कुणी काय करावं आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला, तरी सार्वजनिक ठिकाणी मोबाइलसह वावरताना लोकांचे समाजभान सुटत चालल्याचे नजरेस येते. कंपन्यांकडून प्रलोभनांसह दिला जाणारा अतिरिक्त डाटा संपविण्याच्या नादात गाणी-क्लिप्स-रील्स मोठ्या आवाजात वाजवत राहणारे आबालवृद्ध कुठेही दिसू शकतात. दुसऱ्याच्या शांततेला तडा देण्याची मानसिकता आपल्यात मोबाइल डेटाने तयार केली. येत्या काळात ट्रेन-बस-रिक्षा कुठेही हाणामारीला आमंत्रण ठरू शकणाऱ्या या समस्येवर समाज अभ्यासिकेचा दृष्टिकोन, त्यासह एका विदातज्ज्ञाची मतं..

नुकतीच पुण्यात घडलेली घटना. नशेत असलेल्या मुलींचा ‘समाज जागरूकते’च्या नावाखाली व्हिडीओ काढण्यात आला आणि तो व्हायरल झाला. मुलींचे चेहरे ‘ब्लर’ नसल्यानं बरेच प्रश्न उपस्थित झाले. पण हे काही पहिल्यांदाच घडलं अशातला भाग नाही. सगळ्यांच्या हातात फोन, त्यात उत्तम दर्जाचे कॅमेरे, फोटो आणि व्हिडीओ काढण्याच्या सोयी, त्याच फोनमध्ये सोशल मीडिया; त्यामुळे काही सेकंदांत अपलोड, त्याच फोनमध्ये चॅटिंग, गेमिंग, पॉर्नपासून ओटीटी फलाटापर्यंत आणि अध्यात्मापर्यंत सगळं सगळं ठासून भरलेलं आहे. या सगळ्याचा उपभोग घेत असताना नैतिकता धाब्यावर बसवली जाते, शिष्टाचारांचा विचार मागे पडतो. प्रत्यक्ष जगातल्या मूल्यांचं ऑनलाइन जगात गेल्यावर करायचं काय हे समजत नाही आणि चिक्कार गोंधळ उडतो. असला गोंधळ गेल्या काही वर्षांपासून आपल्याला आजूबाजूला दिसतो आहे.

हेही वाचा – भाषागौरव कशाचा?

सकाळी चालायला बाहेर पडा, कुणीतरी ज्येष्ठ नागरिक हातातल्या फोनमधला रेडिओ मोठ्याने ऐकताना आणि इतरांना (गरज नसताना) ऐकवताना दिसतात. त्यांना इयर फोन घालणं सोयीचं नसेल हे समजू शकतं, पण ते किती जोरात ऐकावं याचं भान अनेकदा सुटलेलं असतं. हे फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत नाही, तर विविध वयोगटांत हा प्रश्न सारखाच दिसतो. मोबाइलवर काहीतरी सतत मोठ्यानं ऐकत राहायचं, मग कुठेही असा, लोकलमध्ये, घरात, जॉगिंग ट्रॅकवर नाहीतर हिमालयात ट्रेकिंग करत असा.. मोठ्यानं ऐकलं पाहिजे हा जणू अलिखित नियम झाला आहे. तेच बोलण्याबाबत. सगळ्या जगाला आपल्या कर्मकहाण्या समजल्या पाहिजेत अशा आविर्भावात माणसं सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने बोलत असतात. घरातले, ऑफिसमधले प्रश्न, समस्या इथपासून लग्नाबाहेरची प्रकरणं.. सगळं बिनधास्त, बिनबोभाट. रात्रीच्या वेळी वाढदिवस साजरे करण्याच्या नावाखाली एखाद्या चौकात चारचाक्या थांबवून मोठ्यानं गाणी लावत वाढदिवस साजरा करणं, तेव्हा गावात नसलेल्या मित्रमैत्रिणींशी ऑनलाइन व्हिडीओ कॉल करून मोठ्यानं गप्पा मारणं, हे सगळं साधारण रात्री १२ नंतर.. आपण ज्या रस्त्यावर आहोत तिथं आजूबाजूला राहणारे लोक झोपलेले असतील याची कसलीही तमा न बाळगणं हे अगदी ‘कॉमन’ झालेलं आहे. वर हिमालयाचा उल्लेख केला आहे, तो तर माझा स्वत:चा अनुभव आहे. हिमालयाच्या त्या नि:शब्द परिसरात आपण मनानं, विचारानं हिमालयाशी एकरूप झालेलो असतो, त्या निरव शांततेचा भाग झालेलो असतो आणि कुणी एक ट्रेकर स्वत:बरोबर आणलेल्या पोर्टेबल स्पीकरवरून ‘चिकनी चमेली’ गाणं भल्या मोठ्या आवाजात ऐकत येतो. अशा वेळी काय वाटतं हे शब्दात सांगणं कठीण आहे.

कुणी काय करावं आणि काय करू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण सार्वजनिक ठिकाणी आपल्या वर्तनामुळे इतरांना त्रास होता कामा नये इतपत काळजी घ्यायला हवी हेही आज अनेकांच्या लक्षात येत नाही. आणि याला कारण हातात असलेला स्मार्ट फोन, त्यात असलेलं इंटरनेट आणि स्वस्त डेटा. या तिन्ही गोष्टी सहज उपलब्ध असल्यामुळे आपला त्यात किती आणि कसा वेळ जातो याचं भान हळूहळू सुटायला लागलेलं आहे. मग दुसऱ्या कुणाच्या तरी मुलींचे व्हिडीओ व्हायरल करताना त्यांचे चेहरे ‘ब्लर’ केले पाहिजेत हे आपल्याला समजत नाही, चारचौघांत मोठ्यानं बोलून, मोबाइलवर काहीबाही ऐकून आपण इतरांना त्रास देतो हे लक्षात येत नाही आणि ऑनलाइन जगात आपण ‘ट्रोल’ होतोय हेही जाणवत नाही. इंटरनेट आणि मोबाइलचे अनेक फायदे आहेत, त्यातला सगळ्यात मोठा तोटा हाच आहे की आपलं भान आणि विवेक आपण गमावत चाललो आहोत.

ऑनलाइन शिष्टाचारांचं काय?

ऑफलाइन जगात कसं वावरलं पाहिजे याचे काही नियम आपण पाळतो. हल्ली आपल्यापैकी अनेक जण वर म्हटल्याप्रमाणे त्याचीही तोडमोड करतात; पण तरीही सर्वसाधारणपणे आपण ते पाळतो. आपल्याला कुणीही ते समोर बसवून, पाठ घेऊन शिकवत नाही. तर आपण वाढत असताना आपल्या आजूबाजूच्या मोठ्यांचं जग बघत बघत, चुकतमाकत ते शिकतो. ऑनलाइन जगात वावरण्याचेही काही नियम असतात. शिष्टाचार असतात. खरं तर आपण जसं ऑफलाइन जगात वावरतो तसंच ऑनलाइन जगात वावरणं अपेक्षित आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण चोरी करत नाही, तसंच ऑनलाइन जगातही इतरांच्या मजकुराची, तपशिलांची चोरी करणं अपेक्षित नसतं. सर्वसाधारणपणे आपण ऑफलाइन जगात कुणावर शाब्दिक हल्ले चढवत नाही, अपमान करत नाही, लैंगिक छळ करत नाही (जे करतात ते गुन्हेगारच असतात, त्यांच्याविषयी चर्चा नाही.) आपण एकमेकांशी किमान सभ्यता राखून वागतो. ऑनलाइन जगात गेल्यावरही तेच अपेक्षित असतं, पण तसं घडताना दिसत नाही. त्या ब्लॅक स्क्रीनसमोर माणसं मानसिक आणि सामाजिक संदर्भात नग्न होतात. ती प्रत्यक्ष कपडे उतरवत नाहीत, पण भाषा उतरवतात, वर्तन उतरवतात. जे प्रत्यक्ष जगात आपण करणार नाही ते अनेक जण ऑनलाइन जगात सहज करतात. हे करत असताना आपण काहीतरी चुकीचं करतोय हेही त्यांच्या लक्षात येत नाही. का आपण एखाद्या स्त्रीचा शाब्दिक बलात्कार करायचा? आणि तसं वर्तन ज्यांना योग्य वाटतं त्यांनी लगेचच मनोसामाजिक मदत घेणं आवश्यक आहे. कारण ते मानसिक पातळीवर आजारी आहेत.

कान-डोळे-मेंदू बंद झालेले रोबो..

माणसांचे रोबो झालेत असं कधी कधी वाटतं. एकदा का मन-मेंदू त्या मोबाइलच्या म्हणजे आभासी जगात शिरला की आपले कान-डोळे-मेंदू बंद पडतात. शेजारी बसलेला माणूस काय सांगतोय ते ऐकू येत नाही. ऐकू आलं तरी मेंदूपर्यंत पोचत नाही. समोर एखादा अपघात झाला तर मदत करण्याआधी त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्याची आज्ञा मेंदू देतो आणि निर्जीव रोबोसारखी माणसं वागायला लागतात. ‘एकमेकांना मदत करणं’ हे अत्यंत मूलभूत मानवी मूल्य आपण विसरून जाऊ की काय ही भीती वाटावी अशी परिस्थिती कधी कधी वाटू लागते. आभासी जगात माणूस शिरला की वास्तवाचं भान हळूहळू सुटायला आणि निसटून जायला लागू शकतं. अनेक वाढत्या मुलामुलींमध्ये प्रत्यक्ष प्रतिमा आणि ऑनलाइन प्रतिमा यांची गल्लत बघायला मिळते. आपण खरे नक्की कोण आणि कसे आहोत हे समजेनासं होतं. शिवाय ऑनलाइन जग एक प्रकारचा एकलकोंडेपणा घेऊन येतो- आयसोलेशन. बँकिंगपासून पॉर्नपर्यंत आणि अध्यात्मापासून मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या मोबाइलमध्ये प्रत्येकाला उपलब्ध असल्यामुळे एकमेकांची मदत लागणं, एकत्र येऊन एखादी गोष्टी करणं, एकमेकांबरोबर गोष्टी शेअर करणं झपाट्यानं कमी होतंय. कुणाला कुणाची गरज न उरणं हे मानवी स्वभावाच्या विपरीत आहे. आपण असं मानतो की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. अशात आपल्याला जर एकमेकांची गरजच उरली नाही तर मानसिक आणि सामाजिक पातळीवर काय काय होऊ शकतं त्याचे बारीकसारीक तुकडे हल्ली आपल्या आजूबाजूला बघायला मिळतात. उदा. जेवायला एकत्र गेलेलं कुटुंब मोबाइलमध्ये रमल्यामुळे एकमेकांशी एक शब्दही न बोलता किंवा जुजबी बोलून जेऊन घरी परततं. हे आयसोलेशन महाभंयकर आहे याची जाणीव जितक्या लवकर होईल तितकं उत्तम.

जाणिवा बोथट झाल्या?

आभासी जगाचा अजून एक मोठा परिणाम म्हणजे जाणिवा बोथट होत जाणं, नजर मरणं. जे पुण्यातल्या व्हायरल व्हिडीओत बघायला मिळालं. चेहरे ‘ब्लर’ न करता व्हिडीओ अपलोड केल्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार व्हिडीओ अपलोड करताना झाला नाही. व्हिडीओत चेहरे ब्लर करून मुलींची ओळख खुली केली नसती तरी चाललं असतं. तरीही विषयाची दाहकता पोहोचू शकली असती. पण आभासी जग हा विचार करण्याची उसंत अनेकदा देत नाही. आणि हे फक्त याच एका घटनेत नाही तर अनेक घटनांमध्ये बघायला मिळालं आहे. अगदी लहान मुलांच्या व्हिडीओतही फोटो थेट उघड केले जातात. आभासी जगातल्या वर्तनाचे काय परिणाम होऊ शकतात हे अनेकदा माणसांच्या लक्षातच येत नाही. यामागे एकतर माध्यम असाक्षरता हा मुद्दा असतो किंवा आभासी जगाचा जो वेग आहे त्यात स्वत:च्या जाणिवांकडे लक्ष द्यायला, भान शाबूत ठेवायला वेळच मिळत नाही आणि आपण जे करतोय ते बरोबर आहे असं वाटायला लागतं.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृष्टिकोनातला बदलकार..

सीसीटीव्ही व्हिडीओज हा प्रकार अतिशय प्रसिद्ध आहे. हे व्हिडीओ बहुतेकदा हिंसा, अत्याचार, अन्याय, लैंगिक छळ यांच्याशी संबंधित असतात. हे फुटेज बघून बघून माणसांची नजर मेलेली आहे. एखादा अत्याचाराचा, छळाचा व्हिडीओ लाखो, करोडो व्ह्यूज घेऊन जातो यातच काय ते आलं. माणसांना हिंसा बघायला आवडते हे आभासी जगातले हे व्हिडीओ प्रसिद्ध होण्याने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. हैदराबाद बलात्कार केसमध्ये बलात्काराचा व्हिडीओ पॉर्न साइट्सवर शोधण्यात आला होता यावरून आपण कोणत्या दिशेने जात आहोत, आपल्या मुलांना कोणत्या दिशेने जायला भाग पाडतो आहोत याचा विचार ज्यानं त्यानं करायला हवा आहे.

साधा मुद्दा आहे, आभासी जग आपल्यासाठी आहे की आपण आभासी जगासाठी आहोत?
विचार करा!

नागरिकांची मश्गूलता..

आपल्या परिसरातील समस्या, अडचणी यांचा विसर मोबाइलप्रेमी नागरिकांना पूर्णपणे पडला आहे. यात सर्वच वयातील व्यक्तींचा समावेश करता येईल. तासचे तास रील्स, मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, क्लिप्समधील निरर्थकतेत व्यतित केल्यानंतरही मोबाइलचं व्यसन आपल्याला लागलं नाही या भ्रमात सारे राहतात. अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधींनी व्यक्ती ग्रस्त झाल्या तरी मोबाइलमधील मश्गूलता काही कमी होत नाही.

शांतता भंग करणाऱ्या फौजा..

गेल्या वर्षी झालेल्या एका राष्ट्रीय पाहणीत देशातील प्रत्येक मोबाइलधारी व्यक्तीचं महिन्याचं सरासरी डेटाग्रहण १९ जीबीच्या वर गेले असून, त्यात दर वर्षी किमान तेरा टक्क्यांची वाढ होत असल्याचं नमूद केलं आहे. दिवसाला मोफत मिळणाऱ्या अमुक जीबीचा डेटा संपविण्याच्या नादात सार्वजनिक ठिकाणी मोबाइल कसा हाताळावा, याचं नागरिकांचं भान पूर्ण सुटत चाललं आहे. मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये असो किंवा कुठल्याही शहराच्या परिवहन सेवांमध्ये मोबाइल मोठ्या आवाजात लावून इतरांची शांतता भंग करणाऱ्या फौजाच दिसतात. पुढील काळात सार्वजनिक स्थळांवर शांततेसाठी हाणामाऱ्या झाल्या तर ते नवल नसेल.

muktaachaitanya@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आणि ‘सायबर मैत्र’च्या संस्थापिका आहेत.)