मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com 

भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील एक अग्रणी नेते आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरू आज विस्मृतीत गेले असून, त्यांना आता इतिहासाच्या केराच्या टोपलीत टाकून दिलं गेलं आहे. आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. सध्याच्या सत्ताधारी मंडळींनी देशाच्या या पहिल्या पंतप्रधानांना त्यांच्या अत्युच्च आणि आदरणीय स्थानावरून लज्जास्पदरीत्या का व कसं खाली खेचलं, आणि नेहरूंनी आपल्याला दिलेला संपन्न वारसा नंतरच्या काळात कसा विस्मृतीत चालला आहे याचा ऊहापोह मी या लेखात करणार आहे. मात्र, प्रथम २७ मे रोजी येणाऱ्या त्यांच्या ५६ व्या पुण्यातिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहतो.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

नेहरू देशाच्या स्वातंत्र्यलढय़ातील एक प्रमुख नेते होते. मोहक व्यक्तिमत्त्व आणि देशासाठी केलेला त्याग या दोन्ही कारणांसाठी ते भारतीय जनतेचे दैवत झाले होते. या किंवा त्यांच्या आधीच्या पिढीतील अनेकांना माहीत नसेल की देश पारतंत्र्यात असताना त्यांनी जवळजवळ नऊ वर्षे ब्रिटिश राजवटीत कारावास भोगला होता. सुरुवातीला स्वातंत्र्यलढय़ातील एक तळपतं व्यक्तिमत्त्व म्हणून आणि नंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरू हे राष्ट्रभक्तांच्या जवळजवळ दोन पिढय़ांचे हीरो होते. ते अभिजनांचे लाडके होते याचे कारण त्यांच्या उत्तुंग राजकीय नेतृत्वाबरोबरच त्यांचं वैचारिक नेतृत्व हेदेखील होतं. ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ आणि ‘ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री’ ही दोन महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिली.

नेहरूंनी दिलेले मूल्यवान वारसे तसे अनेक आहेत. पण आजच्या संदर्भात जे मला जास्त महत्त्वाचे वाटतात त्या दोन वारशांबद्दल इथे मी बोलतो. एक म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या व जोपासलेल्या काही उत्तम संस्था. आणि दुसरं म्हणजे ज्या निष्ठेने, उत्साहाने आणि खंबीरपणे त्यांनी बहुचर्चित ‘सायंटिफिक टेम्पर’ (ज्याला आपण ‘विज्ञाननिष्ठा’ म्हणू.) रुजवण्याचा प्रयत्न केला, ते. ज्या अनेक लोकशाही संस्था आणि परंपरा त्यांनी स्वत: उभारल्या आणि ज्यांचं त्यांनी निगुतीनं संगोपन केलं, त्या आजही कशाबशा तग धरून आहेत. पैकी निवडणूक आयोग आणि कॅग (उअ‍ॅ) यांसारख्या काही संस्था सोडल्या तर (अलीकडे त्यांचाही ऱ्हास होताना दिसतोय.) इतर संस्थांचं पद्धतशीरपणे खच्चीकरण केलं जातंय. आणि काहींची वाटचाल तर ‘आयसीयू’च्या दिशेने सुरू झालेली आहे. यातला सगळ्यात मोठा उपरोध म्हणजे या भीषणावह परिस्थितीला नेहरूंचाच पक्ष प्रामुख्याने कारणीभूत आहे. (हा पक्ष सध्या त्याचं स्वत:चं अस्तित्व कसं टिकवावं, या संकटाचा सामना करतोय. आणि ही घसरण सुरू व्हायला त्यांची कन्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या घराण्यातले इतर सदस्यच जबाबदार आहेत. आणि १३५ वर्षांच्या या पक्षासाठी नेहरूंचा पणतू काय करतोय, असं विचारलं तर आपल्या नेतृत्वाखाली हा पक्ष विसर्जित करण्याची जबाबदारी जणू नियतीने त्याच्यावर टाकली आहे असं दिसतंय.)

शिक्षणाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्या मदतीनेच भारतीय समाजात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेचा सामना करता येईल असा ठाम विश्वास नेहरूंना वाटत होता. राष्ट्रीय प्रयोगशाळांची साखळी, बी. ए. आर. सी.,  आय. आय. टी. संस्था, इस्रो (करफड ही संस्था जरी प्रत्यक्षात १९७५ साली स्थापन झालेली असली, तरी त्याआधीच्या काळात नेहरूंनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यास कारणीभूत होते. या संस्थेची निर्मिती हा नेहरूंच्याच विज्ञाननिष्ठ विचारांचा परिपाक होता, हे आपण कदापि विसरून चालणार नाही.) आणि पहिल्या दोन आय. आय. एम्स आदी संस्थांच्या स्थापनेतून विज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन यांच्या क्रांतीची पायाभरणी नव्या भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी केली. आज मंगळयानासारखी एखादी अंतराळ मोहीम जेव्हा यशस्वी होते तेव्हा आपण यांसारख्या आद्य मूलभूत संस्थांच्या योगदानाचंदेखील कौतुक केलं पाहिजे. कारण त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची आणि वैज्ञानिकांची निर्मिती या संस्था गेली काही दशकं करीत आहेत.

आता ‘सायंटिफिक टेम्पर’च्या संदर्भात लोकांना फार कमी माहीत असलेली एक घटना मी सांगतो. साधारणत: १९३० च्या दशकाच्या सुरुवातीला नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची गांधीजींना चांगलीच चुणूक कशी पाहायला मिळाली ती ही घटना. १९३४ साली बिहारमध्ये मोठा भूकंप झाला होता. ‘अस्पृश्यतेच्या पापामुळे देवाने ही शिक्षा दिली..’ या दृष्टिकोनातून गांधीजी या घटनेकडे बघत होते. तर आपल्या या आध्यात्मिक आणि राजकीय गुरूला नेहरूंनी फार मोठय़ा धैर्याने त्यांची चूक दाखवून देत म्हटलं, ‘‘माणसाच्या एखाद्या प्रथेमुळे पृथ्वीच्या भूकवचात हालचाल होते असं म्हणणं ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.’’ आणि आज नेहरूंच्या मृत्यूनंतर केवळ सहा दशकांतच देशाचे धुरिण असलेले राजकीय नेते गणपती आणि कर्ण ही पुराणांतील उदाहरणं देत आपले पूर्वज प्लास्टिक सर्जरी आणि रिप्रॉडक्टिव्ह जेनेटिक्स या विषयांतले कसे तज्ज्ञ होते याचे बिनडोक दावे करताहेत. माझ्याप्रमाणेच तुम्हीदेखील नेहरूंचे चाहते असाल, पण त्यांचे अंध भक्त नसाल तर या थोर माणसाने आपल्या पंतप्रधानपदाच्या १४ वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत बऱ्याच चुका केल्या, हेही आपल्याला मान्य करावे लागेल. काश्मीर, चीन, सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील चुकीची धोरणं, मुस्लीम समाजाची केलेली तथाकथित भलामण अशा काही गंभीर चुकादेखील त्यामध्ये होत्या; (यापैकी पहिल्या दोन Himalayan Blunders होत्या.) की ज्यांची फार मोठी किंमत देश आजही चुकवतो आहे. (त्यांच्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, त्यामुळे घराणेशाहीचा आरोप त्यांच्यावर सहजपणे चिकटवता येणार नाही.) हे सगळं असूनसुद्धा देशभक्त आणि नि:पक्षपाती विचार करणाऱ्या करोडो भारतीयांना मला नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे ‘‘या माणसाच्या चुका इतक्या प्रचंड आहेत का, की त्यांना एक ‘काळिमा फासणारं व्यक्तिमत्त्व’ ठरवून इतिहासातील त्यांचं योग्य स्थान देखील आपण त्यांना नाकारावं? इंग्रजीत म्हणायचं झालं तर मी म्हणेन.. By all means, paint him warts and all, but for God’s sake, don’t consign him to the dustbin of history. That would be height of  cruelty. बऱ्याचदा अतिशय अन्यायकारक रीतीनं, कधी कधी उगीचच कठोरपणे आणि कधी कधी बेलगामपणे इतिहासातील थोर महापुरुषांचा निवाडा आपण करत असतो, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. कित्येक वेळा ही व्यक्तिमत्त्वं त्यांनी भावी पिढय़ांसाठी ठेवलेल्या समृद्ध वारशापेक्षा त्यांच्या काही गोष्टींतील अपयशासाठी, दोषांसाठी आणि त्यांच्या आयुष्यातील कमकुवत क्षणांसाठीच आपल्या लक्षात राहतात. नेहरूंच्या बाबतीत हेच घडलं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांना जवळजवळ समकालीन असलेले नेते गांधीजी, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, राजाजी, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वाना इतिहासाने न्याय दिला.. त्यांचं योग्य रीतीने मूल्यमापन केलं. परंतु या सर्व महान नेत्यांच्या मानाने पंडित नेहरू मात्र उपेक्षित आणि सर्वात जास्त अपमानित झालेले दिसतात.

भारताच्या निधर्मी संविधानाशी नेहरूंची ठाम बांधिलकी होती. सध्या देशात सत्तेवर असलेला पक्ष जरी या बांधिलकीचा पुनरुच्चार तारसप्तकात करीत असला, तरीही त्यांना ज्या प्रकारच्या राष्ट्राची निर्मिती करावयाची आहे, ते निधर्मी निश्चितच नाहीए.

नेहरूंनी पाठपुरावा केलेलं आर्थिक विकासाचं मॉडेल सबंध जगभरात अयशस्वी ठरलं. मी ज्याचा अगोदर उल्लेख केला त्या त्यांच्या चुकांमुळे देशाचं खूप नुकसान झालं आणि अपायकारक अशा घराणेशाहीचा पूर्वाधिकारी अशी त्यांची झालेली प्रतिमा (ती बरोबर आहे, पण अंशत:च!).. या सर्व गोष्टी म्हणजे ‘नेहरू विध्वंस’ पथकाच्या हातात मिळालेलं कोलीत ठरल्या आहेत. सरदार पटेल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर त्यांची सतत तुलना करत, ते देशाचं नेतृत्व करण्यात कसे कमी पडले, हे दाखवून देण्याची चलाख क्लृप्ती या मंडळींनी वापरली. शिवाय स्वातंत्र्यानंतर भारतात जे जे काही चुकीचं घडलं, त्या सर्वाचं खापर अथकपणे त्यांच्या डोक्यावर फोडून त्यांनी नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाला जवळजवळ खग्रास ग्रहणच लावलं आहे.

‘आई-वडिलांची पापं त्यांच्या मुलांना भोवतात’ अशा आशयाचं बायबलमध्ये एक वचन आहे. नेहरूंच्या बाबतीत या वचनाच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती उद्भवली असं वाटतं. इंदिरा, संजय, राजीव, सोनिया, राहुल, प्रियंका आणि रॉबर्ट वड्रा (अगदी ताणून घेतलं तर!) यांची एकत्रित पापं नेहरूंना भोवताहेत की काय असं वाटतं.

आज तर पंडितजींची खास ओळख असलेलं ‘नेहरू जॅकेट’देखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत असं वाटत होतं की नेहरूंचा वारसा म्हणून निदान ‘नेहरू जॅकेट’ तरी शिल्लक राहील. परंतु जवळजवळ १९३० पासून असंख्य राजकारणी लोकांच्या पोशाखाचा अविभाज्य भाग असलेल्या ‘नेहरू जॅकेट’ची जागा आता ‘मोदी जॅकेट’ने घेतली आहे. (दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी अशी वेगवेगळ्या रंगांची चार जाकिटं दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेट दिली  होती आणि त्यांनाही ती खूप आवडली होती.) नेहरूंचा समस्त वारसा इतक्या वेगाने उद्ध्वस्त केला जातोय, की भविष्यातील एखाद्या इतिहासकाराला १९ व्या शतकातील उर्दू कवी अमीर मिनाई (१८२८-१९००) यांच्या पुढील ओळी उद्धृत कराव्याशा वाटतील.

‘हुवे नामवर बे-निशान कैसे कैसे

जमीं खा गयी आसमां कैसे कैसे’

सुशील आरोन या भारतीय स्वतंत्र पत्रकाराने आधुनिक भारताच्या इतिहासात नेहरूंच्या भूमिकेचं आणि त्यांच्या अनन्यसाधारण स्थानाचं वर्णन पुढील शब्दांत केलं आहे. या वादग्रस्त विषयाचं इतकं  वाजवी, समतोल, अचूक आणि इतक्या मोजक्या शब्दांत केलेलं आकलन माझ्या तरी पाहण्यात अन्यत्र आलेलं नाही.

“His was truly a full life lived for India – and there is scarcely any public institution or aspect of the republic that Nehru did not shape or influence. There is plenty in his legacy to both celebrate and contest. belitting his role – or worse, forgetting him- only betrays India’s  degradation, even if it can not alter Nehru’s place in history.”

आणि आता जाता जाता.. परवाच माझ्या एका मित्राने एक थक्क करणारं निरीक्षण माझ्याकडे नोंदवलं. तो म्हणाला, ‘‘पंडित नेहरूंचं जर लेडी एडविना माऊंटबॅटनबरोबर प्रेम प्रकरण झालं नसतं तर आज आपण ‘अखंड भारता’त राहत असतो.’’ यावर मी त्याला म्हणालो, ‘मित्रा, तुझ्या या भन्नाट भाष्यावरून मला १७ व्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच वैज्ञानिक, लेखक व विचारवंत पास्कल याचं एक वाक्य आठवलं. तो म्हणाला होता- क्लिओपाट्राचं नाक जर थोडंसं आखूड असतं तर अख्ख्या जगाचा चेहराच बदलला असता.’’ तर फारसं वाचन नसलेला माझा हा मित्र उद्गारला, ‘‘अरे, काय सांगतोयस काय, नेहरूंचं आणखी एका फिरंगी बाईबरोबर प्रेम प्रकरण होतं? हे मला माहितीच नव्हतं.’’

शब्दांकन : आनंद थत्ते