परवा वाचनालयातून परत आलो तर जेवणाच्या टेबलावर एक मोठे खोके पाहिले. पाहतो तर त्यात आंबे! पण साधेसुधे नाही. तर जवळजवळ लहान नारळाएवढे मोठे. सौला विचारले तर म्हणाली सोबत पत्रही आहे ते वाचा. लहान भावाचे विद्याधरने ते आंबे पाठविले होते. सोलापूर काही आंब्यासाठी प्रसिद्ध नाही मग हे एवढे मोठे आणि इतके कसे आंबे? आणि मी एकदम म्हणालो, ‘अगं हा तर गंगा आंबा’ आणि स्मरणरंजनात दंग झालो.

आपणा भारतातल्या लोकांना रस्त्यात जनावरे अगदी गाई, म्हशीपासून उंट, हत्तीपर्यंत सर्रास पाहावयाला मिळतात. आपला भारत परदेशात त्या बाबतीत प्रसिद्धच आहे. मागे अमेरिकेस गौतमकडे गेलो होते, तेव्हा फ्रायडे मार्केटमध्ये एका स्टॉलवर २० फूट x २० फूट आकाराच्या कुंपणात ४ शेळ्या आणि ४ मेंढय़ा कोकरे ठेवली होती आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आंजारण्या गोंजारण्यासाठी मूल्य ठेवले होते २ डॉलर्स आणि मुलं, – मुलंच काय मोठी माणसंही तो आनंद घेत होती. आम्हाला मोठे नवल वाटले. आमच्या घरी आम्ही काही वर्षे, बरीच वर्षे, पूर्ण शेतकरी होतो. अगदी गावापासून दूर असलेल्या शेतातच आमचा निवास होता. २ म्हैशी, १ गाय, १ शेळी आणि २ बैल शिवाय कुत्रा आणि मांजरही होते.
आमची एक म्हैस भाकड झाली म्हणून वडील म्हैस घ्यायला बाजारला गेले. गुरांचा बाजार म्हणजे एक विशेष अनुभव असतो. तेथे हेडे नावाचा एक मनुष्य विशेष असतो. त्याच्यावाचून बाजारचे पानसुद्धा हलत नाही. हेडे म्हणजे बैल बाजाराचे दलाल. अत्यंत हुशार, आतल्या गाठीचे, मनाचा थांग बरोबर ओळखणारे असे हे लोक lp37असतात. त्यांचं काम पदोपदी शपथ घेण्यावरच चाललेले असते. देवादिकांपासून आई-बाप, मुलं-बाळं यांची तर शपथ तर घेतीलच, पण भाकरीच्या गाठोडय़ाला डोक्यावर ठेवून त्या गाठोडय़ात खरेतर खेटर-चपलाच असतात. शपथ घ्यायला ते कमी करत नाहीत. आपण खेडय़ांतील सामान्य देवभोळी माणसं पाहिली असतील, तर एकूण व्यवहाराचा आपण अंदाज करू शकता. दोन शेतकरी परस्पर व्यवहार करत असले तरी हे हेडे मध्ये मध्ये धडपडत असतातच.
भाऊनी एक म्हैस हेरून ठेवली होती. नुकतीच व्यालेली पारडी बरोबर असलेली. ते जनावर वडिलांच्या मनात भरले होते. पण हे असं सुंदर जनावर मालक का विकतो असाही विचार मनात आला. मालक म्हणाला मुलीचं लग्न आहे म्हणून हे करतो. चांगलीच घासाघीस करून ती म्हैस त्यांनी घरी आणली. पण चारच दिवसांत ती का विकली याचं कारण लक्षात आलं; तो ७२ च्या दुष्काळाचा काळ होता. चारा नव्हता पण काँग्रेस गवत म्हणजे बघा त्याला गाजर गवत म्हणतात. प्रचंड वाढलेले होते. या म्हशीला तेच गवत खायाची चटक लागलेली होती. इतर जनावरे तोंडही लावत नसत. तर हे गवत खाल्ल्यानं तिचं दूध कडू लागायचं. नोकर म्हणाला राहू द्या. आपण हे दूध गवळ्याला घालत जाऊ, पण वडिलांना ते पटले नाही. त्यांनी तिला विकायाला बाजारात नेली. या वेळी सोबत भूपेंद्र खत्री म्हणजे भोपूशेठ त्यांचे मित्र बरोबर होते. म्हैस विकल्यावर भोपूशेठ म्हणाले, आपण या वेळी एक गायच घेऊ या. त्यांनी एक गाय पाहिलेली होती. चांगली दणकट गोड-गोजरी दिसणारी, मोठय़ा कासेची, पण गळ्यात घंटा बांधल्यावर जेथे येईल, तेथे पोळीवर एक मोठी आंब्याएवढी गाठ होती. त्यामुळे कोणीच तिच्या जवळ फिरकत नव्हतं. भोपूशेठनी ती गाठ हाताळली. गाय अगदी गप होती. गाठ दुखत वगैरे असल्याचे काही वाटत नव्हते. कासेला, सडांना विनात्रास हात लावून देत होती. आठ-नऊ महिन्यांची गाभण होती. भोपूशेठ म्हणाले रामभाऊ हीच गाय आपण घ्यायची पण, तिच्या गळ्यातली गाठ? गाठ काय रामदास स्वामींच्या कपाळावरही होती आणि ती सोईच्या किमतीलाही मिळाली. घरी आल्यावर दोन महिन्यांनी ती व्याली आणि खोंड झाला. गाईला खोंड आणि म्हैशीला रेडी होणं चांगली समजतात. दूध ही २-३ लिटर द्यायची, आम्ही सगळे खूश होतो. आमच्याकडे तिचे ४-५ वेत झाले. मग शेतातील मजूर म्हणाले आता हिला काढायला पाहिजे. त्यातलाच एक जण म्हणाला मालक मलाच द्याना अर्धीलीनं. अर्धीलीनं म्हणजे पैसे वगैरे न देता जनावर न्यायचं पण एक वेळचे दूध मूळ मालकांना द्यायचं. वडील त्याला कबूल झाले. त्याची सून बाळंत होती आणि त्यामुळे त्याला दुधाची जरूर होती.
पण चार दिवसांनी पाहतो तर गंगा गाय आपली येऊन दावणीला उभी! असे चार-पाच वेळा झाले, तेव्हा वडील म्हणाले, राहूदे इथंच, तू फक्त तिला लागेल एवढी पेंड सरकी देत जा आणि एक वेळचं दूध घेऊन जात जा.
तिला आम्ही पाय मोकळे करायासाठी राखोलीच्या गुराख्याकडे द्यायचो. त्याच्या १५-२० गुरांच्या घोळक्यात ती सर्वापुढे असायची. जातानाही आणि येतानाही या गुराख्यांनी आणि इतरांनीही तिचं नाव ठेवलं होतं घंटा गाय- गळ्यातल्या गाठीमुळे.
काळापुढे कुणाचे काय चाललेय? एके दिवशी सकाळी पाहतोय तर गंगा चारी पाय ताणून पडलेली. कामगार म्हणाले, बहुतेक साप चावला असावा. असे जनावर पडले की, त्याची विल्हेवाट लावणारे चार लोक आले आणि ते भाऊबरोबर बोली करायला लागले. रोहिणी आणि बाळूला हे कळले. रोहिणी रडायलाच लागली. ती म्हणाली तिला द्यायचे नाही. आपल्या शेतातच राहू द्या. मग भाऊंनी ते आलेल्या लोकांना बांधाच्या पोटात खड्डा घ्यायला लावून सर्व सोपस्कार उरकला आणि त्या प्रत्येकाच्या हातावर रुपये १०-१० ठेवले. त्या वेळी दिवसाची मजुरी १२ आणे रुपयाएवढीच होती. १०-१० रुपये मिळाल्यावर वारंवार वाकून-वाकून रामराम करून ते गेले. पुढे बाळूच्या मनात आलं त्या जागेवर आंब्याचे एक झाड लावावे. भाऊ हो म्हणाले आणि मला रोपाची सोय करायला सांगितले. माझे मित्र कल्लणा म्हेत्रे, त्यांच्या आजीला कागदी लिंबू आणि आंब्याची रोपे करून वाटण्याची, विकण्याची नाही- आवड होती. अरुणअण्णाला रोपे पाहिजेत म्हणल्यावर तिने सांभाळून ठेवलेली दोन-तीन वर्षांची कुंडी मला दिली. मी आणि मित्रांनी सायकलवरून ती शेतात आणली आणि भाऊंना दाखवली. भाऊ म्हणाले, यात तर दोन आंब्याची रोपे आहेत. त्यांना एक विचार सुचला. रोहिणी आणि बाळूच्या हस्तेच ही रोपं लावावी. त्यांनी दोघांना बोलवून हा विचार सांगितला. दोघे खूश झाले, पण खड्डे घ्यायला सांगितल्यावर नाराज झाले, पण पूर्वेला एक आणि पश्चिमेला एक असे दोन खड्डे घेऊन ते खतामातीने भरले. मग एक सावलीचा दिवस पाहून रोपे लावली.
म्हणच आहे की आज्याने रोप लावायचे आणि नातवानी फळे खायची. माझे महाविद्यालयीन शिक्षण व त्या दोघांचे माध्यमिक शिक्षण सुरू झाले. सोलापूरजवळ नेहरूनगर येथे इंचिगिरी मठात दोन खोल्या घेतल्या. भाडे होते रोख ३ रुपये दरमहा. पुढे मी वैद्यकीय शिक्षणाला पुण्याला आलो. ते दोघेही सोलापूरला जाऊ लागले. वडिलांना शेती झेपेना त्यांनी ती काढून टाकली. आंब्याच्या झाडांविषयी कळायला काहीच मार्ग नव्हता.

पण गेल्या महिन्यात बाळू सोरेगावला गेला असता परत येताना त्याचे लक्ष बांधावरच्या दोन फळे लगडलेल्या आंब्याच्या झाडांकडे गेले. दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून, हा रस्ता आमच्या शेताला लागून होता. तो झाडांकडे गेला. कुणीतरी परका माणूस येऊन झाडांकडे पाहतोय म्हटल्यावर मालक येऊन चौकशी करू लागला. लवकरच त्याला ओळख पटली. आता कोठे राहता वगैरे बारीक चौकशी केली. थोडय़ा वेळाने बाळासाहेब घरी आले आणि त्यांनी मंगलाला गंगा आंब्याविषयी सांगितले. मंगलाबाई म्हणाल्या मग ४-६ आंबे आणायचेना. पण वडिलांची शिकवण अशी की कोणाला काही मागायचे नाही आणि कुणी काही दिलं तर नाकारायचे नाही. आताच्या मालकाने दिले नाहीत आणि बाळासाहेबांनीही मागितले नाही. आता कोणाला काही मागायचे नाही याला एक अपवाद होता तो म्हणजे पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र. कोणालाही मागायचा, अनमान करायचा नाही. याचा अगदी आतिरेक मी एकदा केला होता. एकदा रस्त्याने जाताना धोधो पाऊस कोसळू लागला. दुचाकी बाजूला लावून मी आडोशाला उभा राहिलो तर तिथे आधीच एक मागतकरी उभा होता. हातात वर्तमानपत्र घेऊन. पाऊस काही थांबेना, मग करायचे काय. समोर वर्तमानपत्र दिसत होते. मी मागून घेतले त्यानेही दिले आणि राहू द्या साहेब तुमच्याकडेच, असे म्हणून तो गेला.
बाळासाहेबांच्या भेटीनंतर महिन्याभराने एक माणूस चौकशी करत आला आणि म्हणला हे आंबे मालकांनी दिले आहेत. अगदी खताचं पोतं भरून होते. कोण मालक म्हटल्यावर त्याने भ्रमणध्वनी जोडून दिला. तेव्हा कळले की आमच्या शेतातलेच हे आंबे आहेत. त्यातलेच शेलके १५-२० आंबे बाळासाहेबांनी मला पुण्याला पाठवले होते. तो दोन हातात न मावणारा रसाळ आंबा पाहून मला अगदी भरून आले. कापून खाल्ला, रसही केला. उषा म्हणाली ती. भाऊ पाहिजे होते. हा आंबा चाखायला अगं भाऊच काय, भोपूशेठही पाहिजे होते. त्यांच्यामुळेच तर घंटा गंगा मिळाली आणि हा गंगा आंबा!
टीप- वैद्यकीय शिक्षण घेताना समजले तो घंटा गंगाचा गोळा म्हणजे लायपोमा होता. निरुपद्रवी, वेदनारहित, पण काहीसा विद्रुपता देणारा हा व्याधी विशेष असतो. पण चेहऱ्यावर हातावर या गोळ्या, गोटय़ा असल्या तर चांगलाच मानसिक त्रास देतात.
डॉ. अ. रा. गोडसे