणबदलामुळे डासांची संख्या वाढल्याने हिवतापाचे रुग्ण वाढतात. हिवाळ्यात हवा कोरडी असल्यामुळे हवेमध्ये धूळ अधिक प्रमाणात असते. या धुळीमुळे श्वसनाचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. यामध्ये मुख्यत: दम्याच्या रुग्णांची संख्या अधिक असते. त्यामुळे उष्ण वातावरणातून थंड वातावरणात संक्रमिक होणाच्या काळात दम्याच्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. थंड हवेशी संपर्क आल्यामुळे किंवा अगदी थंड पाणी प्यायल्यामुळे वा सकाळी बागेत फिरणे, थंड पाण्यात आंघोळ करणे अशा कारणांमुळेही दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याच्या रुग्णांनी हिवाळ्यात सर्दीसारखे आजार होऊ नये यासाठीही काळजी घ्यायली हवी. मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांनीही थंड हवेत फिरणे किंवा थंड पदार्थ खाणे टाळलेले बरे. या काळात वयोवृद्धांना होणारे पाठ, पाय दुखणे असे त्रास वाढतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलांमध्ये अधिक दिसतो. त्यामुळे याबाबत दक्षता बाळगणे आवश्यक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे फटाक्यांमुळेही मोठय़ा प्रमाणात वायू प्रदूषण होते. या प्रदूषणामुळेही श्वसनाच्या समस्या उद्भवतात, तर दमा, क्षयरोग किंवा मूत्रपिंडाच्या रुग्णांचाही आजार बळावू शकतो. काय काळजी घ्यावी? हिवाळ्यात थंड पदार्थ खाणे किंवा थंड हवेत फिरायला जाण्यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार बळावतात. यासाठी गरम पाणी पिणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे हितावह आहे. हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करू नये, त्याऐवजी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर व नाकावर रुमाल धरावा. नाकातील स्रावातून निघणारे विषाणू हवेत पसरतात आणि त्यामुळे आजाराचा संसर्ग वाढतो. सर्दी किंवा खोकला झालेल्या रुग्णाचा हातरुमाल कुटुंबातील इतर व्यक्तींनी वापरू नये. डासांपासून बचाव करण्यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणे. सर्दी, खोकला या आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी वारंवार हात धुणे गरजेचे. दम्याच्या रुग्णांनी कमी तापमानात जाणे टाळावे. घराबाहेर पडल्यावर नाकावर रुमाल किंवा स्कार्फ बांधावा. गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आजाराची वैद्यकीय माहिती स्वत:सोबत ठेवावी. यामुळे अवेळी आजार उद्भवल्यास इतरांना त्याची माहिती मिळेल व लवकर उपचार करणे सुकर होईल. लहान मुलांच्या ‘विंटर डायरिया’चाही कालखंड हाच! लहान बाळांमध्ये हिवाळ्यात उलटय़ा-जुलाबांचा (विंटर डायरिया) त्रास बघायला मिळतो. बालरोगतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणत: दोन वर्षांच्या आतील बाळांमध्ये हा ‘रोटाव्हायरस डायरिया’ बघायला मिळतो. यात पहिल्या दिवशी बाळाला उलटय़ा होतात व त्यानंतर पाण्यासारखे पातळ जुलाब लागतात आणि शरीरातील पाणी कमी होते. अशा आजारात बाळाला ‘ओरल रिहायड्रेशन सोल्युशन’ (ओआरएसची पावडर) आणि झिंक देण्यास डॉक्टरांकडून सुचवले जाते. या उलटय़ा-जुलाबांवर प्रतिजैविके लागत नाहीत; परंतु योग्य वेळी वैद्यकीय सल्ला व काळजी घेणे गरजेचे.