किल्लेबांधणीतला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. किल्ल्यावरील पाण्याचं जतन करण्यासाठी टाकेबांधणीचं शास्त्र जाणीवपूर्वक विकसित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक  जिल्ह्यतील सातमाळ रांगेतील अचला हा छोटासा किल्ला आहे. किल्ल्याचा माथा फिरण्यासाठी १५ मिनिटे लागतात एवढाच त्याचा पसारा आहे. पण किल्ल्यावर पाण्याच्या टाक्यांची संख्या आहे १४. महाराष्ट्रात असे अनेक छोटे किल्ले आहेत त्यावर पाण्याची अनेक टाकी खोदलेली आढळतात. यावरून किल्ल्यावरच्या पाण्याचे महत्त्व लक्षात येते. रामचंद्रपंत आमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रात गडावरील पाण्याबाबत पुढील परिच्छेद वाचायला मिळतो. ‘‘गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी. गडावरी झरा आहे, जसे तसे पाणी पुरते, म्हणून तितिकीयावरीच निश्चिती न मानावी किंनिमित्य की, झुंजांमध्ये भांडीयाचे आवाजाखाली झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते, याकरिता तसे जागी जाखिरीयाचे पाणी म्हणून दोन-चार टाकी तळी बांधावीत. त्यातील पाणी खर्च होऊं न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे.’’ यावरून शिवाजी महाराजांच्या दुर्गस्थापत्यात पाण्याचा किती बारकाईने विचार केलेला ते पाहायला मिळते.

सह्यद्री हा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. या बेसॉल्टमध्येही वेगवेगळे थर आहेत. कॉम्पॅक्ट बेसॉल्ट आणि अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्ट. यातील कॉम्पॅक्ट बेसॉल्ट खडकात चिरा असतात. जमिनीतून मुरणारे पाणी या चिरांमध्ये साठून राहाते. या खालचा थर अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टचा असतो या थरात पाणी मुरत नाही. ही रचना समजून घ्यायची असेल तर पावसाळ्यात खंडाळा किंवा कुठल्याही घाटातून जाताना घाट बनवण्यासाठी खडकांच्या कापलेल्या िभती असतात त्या पाहिल्या तर सर्वात वरचा थर मुरुमाचा दिसतो. त्यातून मुरलेलं पाणी खालच्या चिरा असलेल्या कॉम्पॅक्ट खडकात उतरल्यामुळे तोही ओला झालेला दिसतो. पण त्याखालचा

अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टचा थर मात्र कोरडाठाक असतो. कारण यात पाणी मुरत नाही. सह्यद्रीत कोरलेली लेणी याच अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टच्या थरात कोरलेली आहेत. त्यामुळे ही लेणी आतून कोरडी राहतात. ज्या ठिकाणी लेणी खोदताना दुसऱ्या प्रकारचा दगड लागला तिथे एकतर लेणी अर्धवट सोडलेली आढळतात किंवा त्याच टाक्यात रूपांतर केलेले पाहायला मिळते. कोकणात चिऱ्याचा दगड मोठय़ा प्रमाणात आढळतो. हा दगड सच्छीद्र आणि ठिसूळ असल्याने त्यात लेणी किंवा टाकी खोदणे शक्य नसते. त्यामुळे कोकणातल्या किल्ल्यांवर टाक्य़ांऐवजी विहिरी खोदलेल्या पाहायला मिळतात.

किल्ल्यांवर, लेण्यात पाण्याची टाकी कोरलेली दिसतात आणि तीही पाण्याने भरलेली असतात. मग हे कसे काय? यामागे आहे हा कॉम्पॅक्ट बेसॉल्ट खडक. त्यात तयार झालेल्या फटी आणि पोकळ्य़ांमध्ये पावसाचे पाणी साठते. हा दगड जिथे संपून अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्ट खडक चालू होतो तेथे या खडकात टाकी खोदली जातात. अ‍ॅमेग्डोलाइड बेसॉल्टच्या थरात पाणी मुरत नाही तसेच त्याला भेगाही नसतात, त्यामुळे कॉम्पॅक्ट बेसॉल्टच्या फटी आणि पोकळ्यांमधून साठणारे पाणी झिरपत कडय़ाच्या पोटात असलेल्या टाक्यात येऊन साठते. किल्ल्यांवर पावसाळ्यानंतरही काही महिने या भेगांतून ठिबकणारे पाणी टाक्यात पडताना पाहायला मिळते. हे पाणी दगडातून झिरपत येत असल्यामुळे त्यात विविध क्षार विरघळलेले असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पाण्याला एक वेगळीच चव असते.

कडय़ांच्या पोटात कोरलेल्या टाक्यांची रचना साधारणपणे लेणींसारखी असते. काही काही टाक्यांत छताला आधार देण्यासाठी खांबही कोरलेले असतात. या टाक्यांचा फायदा म्हणजे ही टाकी बंदिस्त असल्यामुळे त्यात केरकचरा जाण्याचे प्रमाण कमी असते. पाणी खडकामधील भेगांमधून झिरपत असल्यामुळे त्यात गाळाचे प्रमाणही कमी असते. तसेच सूर्यकिरण थेट पाण्यावर पडत नसल्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही कमी होतो. अशा प्रकारच्या टाक्यांना ‘सातवाहन कालिन टाकी’ म्हणतात. पट्टा, प्रचितगड, भरवगड (शिरपुंजे) नायगावचा किल्ला इत्यादी अनेक पुरातन किल्ल्यांवर खांब टाकी पाहायला मिळतात.

दुसऱ्या प्रकारची टाकी डोंगरउतारावर, कडय़ाखाली, कातळावर उघडय़ावर कोरलेली असतात. जमिनीचा उतार, पाण्याचा निचरा होण्याचे नसíगक मार्ग यांचा अभ्यास करून ही टाकी कोरली जात. अनेक ठिकाणी पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी टाक्यांपर्यंत आणण्यासाठी जमिनीवरील कातळात चर खोदलेले पाहायला मिळतात. या टाक्यांत येणारे पाणी जमिनीवरून वाहात येत असल्याने सोबत गाळ, केरकचरा घेऊन येणे साहजिकच आहे. तो केरकचरा थेट टाक्यात जाऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या पाहायला मिळतात. काही ठिकाणी टाक्यात येणारे पाणी ज्या उतारावरून येते किंवा चरातून येते, तेथे कातळात रांजण खळगे खोदलेले असतात. गाळमिश्रित पाणी या खगळ्यातून जाताना स्थिर होते आणि त्यातील गाळ खाली बसतो. काही ठिकाणी एकाखाली एक टाकी खोदलेली पाहायला मिळतात. या रचनेमुळे पाण्याबरोबर येणारा गाळ पहिल्या टाक्यात जमा होतो. टाके भरले की स्थिर झालेले पाणी पुढच्या टाक्यात जमा होते.

अशा प्रकारे उघडय़ावर असलेल्या टाक्यांतील पाण्याचे सूर्यप्रकाश, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केलेले पाहायला मिळतात. टाक्यांच्या बाजूला बऱ्याचदा कातळात काही भोके केलेली दिसतात. त्यांचा उपयोग बांबू रोवण्यासाठी केला जात असे. त्यावर कापड टाकून पाण्याचे केरकचरा आणि बाष्पीभवनापासून संरक्षण होत असे. दुसरा उपाय म्हणजे एक सलग मोठे टाक खोदण्यापेक्षा लहान लहान टाकी खोदली जात. त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या पाण्याचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ (र४१ऋूंी अ१ीं) कमी होतो. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होत असे. या रचनेचा अजून एक फायदा म्हणजे एखाद्या टाक्यातले पाणी काही कारणाने खराब झाले (नासले) तरी बाकीच्या टाक्यातील पाणी वापरता येत असे.

याशिवाय काही किल्ल्यांवर वेगळ्या प्रकारची टाक आढळतात. नेरळच्या पेब ऊर्फ विकटगड आणि नाशिक जिल्ह्य़ातील गडगडा किल्ल्यावर टाक्यांची वेगळीच रचना पाहायला मिळते. या दोन्ही ठिकाणी कातळ कडय़ाखाली ३ फूट x ३ फूट आकाराचे चौकोनी भुयार खोदलेले आहे. या भुयारातून रांगत गेल्यावर भुयाराच्या टोकाला एक ऐसपस टाक खोदलेले पाहायला मिळते. हे टाक कायम पाण्याने भरलेले असते. देवगिरी किल्ल्याजवळ भांगसी नावाचा छोटासा किल्ला आहे. किल्ल्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी १० मिनिटे पुरेशी आहेत. पण या किल्ल्यावर सर्व प्रकारची टाकी पाहायला मिळतात. त्यातील एका टाक्याची रचना वैशिष्टय़पूर्ण आहे. या टाक्यात आयताकार खोदलेल्या मोठय़ा टाक्याच्या तळाला ४ चौकोनी खिडक्या (झरोके) कोरलेल्या आहेत. मुख्य टाक्यातील पाणी आटल्यावर टाक्याच्या तळाशी असलेल्या या ४ वेगवेगळ्या टाक्यात पाणी राहते. या झरोक्यांची तोंडे खोलवर आणि छोटी असल्यामुळे त्यातील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो. मराठवाडय़ातील लहुगड या किल्ल्यावर पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी टाक्याचे तोंड छोटे ठेवलेले आहे, पण आतल्या बाजूला टाक ऐसपस कोरलेले आढळते.

पाण्याची तुलना संपत्तीशी केली जाते. त्यामुळे बऱ्याच टाक्यांच्या िभतीवर कुबेराची प्रतिमा कोरलेली पाहायला मिळते. टाक्यात पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागत असल्यामुळे पाण्याच्या स्रोताचे पावित्र्य राखण्यासाठी टाक्यांच्या िभतीवर देवता कोरलेल्या असतात किंवा टाक्यांच्या परिसरात देऊळ किंवा मूर्तीची स्थापना केलेली असते. त्यामुळे त्या जागेची स्वच्छता राहण्यास आपसूकच मदत होते. पेब (विकटगडाच्या) टाक्याच्या िभतींवर कुबेराची प्रतिमा कोरलेली आहे. बाजूलाच पेबी देवीचे आणि शंकराचे मंदिर आहे. रायगडावरील पाण्याच्या टाक्यावर हनुमानाची मूर्ती कोरल्यामुळे ते हनुमान टाक म्हणून प्रसिद्ध आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच खराब होऊ नये यासाठी अनेक योजना केलेल्या पाहायला मिळतात. टाक्याच्या बाजूला दगडात एक-दोन फुटी गोल खड्डा कोरलेला असतो. टाक्यातीत पाणी त्यात काढून घेऊन मगच वापरण्याचा दंडक असे. अनेक किल्ल्यांवर टेहळणीच्या जागांवर टेहळ्यांची बसण्याची जागा असते तेथेही अशा प्रकारचे कातळात कोरलेले खड्डे पाहायला मिळतात. त्यात पाणके ठरावीक वेळेला येऊन पखालीतून पाणी भरून जात. त्यामुळे पाण्याचा अपव्यय तर टळत असे, तसेच पाण्यासाठी तरी टेहळ्यांना त्यांची जागा सोडण्याची गरज भासत नसे. काही पाण्यांच्या टाक्यांजवळ दगडाच्या डोणी असतात. त्यात पाणी काढून मगच वापरले जात असे. टाक्यातील पाणी वापरण्याबद्दलचे नियम काटेकोरपणे पाळले जात. या अशा उपाययोजनांमुळे दुष्काळाच्या काळातही पाणीसाठा पुरेसा असे.

पाण्याच्या टाक्यांच्या रचनेवरून तसेच त्यावर असलेल्या छिन्नीच्या घावांवरूनही टाक कुठल्या काळात खोदले असेल याचा ढोबळ अंदाज बांधता येतो. लेणी खोदण्यासाठी छिन्नी प्रथम सरळ आणि त्यानंतर आडवी ९० अंशांच्या कोनात चालवली जात असे. त्या कालखंडात खोदलेल्या टाक्यांवर उभ्या छिन्नीच्या खुणा पाहायला मिळतात. शिवकाळात छिन्नीचा घाव तिरका म्हणजेच ४५ अंशांत मारला जात असे. महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांवरची काही जुनी टाकी शिवकाळात रुंद केली गेली, वाढवली गेली त्यावर जुन्या भागात छिन्नीच्या उभ्या खुणा आणि वाढवलेल्या भागात तिरक्या खुणा पाहायला मिळतात.

पाण्याच्या टाक्याचा वापर जसा सृजनांसाठी केला गेला तसाच विध्वंसासाठीही पाण्याची टाकी कोरली गेली होती. त्याचे उत्तम उदाहरण रायगड किल्ल्यावर पाहायला मिळते. रायगडाच्या महाद्वारच्या वरच्या बाजूला कडय़ाच्या पोटात चार टाकी आहेत. शत्रू सन्याने जर रायगडाच्या महाद्वारापर्यंत धडक मारली तर ही टाकी फोडून टाकायची. या टाकीतील पाण्याचा लोंढा डोंगर उतारावरून येताना आपल्या सोबत दगड, माती, चिखल घेऊन येईल आणि दरवाजातील शत्रू वर धडकेल अशी योजना करण्यात आली होती.

किल्ल्यावरील पाण्यासाठी टाक्यांव्यतिरिक्त मोठमोठय़ा तळ्यांची रचनादेखील आपल्याकडे करण्यात आली होती. त्याचा आढावा पुढील लेखात..

सूर्यग्रहण याच स्थानात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसेल. स्वभावत: तुम्ही परोपकारी आहात, त्यामुळे बऱ्याच वेळेला सभोवतालच्या व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा गरफायदा उठवतात. व्यवसाय-उद्योगात जुनी देणी देणे, बिल भरणे वगरे गोष्टी व्यवस्थित सांभाळा. नोकरीमध्ये वरिष्ठ आणि सहकारी त्यांच्या  स्वार्थापोटी तुमची स्तुती करतील. प्रत्येक काम वेळेत उरकण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये अनपेक्षित कारणामुळे पसे खर्च करावे लागतील.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fort construction and importance of water
First published on: 04-03-2016 at 01:02 IST