रोचनं दीपनं वृष्यमाद्र्रकं विश्वभेषजम्। वातश्लेष्मविबन्धेषु रसस्तस्योपदिश्यते।। तुमच्या आमच्या रोजच्या स्वयंपाकात आवर्जुन असणाऱ्या आल्याला आर्द्रक(संस्कृत), अदरक(हिंदी), आदा(बंगाली), आदू(गुजराथी) आणि विश्वभेषज या संस्कृत नावाने ओळखले जाते. आयुर्वेदीय औषधी महासागरात आले हे प्रमुख औषध म्हणून दिले जात नाही. ते एक सहाय्यक द्रव्य म्हणून प्रामुख्याने अनुपानार्थ वापरतात. सुकवून तयार केलेल्या आल्यास सुंठ म्हणतात. सुमारे ३५ वर्षांपूर्वी चुण्याच्या पाण्यामध्ये आले उकळून सुंठ करण्याची पद्धत होती, पण केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने तिच्यावर कायमची बंदी आणली. हे आताच्या पिढीला कदाचित माहिती नसेल. सुंठीला लवकर कीड लागते. नकळत भोके पडतात. याकरिता गरजेपुरतीच सुंठ घरात आणावी. सुंठीत उडणारे तेल आणि एक द्रव्य आहे. सुंठ सुंगधी, उष्ण, वायुनाशी, दीपन, संकोचविकासप्रतिबंधक उत्तेजक आणि श्लेष्मघ्न आहे. सुंठीने पचनक्रिया चांगली होते आणि पोटात वायूचा संचय होत नाही. या गुणांमुळे सुंठ आतडय़ाच्या रोगात नेहमी वापरतात. सुंठीच्या उष्ण व वातहर गुणांमुळे सर्व विकारांमध्ये वापरतात. म्हणूनच सुंठीला महौषधी असे अन्वर्थक नाव आहे. अनेक औषधीग्रंथात नागर, श्रङ्गबेर अशी सुंठेची विविध नावे आहेत. सुंठीमध्ये एक उडून जाणारे तेल असते. त्यामुळे सुंठीचे चूर्ण बरेच दिवस राहिल्यास, ते अत्यंत उपयुक्त तेल नाहिसे होते. हे औषध म्हणून वापरणाऱ्यांनी नेहमी लक्षात ठेवावे. ‘शुष्ठयामवातं शमयेत!’ असे शास्त्रवचन आहे. सुंठीमध्ये आग्नेय गुण प्रधान असल्यामुळे आपल्या आहारातीत फाजील जलाचे शोषण करणे आणि ग्रहन केलेल्या अन्नाचे आमपाचन करणे यासाठी मी माझ्या बहुसंख्य रुग्णमित्रांना विविध औषधांबरोबर अनुपान म्हणून सुंठचूर्णाचा आग्रह धरतो. सुंठ ही वीर्यवर्धक, वृष्य आहे, हे बऱ्याच जणांना माहीत नसते. लैंगिक कमजोरीमुळे खूप महागडी औषधे घेणाऱ्यांनी काही काळ आले स्वरस किंवा सुंठ चूर्णाचा वापर करून पाहावा. ज्या कृश व्यक्तींना आपले वजन वाढवण्यासाठी खूप पैसे खर्च करावयाचे नाही. त्यांनी पुढील प्रकारचा आलेपाक करून पाहावा. एक भाग आले स्वरस, दोन भाग साखर आणि तीन भाग दूध असे एकत्र मिश्रण मंदाग्नीवर आटवावे. त्याच्या वडय़ा थापाव्या आणि पेढाबर्फीपेक्षा अत्यंत रूचकर आणि हवाहवासा आलेपाक जरूर खावा. हा आलेपाक जास्त दिवस टिकत नाही. विविध तऱ्हेच्या प्राणवहस्रोतसाच्या विकारात पुदिना, आले, लसून, ओली हळद व तुळशीची ताजी पाने अशी एकत्रित चटणी खावयाचा सल्ला मी आग्रहाने देत असतो. खूप हट्टी दमा, ब्रान्कायदिस, राजयक्ष्मा या विकारांसाठी नागरादिकषय या औषधांचा दोन्ही जेवनानंतर वापर केल्यास पचन सुधारून सबंधित रोगांपासून नक्कीच सुटका होईल. सुंठ, मिरे, पिंपळी यांना त्रिकुट आणि त्यासोबत लवंग, दालचिनी अशी द्रव्ये असल्यास ‘पंचकटु’ असे म्हटले जाते. त्यातील सुंठेचे योगदान खूप मोठे आहे. पंचकोलासव व पिप्लादि काढा यात पिंपळी व मिरीबरोबरच सुंठेचा वापर आहे. मिरी व पिंपळीमुळे रुग्णाचे वजन घटू शकते. म्हणून समतोल राखण्यासाठी त्यांच्यासोबत सर्वत्र सुंठीचा वापर केलेला असतो. ज्या मंडळींना खूप पाणी पिण्याची सवय आहे आणि त्यामुळे वजन वाढते. त्यांनी सुंठ पाण्याची मदत अवश्य घ्यावी. आमवातामुळे खूप मोठय़ा संख्येने अनेक रुग्ण हैराण असतात. त्यांनी नियमितपणे सुंठपाणी सदा सर्वकाळ घ्यावे. सुंठेमध्ये मलसंग्राहक हा मोठा गुण आहे. शंकास्पद व दुषित पाण्यामुळे वारंवार जुलाब होणे, पोट बिघडणाऱ्यांनी सुंठपाण्याची मदत घ्यावी.