‘चैतन्यप्रेम’ यांच्या ‘मनोयोग’मध्ये (२३ ऑगस्ट) उमदीकर महाराज आणि त्यांचे एक शिष्य अंबुरावांची कथा आहे. अंबुराव हे मंदिर झाडत असताना उमदीकर महाराज त्यांना परस्पर विरोधी आज्ञा करतात, पण अंबुराव त्यावर जराही प्रश्न उपस्थित न करता गुरूंची आज्ञा निमूटपणे पाळतात. त्यांच्यातील अशा या आज्ञाधारकपणामुळेच मला ते सर्वात प्रिय आहेत, असे उमदीकर महाराज इतर शिष्यांना सांगतात. मला वाटते, आपली एकेकाळची उज्ज्वल ज्ञानपरंपरा नंतरच्या काळात कुंठित होण्यास ‘मान वर करूनच नाही तर मान झुकवूनही प्रश्न उपस्थित न करणे, हीच खरी विनम्रता’ ही शिकवण कारणीभूत आहे. कारण गुरू किंवा अन्य वडीलधारी जी काही आज्ञा करतील तिचे निमूट पालन करणे याचीच पुढची पायरी म्हणजे गुरू जे जे काही मार्गदर्शन करील, जे विचार देईल त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता गुरुविचार हे अंतिम सत्य मानण्याची प्रवृत्ती दृढ होणे. भगवद्गीतेतही ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्। संशयात्मा विनश्यति।’ असे म्हटले आहे. मला वाटते की त्याऐवजी ‘शंकावान लभते ज्ञानम्’ असे हवे होते. अर्जुनानेही कृष्णपुढे एकामागोमाग एक प्रश्न उपस्थित केले नसते तर गीतेचीही निर्मिती झाली नसती. यापेक्षा मला भगवान् बुद्धाचा उपदेश विवेक आणि ज्ञाननिष्ठ वाटतो. ते शिष्याला म्हणतात, ‘मी जे काही सांगितले आहे त्यावर केवळ मी काही सांगितले म्हणून विश्वास ठेवू नकोस. केवळ परंपरा सांगते म्हणून तू काही ऐकू नकोस.. जे तुझ्या सदसद्विवेकबुद्धीला योग्य वाटते त्याचे आचरण कर.’ तर प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल म्हणतो, ‘मला प्लेटो प्रिय आहे; पण सत्य अधिक प्रिय आहे.’ इसीडॉर राबी हा नोबेल पारितोषिक विजेता वैज्ञानिक त्याच्या शालेय जीवनातील आठवण सांगताना म्हणतो, ‘जेव्हा ब्रुकलिनमधील प्रत्येक ज्यू माता तिच्या मुलाला शाळा सुटल्यावर विचारत असे, ‘आज काही शिकलास का?’ तेव्हा माझी आई मात्र विचारत असे, ‘इसी, तू आज काही चांगला प्रश्न विचारलास का?’ या एक चांगला प्रश्न विचारण्याच्या फरकामुळे मी शास्त्रज्ञ बनलो.’ आपल्या येथे बुवा-महाराज आणि साधू-संत यांचे पीक आले त्याच वेळी पाश्चात्त्य जगात अगणित शास्त्रज्ञ आणि संशोधक जन्माला आले याचे कारण, चांगले प्रश्न विचारत राहून पारंपरिक ज्ञानाला आव्हान देत राहण्याची त्यांची मानसिकता आणि या वृत्तीचे संस्कार हे असावे. - अनिल मुसळे, ठाणे पश्चिम. आदिवासींची ‘बोगसां’शी लढाई जुनीच ‘साडेसात टक्क्यांतली चोरी’ या ‘सह्यद्रीचे वारे’ या सदरातील लेखात (२३ ऑगस्ट) रेश्मा शिवडेकर यांनी सद्य:स्थितीतील आरक्षण व्यवस्थेतील जात चोरीचा प्रभावीपणे उल्लेख केला आहे. बोगस आदिवासी मुद्दय़ावर आदिवासी समाजाची लढाई मागील तीन दशकांपासून वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. आता हा मुद्दा वेगळा की त्या लढाईची ‘मुख्य’ पत्रकारितेमध्ये किती प्रभावीपणे दखल घेण्यात आली किंवा आदिवासी समाज हा मुद्दा प्रसारमाध्यमांच्या ‘मुख्य धारे’पर्यंत पोहोचवू शकला की नाही. तसेच, आतापर्यंत संबंधित मुद्दय़ावर सरकारने केलेली ‘कारवाई’ व विशिष्ट सामाजिक-आर्थिक संरचनेत राहणाऱ्या आदिवासी समाजाची ‘मुख्य’ समाजाच्या राजकीय व्यवस्थेमुळे झालेली शकले याचा सामायिक प्रभाव अभ्यासावा लागेल. लेखात आदिवासी समाजाच्या एकजुटीसंदर्भादाखल अनुसूचित जातींच्या संघटनांचा दाखला देण्यात आला आहे, परंतु दोन्ही घटकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, ऐतिहासिक आणि राजकीय पाश्र्वभूमी वेगळी असल्यामुळे आदिवासी समाजाच्या एकजुटीचा प्रश्न वेगळ्या पद्धतीने पाहणे उचित ठरेल. - मंदार दादोडे, टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई लोकसंख्यावाढ रोखण्याचे आव्हान दारिद्रय़, बेरोजगारी, भूकबळी, कुपोषण अशा समस्या निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित लोकसंख्यावाढ. १२५ कोटींच्या या देशात ७० टक्के लोकसंख्या गरीब असून २५ टक्के लोकसंख्या तर दारिद्रय़रेषेखालीच आहे. आर्थिक, सामाजिक पाहणी- २०१५ नुसार भारतात २९.३९ कोटी कुटुंबे आहेत. यापैकी १७.१९ कोटी कुटुंबे ग्रामीण असून त्यांपैकी ९.१६ कोटी कुटुंबे मजूरवर्गातील आहेत. म्हणजेच ५३ टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबे मजुरीवर उदरनिर्वाह करतात. याच जनगणनेनुसार देशात भीक मागणारी ६.५ लाख कुटुंबे आहेत. जगातील कुपोषणापैकी ४० टक्के कुपोषण एकटय़ा भारतात आहे. ‘लेकुरे उदंड जाली..’ या २३ ऑगस्टच्या अग्रलेखात सांगितल्याप्रमाणे अपत्यांची संख्या ही नेहमीच सामाजिक व आर्थिक कारणावर अवलंबून असते. सुशिक्षित नसलेल्या तसेच आर्थिक स्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबात अपत्यांची संख्या जास्त दिसून येते. ही कुटुंबे मुलांचे पोषण, शिक्षण तसेच इतर गरजा पूर्ण न करू शकल्याने कुपोषण, दारिद्रय़, बेरोजगारी अशा समस्या पुढल्या पिढीतही राहतात. सद्य:स्थितीत लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी असून कठोर कायद्यांची गरज आहे. ‘हम दो हमारे दो’ प्रत्यक्षात आल्यास देशातील बऱ्याच समस्यांचे मूळ नष्ट होईल. तसेच कुटुंब नियोजनाचे महत्त्वदेखील सामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे एखाद्या धर्माची लोकसंख्या वाढत असताना आपलीही लोकसंख्या वाढली पाहिजे, असे कोणीही सांगण्याची गरज राहणार नाही. - प्रणयसिंह तानाजी काळे, वडाचीवाडी बु. (ता. माढा, जि. सोलापूर) सुशिक्षितांना नाही पटणार, काही लोकांना पटेल.. ‘लेकुरे उदंड जाली..’ (२३ ऑगस्ट)मध्ये मांडलेले एका कर्मठ विचाराचे आकडेवारीनुसार योग्य प्रकारे केलेले खंडन स्वागतार्हच. कोणत्याही सुशिक्षिताला हे पटणे कठीणच आहे. पण ‘लोकसत्ता’ने हेही सांगायला हवे की, जगात जिथे जिथे मुस्लीम राष्ट्रे आहेत तिथे लोकशाही, शांतता, सुव्यवस्था, आधुनिक शिक्षण, काळाबरोबर बदलण्याची मानसिकता, मानवता का नाही? किमान एक तरी उदाहरण हवे. ते का नाही? कदाचित मुस्लीमबहुलतेच्या या भीतीतून काही लोकांना संघचालकांचे मत पटेलही.. - रोहित चौगुले, कोल्हापूर कुटुंब विस्तार परवडतच नाही.. ‘लेकुरे उदंड जाली’ हा अग्रलेख (२३ ऑगस्ट) वाचला. गेल्या दोन वर्षांपासून असे दिसून आले की विश्व हिन्दू परिषदेतील ‘साध्वी’, ‘संत’, रा. स्व. संघातील अविवाहित कायकर्ते यांनाच प्रामुख्याने हिंदूंची संख्या वाढावी याची जाणीव होताना दिसते कारण मुस्लीमांची संख्या वाढत आहे याची खंत. याचे मुख्य कारण आर्थिक नियोजन आहे. अगदी सहा अंकी वेतनधारीसुद्धा एकाच अपत्यावर थांबते, कारण कुटुंबविस्तार परवडतच नाही. त्यामुळे अग्रलेखाच्या शेवटी विचारलेला प्रश्न हा यक्षप्रश्नच ठरतो. - राम देशपांडे, नेरुळ संघ पोहोचला, हे मान्य झाले! ‘लेकुरे उदंड जाली’ हा अग्रलेखातील ‘आज संघासमोर आव्हान आहे ते एका बाजूला शिकून शहाण्या होणाऱ्या हिंदू समाजाचे..’ याचा अर्थ आज संघ समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जिथे शिक्षणदेखील नाही अशा स्तरापर्यंत पोहोचला आहे हे मान्य केले आहे त्याबद्दल धन्यवाद. - किरण दामले, कुर्ला पूर्व (मुंबई) ‘शतप्रतिशत’ द्या आणि बघत राहा! वैऱ्यावरसुद्धा येऊ नयेत असे दिवस संघ-भाजपवर आले आहेत.. सरसंघचालक, हिंदूंनी संतती वाढवायला कायद्याचा अडसर नाही, असे सांगतात, तर तिकडे पंतप्रधानांना स्वातंत्र्योत्तर काळात जन्मूनसुद्धा सत्ताप्राप्तीसाठी किती यातना/वेदना सहन कराव्या लागल्या म्हणून कार्यकर्त्यांची कणव आलेली आहे. स्वातंत्र्य मिळवताना काय केवळ मूठभर परकीयांशी सामना करावा लागला, त्यात समस्त स्वकीयांनी साथ दिली त्यामुळे ते श्रम हलके झाले. स्वजनांशी लढून तर पाहा हे दिल्लीश्वरांचे म्हणणे पुरेशा गांभीर्याने घ्या मायबाप हो! निवडणुका असलेल्या सगळ्या राज्यांचा शतप्रतिशत कारभार द्या व बघत राहा- अच्छे दिन आ रहे है. - रामचंद्र महाडिक, सातारा आरोपी कार्यकर्ता असूनही गय नाही ‘जेएनयू परिसरातील वसतिगृहात बलात्कार’ या शीर्षकाचे वृत्त ‘लोकसत्ता’त २३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाले आहे. आरोपी आमच्या संघटनेचा आघाडीचा कार्यकर्ता होता. संघटनेने २१ ऑगस्ट रोजीच याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, २३ ऑगस्ट रोजी इंडियन एक्स्प्रेसमध्ये त्या निवेदनाचाही संदर्भ दिला आहे. मात्र आपल्या दैनिकात तो संदर्भ नाही. ‘आइसा’चा आघाडीचा कार्यकर्ता अनमोल रतन याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप असून संघटनेने त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्याचे प्राथमिक सदस्यत्व तत्काळ काढून घेण्यात आले आहे. या प्रकरणावर ‘आइसा’ने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून त्यावर ठाम राहील. लिंगनिरपेक्ष न्यायतत्त्वाशी ‘आइसा’ बांधील असून त्याचा भंग करणारा संघटनेचा आघाडीचा कार्यकर्ता असला तरी त्याची गय केली जाणार नाही. आम्ही तक्रारकर्तीच्या बाजूने ठामपणे उभे असून न्यायाच्या लढाईत तिला शक्य ती सर्व मदत केली जाईल. - सुचेता डे (राष्ट्रीय अध्यक्षा, ऑल इंडिया स्टूडंट्स असोसिएशन-‘आइसा’), अभिलाषा श्रीवास्तव (राष्ट्रीय सहसचिव, ‘आइसा’, मुंबई) loksatta@expressindia.com