त्या दिवशी विद्यार्थ्यांना ‘मनोहर सोनावणे’ यांचा ‘बदलते शहर’ हा लेख शिकवत होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘‘काही वर्षांपूर्वीपर्यंत या शहराचा चेहरा अगदीच मध्यमवर्ग हाच होता. कदाचित पेशाने आणि आमदानीने लोका- लोकांमध्ये काही फरक असेलही. पण राहण्याच्या, जगण्याच्या तऱ्हांमध्ये फार मोठं अंतर होतं असं नाही.’’ मग शिकवता शिकवता मनात आलं, माणूस किती बदलत चालला आहे. पूर्वी आदिमानव निवाऱ्याकरिता गुहेत राहात असे. हळूहळू गरज वाढत जाऊन तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला. त्यातून गावं, शहरं वसत गेली. आज या गरजेचे रूपांतर इतके मोठे झाले आहे की आपले घर १२ व्या की १४ व्या मजल्यावर असावे याबाबत मानवामध्ये अहमहमिका सुरू आहे. परंतु, इतक्या उंचीवर राहात असताना माणुसकी, आपलेपणा, मायेचा ओलावा, एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची विचारपूस करण्याचे एटिकेट्स् मात्र कुठे तरी लुप्तच  झालेले दिसतात. सगळंच जणू संकुचित झालंय. घरं उंच झाली, पण मनं मात्र जणू लहानच राहिली. ‘सेकंड होम’सारख्या संकल्पनेतून आज कित्येक कुटुंबांची दोन तरी किमान घरं आहेत. पण स्वत:च्याच वृद्ध आई- वडिलांना सामावून घेण्याकरिता घरं कमी पडतात. एवढंच नव्हे तर मोठी घरं घेताना त्यासाठीचे कर्जाचे हप्ते भरताना जिवाचा नुसता आटापिटा कित्येक जोडपी करताना दिसतात. पण, या सगळ्या धडपडीत त्या घराचा उपभोग घेणं तर विसरूनच जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक आजी त्या दिवशी सांगत होत्या, ‘‘मुलाला म्हटलं, आता तू घर मोठं घेतलंस तर बोलाव एकदा सगळ्या नातेवाईकांना, दिवाळीही आहेच.’’ तर मुलगा म्हणाला, ‘‘कशाला उगाचच? आणि नातेवाईक हवेतच कशाला? तुम्हाला विचारायचं तर विचारा, पण आम्हाला मात्र सांगू नका.’’ कोणालाच गरज नाही. जणू काही माणसातलं माणूसपण हरवत चाललंय. कुठेही अपघात झाल्यावर त्या जखमी व्यक्तीला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याचे फोटो काढणं महत्त्वाचं झालंय.

मराठीतील सर्व ब्लॉगर्स कट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog lost humanity
First published on: 29-04-2016 at 01:12 IST