पैसा अमाप झाला आहे ना? मग तो गुंतवा कशात तरी. आजकाल खूप पर्याय आहेत. पैसे गुंतवायला. सोन्यात गुंतवून काय फायदा?

पिढय़ान् पिढय़ा स्त्रिया सोन्यावर प्रेम करत आल्या आहेत आणि आजही करत आहेत. आम्हाला दागिन्यांचा एवढा शौक नाही, परंतु लग्नात मात्र हक्काने दोन्हीकडून दागिने पाहिजे असतात. अर्थात बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याकरता. कारण माझ्याकडे सर्व दागिने आहेत, हा एक अहंभाव मनाला सुखावतो.
काही मुली आजीचे (जुने नव्हे, अँटिक) दागिने अभिमानाने घालतात. काही मुली आई-आजीचे दागिने मोडून नव्या पद्धतीने करून घेतात आणि वापरतात. अर्थात ज्याची-त्याची आवड! व्यक्तिस्वातंत्र्यामुळे कोणी कोणाला अडवायचे कारणच नाही. माझ्या मते आता सोन्याचा हव्यास सोडायलाच पाहिजे. चमकलात ना? हुंडाबंदी एका वर्षांत झाली नाही. हुंडय़ाचा पगडा इतका मनावर बसला आहे की आजकाल नोकरी करणारे आई-वडील मुलीकरता दागिने, कपडे, घर, गाडी इ. इ. देतात. त्यातही प्रत्येक कुटुंबाची स्पर्धा असतेच. त्यामुळे यादी वाढतच जाते. असो.
रोज वर्तमानपत्रात २/३ तरी मंगळसूत्र चोरीच्या बातम्या वाचायला मिळतात. वाचून दु:ख होते. त्यांना किती दु:ख होत असेल? पण जीव तर वाचला यात समाधान मानून घेतात. पण भविष्यात असल्या घटना घडणारच नाहीत, याची हमी देता येत नाही. ज्येष्ठ नागरिकांना ओळखून त्यांची चोरांचीपण दागिने चोरायची हिंमत वाढते, कारण विरोध करायला त्यांच्यात ताकद नसते. तेव्हा पन्नाशीनंतर एकटी-दुकटीने जाऊ नये व बँकेत किंवा इतर जरुरी कामाकरता जायचेच असेल तर खोटे मंगळसूत्र-दागिने घालून जावे. आजकाल खोटे दागिने छान मिळतात. तेव्हा त्यांचा वापर करावा. सुरुवातीला मनाला पटणार नाही, पण हळूहळू पटायला लागेल. स्वत:त बदल केला, तर इतरपण बदलतील हा आशावाद मनाशी बांधून ठेवावा.
सोन्याच्या किमती गगन फाडून तोडून वर गेल्या आहेत. तेव्हा आपण स्त्रियांनी सोन्याला एवढी किंमत का द्यायची? वर्तमानपत्रात, रेडिओवर तर रोज नवनवीन दागिन्यांची दुकाने उघडत असल्याचे समजते. आणि प्रत्येक दुकान (छोटे-मोठे) दागिन्यांनी खचाखच भरलेले असते व गिऱ्हाईकांची गर्दी तर काही विचारूच नका. ‘सेल्समन’चे तोंडपण दिसत नाही, अगदी ते पण भरपूर असले तरी! का एवढा हव्यास करायचा सोन्याचा?
सध्या पगार भरपूर झाले आहेत व संगणक क्षेत्रातील तरुणांचे पगार अवाढव्य आहेत, म्हणूनच नुसते सोन्याचे दागिने नाहीत, तर आम्ही उच्च प्रतीचे आहोत हे दाखवण्याकरता हिऱ्यांच्या दागिन्यांचे वेड लागले आहे. जिथे-तिथे हिरे! दूरदर्शनवर तर हिऱ्याचा भडीमार करतात जाहिरातीमधून! जसं काही हिरा अगदी स्वस्त झाला आहे. अंगठीपर्यंत ठीक आहे, पण आता कानातले, बांगडय़ा व गळय़ातील हार, मंगळसूत्राचे पेंडंट वगैरे! इतके सर्व (किंवा एक) दागिने घातले, तर जिवाला धोका नसणार का? तुम्हीच नसणार. तर दागिने कोण वापरणार? एवढे साधे गणितपण चाणाक्ष बायकांना कळू नये?
पैसा अमाप झाला आहे ना? मग तो गुंतवा कशात तरी. सध्या खूप पर्याय आहेत. पैसे गुंतवायला. सोन्यात गुंतवून काय फायदा? कारण आपण सोने-चांदी विकायला गेलो, तर कमीच किंमत मिळते आणि आपल्याला पैशांची अगदी निकड असली तर सोनार (सराफ) कमी किमतीतच घेणार. तेव्हा तरुण मुलींनो विचार करून हिरे-सोन्यावर पैसा खर्च करा. माझ्या मते जागांमध्ये पैसा गुंतवला तर काही वर्षांनी अमाप पैसा मिळेल. तरुण असताना घरे घेऊन ती भाडय़ाने देता येतात. पण वय बोलायला लागल्यावर ‘सेकं ड होम/फार्म’ सांभाळायला कठीण जाते. मनुष्यबळ असेल, तर घरात पैसा अडकवायला काहीच हरकत नाही, पण सोन्यात नको.
बायका/मुली सणासमारंभाला दागिने घालणारच व ते बरोबरही आहे. पण त्याला सोने हाच पर्याय ठरू शकत नाही. किंवा एखादा अगदी नाजूक ‘सेट’ असला, तर ठीक आहे. पण मोत्यांचे/खडय़ांचे वेगवेगळे दागिने असतात. त्यांची निवड केली तर..?
मोती छान उठून दिसतात सर्व स्त्रियांवर. अनेक प्रकार मोत्यांमध्ये आहेत. बरीच वर्षे बऱ्याच स्त्रिया घरी बसल्या बसल्या मोत्यांचे दागिने बनवतात. स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक स्त्री आपला जीव ओतून नवीन प्रकार करत असते. शिवाय इतर मोठे ‘ज्वेलर्स’ आहेतच. तुम्हाला पाहिजे तसे बनवून देतात. तेव्हा ‘पोरींनो’ आता सोन्याचे प्रेम कमी करून मोत्यांकडे वळा.
एकदा मनाशी ठरवले की सर्व काही शक्य आहे. केल्याने होत आहे, आधी केलेचि पाहिजे. नव्या वर्षांत नवा संकल्प करून सोन्यावरील प्रेम कमी करावे.