प्रकाशक हरिभाऊ मोटे यांच्या आत्मचरित्रावरील पत्रांचे डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेले ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल’ हे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील अंश..
हरिभाऊ मोटे हे मराठीतील एक ख्यातनाम प्रकाशक. धाडसी निर्णय घेऊन हरिभाऊंनी आगळीवेगळी पुस्तके प्रकाशित केली. विभावरी शिरुरकर, विश्राम बेडेकर अशा लेखकांची पुस्तके त्यांनी काढली. प्रकाशनव्यवहार आणि सिनेव्यवसाय या दोन्ही क्षेत्रांत तन-मन-धन पणाला लावून ते जुगार खेळले. ‘सर्वमंगल क्षिप्रा’ या त्यांच्या आत्मचरित्रात ते सारे आलेले आहे. हरिभाऊंना पत्रसंग्रहाचे वेड होते. महाराष्ट्रातील मान्यवरांची पत्रे ‘विश्रब्ध शारदा’ या त्रिखंडात्मक ग्रंथात त्यांनी एकत्र करून प्रसिद्ध केली. ‘सर्वमंगल क्षिप्रा’ या आत्मचरित्रावर अनेक मान्यवरांनी पत्रे लिहिली. त्यातील हे एक पत्र-
‘क्षिप्रा’तील काही भाग प्रकाशित होण्यापूर्वी हरिभाऊंनी पु. ल. देशपांडे यांना वाचायला दिला होता. त्यांनी प्रतिक्रियात्मक उत्तर लिहिले होते. काही लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून प्रसिद्ध व्हावेत यासाठी मोटे यांनी संपादक गोविंद तळवलकर यांच्याकडे पाठविले होते. तळवलकरांनी त्यांचा अभिप्राय कळविला होता. पुढे ‘सर्वमंगल क्षिप्रा’तला काही भाग ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये क्रमश: प्रसिद्ध झाला आणि त्याने वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेतली. पुस्तकाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्यांनी हरिभाऊंना प्रतिक्रिया देणारी पत्रे पाठविली. यातून आत्मचरित्राविषयी पत्रे गोळा करण्याची कल्पना हरिभाऊंच्या मनात आणखी दृढ झाली असावी.
पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर काही स्नेह्यंची, परिचितांची पुस्तकाविषयी मते मांडणारी पत्रे आपणहून आली. हरिभाऊंवरील प्रेमामुळे! तीही खूप काही सांगणारी आहेत. काहींनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेली प्रकरणे वाचून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले ‘क्षिप्रा’विषयीचे मनोगत वाचून आपले मत कळवले. काहींना व्यावसायिक कामाकरिता दुसऱ्या शहरात गेल्यानंतर ‘क्षिप्रा’ मिळाले. त्यांनी ‘क्षिप्रा’ उत्स्फूर्तपणे वाचून हरिभाऊंना लिहिले. लिहिणाऱ्यांच्या अशा नाना तऱ्हा! अनाहूतपणे आलेली पत्रे संक्षिप्त असली तरी वेधक आहेत. सामान्य माणूस साहित्य का वाचतो, पुस्तकांची निवड कशी करतो, ते या पत्रांतून लक्षात येते. काही यथोचित, मार्मिक निरीक्षणे आणि विधाने हाती लागतात. थोडक्यात, पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर काय घडते, ते या पत्रव्यवहारातून कळते.
पण हरिभाऊंना काही खास व्यक्तींच्या- विशेषत: थोर साहित्यिकांच्या प्रतिक्रिया हव्या होत्या. म्हणून त्यांनी काही निवडक माणसांना पत्र लिहून पुस्तकाची प्रत भेट म्हणून पाठविली. श्री. गो. वि. करंदीकरांनी (विंदा करंदीकर) जे अभिप्रायात्मक उत्तर पाठविले आहे त्यात हरिभाऊंनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. ‘तीस-चाळीस ओळींत आपले मत परखडपणे कळवावे असे आपण पत्रात लिहिलेत व चिथावणी दिलीत..’ असे करंदीकर म्हणतात. या चिथावणीमुळे जाणकारांनी ‘क्षिप्रा’बद्दलची मते हरिभाऊंना पत्राने कळविली. विंदा करंदीकर पत्रात म्हणतात-
‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दल या आत्मचरित्राविषयी बरीच पत्रे हाती लागली. कमलाबाई टिळक, सुमती देवस्थळे, गिरिजा कीर, वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), जयवंत दळवी असे लेखक, गोविंद तळवलकर, वा. वि. भट असे संपादक, डॉ. र. वि. हेरवाडकर, रा. प्र. कानिटकर, डॉ. व. दि. कुलकर्णी इत्यादी समीक्षक अशा अनेकांनी विस्तृत पत्रे लिहून ‘सर्वमंगल क्षिप्रा’बद्दलच्या प्रतिक्रिया हरिभाऊंना कळविलेल्या आहेत. या पत्रसंग्रहाचे संपादन होणे वाङ्मय व्यवहारासाठी गरजेचे होते.
‘सर्वमंगल क्षिप्रा’वरील पत्रव्यवहार सांस्कृतिक दस्तावेज आहे. पत्रे बोलकी असतात. ती भूतकाळाबद्दल बोलतात. त्यांना वर्तमानकाळाचा संदर्भ असतो. ती भविष्याचे विविधरंगी सूचन करतात. पत्रव्यवहाराची मौलिकता यातून लक्षात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर
दि. ७- ८- ८१
प्रिय हरिभाऊ,
सा. न. वि. वि.
मी सहज लिहायला बसलो. प्रिय लिहून टाकले. भावना तीव्र झाल्याचे द्योतक.
आता सायंकाळचे ५ वाजले आहेत. गेले तीन दिवस ‘सर्वमंगल क्षिप्रा’च्या नादात होतो. आता या क्षणी ते हातातून सोडले. पेन घेतले. लिहायला हवे, उशीर नको.
‘क्षिप्रा’ मला अति-अति आवडले. त्यातला अलिप्त आपलेपणा ही साधनेची परिणती. ती आयतीच हाती आली. संयत भाषाही आयतीच सर्व शोभवून गेली. स्वच्छंद, व्याप, पसारा यांनाही गोमटे, गोजीरवाणे रूप आले. छान वाटले. आनंद झाला..
खूप लिहिले तरी शब्दच वाढतील. आशय हाच!
आपला
वामन चोरघडे

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarvmangal shipra book
First published on: 13-03-2016 at 01:30 IST