पीयूष मिश्रा

कविता लिहिणारे आणि विविध चित्रपटांतून रांगडा खर्जातला आवाज तसेच कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर नोंदले जाणारे लोकप्रिय अभिनेते पीयूष मिश्रा यांनी ‘लोकसत्ता गप्पा’च्या मंचावर आपला नजरिया नि:संदिग्धपणे मांडला. कवी आणि अभिनेते ओम भूतकर यांनी त्यांना बोलतं केलं. कलाकार म्हणून जडणघडण, अभिनयाविषयी चिंतन, रंगभूमीचं ऋण, राजकीय मतं आणि विपश्यनेचे महत्त्व अशा अनेक बाबींचा पट या निमित्ताने समोर आला..

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई

लाहौर के उस

पहले ज़िले के

दो परगना में पहुँचे

रेशम गली के

दूजे कूचे के

चौथे मकाँ में पहुँचे

औ’ कहते हैं जिसको

दूजा मुल्क उस

पाकिस्तां में पहुँचे

लिखता हूँ ख़त में

हिन्दोस्ताँ से

पहलू-ए हुसना में पहुँचे

ओ हुसना..

+++

शाम की महफ़लि रात अँधेरे

राख बनी मिट्टी होती

ठंडी ग़ज़लें सर्द नज्म्म

बस एक शेर सुलगा होता

आग गई और ताब गई

इंसाँ पग्गल-सा नाच उठा

काश कि कल की तरह आज भी

मैं बिफरा-बिफरा होता..

मी आठवीत होतो. अंतर्मुख स्वभावाचा होतो. फारसा कुणात मिसळत नसे, बोलत नसे. भित्राही होतो. साहजिक माझ्या आयुष्यात कुटुंबाशिवाय अन्य कुणीही नव्हतं. आईचे कष्ट मी बघत होतो. तिनं तिच्या आयुष्यात खूप अन्याय सहन केला. सारं मूकपणे सोसत राहायची. मी तिला विचारायचो, ‘‘कशाला एवढा अन्याय सहन करतेस?’’ त्यावर ती शांतपणे एवढंच म्हणे, ‘‘बेटा, कमीत कमी जिवंत तरी राहते.’’

तिच्याचकडे पाहून मी माझी पहिली नज्म्म लिहिली. ती कशी आली, ते मला ठाऊक नाही. सांगताही येणार नाही. पण आज मी मागे वळून बघतो, तेव्हा माझंच मला नवल वाटतं आणि प्रश्नही पडतो, इतकी परिपक्व नज्म्म आपण त्या वेळी कशी काय बरं लिहू शकलो?

ज़िदा हो हाँ तुम कोई शक नहीं

साँस लेते हुए देखा मैंने भी है

हाथ और पैरों और जिस्म को हरकतें

खूब देते हुए देखा मैंने भी है

अब भले हो ये करते हुए होंठ तुम

दर्द सहते हुए सख्म्त सी लेते हो..

आमच्या कुटुंबात सर्वचजण सामान्य कुवतीचे, बुद्धिमत्तेचे होते. मी चित्रकार, गायक, संगीतकार, अभिनेता सगळंच होतो. मी व्हायोलिन वाजवायचो, सतारही वाजवायचो. मला सगळंच करायचं होतं. जमायचंही, पण मला समजून घेणारं कुणीच नव्हतं. मी लिहिलेली ही नज्म्म घरी वाचून दाखवली तेव्हा त्यावर त्यांची प्रतिक्रिया ‘यह कहाँ से चुराकर लाये हो?’ अशी होती. कुणाचा विश्वासच बसेना.

ही नज्म्म मीच लिहिली आहे, हे त्यांना पटवून द्यायला, मला फारच कष्ट झाले. मी लिहितच राहिलो. कुठेही ‘हे तुम्ही कसं लिहिलंत’, असं मला विचारलं जातं तेव्हा मी म्हणतो, ‘मला गाणी रचणं सहज जमतं.’

इक बगल में चाँद होगा, इक बगल में रोटियाँ

इक बगल में नींद होगी, इक बगल में लोरियाँ

हम चाँद पे रोटी की चादर डाल कर सो जाएँगे

और नींद से कह देंगे लोरी कल सुनाने आएँगे

हीदेखील मी सहज लिहिली होती. कुठल्याही प्रयत्नांशिवाय. मी लिहून मोकळा होतो. त्यामागे कुठलीच विशिष्ट कारणमीमांसा नसते. सगळीच कामं मी एका धुनकीत केली. ती करून मोकळा झालो. दुसरं असं की, मला लेखन करण्यासाठी शांततेची, कुठल्यातरी अन्य निर्मनुष्य वगैरे ठिकाणी जाण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. मी गर्दीत, गोंगाटातही लिहू शकतो. मुलांशी बोलताना, फोनवर बोलताना, कामं करताना माझ्या विचारांत खंड पडत नाही. त्यामुळेच सभोवती कितीही व्यत्यय असला तरी मी लिहू शकतो. शिवाय मी दारू पिऊन कधीही लेखन केलेलं नाही. एक ओळही नाही. लिहिताना चहा मात्र जास्त लागतो. माझ्या अनेक मित्रांना हे खोटं वाटतं. त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. मी त्यांना सांगून, समजावून थकलो की नशा करून तुमची सृजनशक्ती जागृत होऊ शकत नाही. चरस, गांजा वा दारू पिऊन तुम्ही उत्तम अभिनय करू शकाल किंवा गाणं लिहू शकाल, असं अजिबात नाही. मी नाही मानत.

लिहिल्यानंतर मी कुणा एका खास व्यक्तीला वाचूनही दाखवत नाही. तसं कुणी नाही. मी लिहून शांत बसतो. अगदी आतून वाचून दाखवावंसं वाटलंच, तर त्या वेळी जी कुणी व्यक्ती सोबत असेल, तिला वाचून दाखवतो. पण वाचलं नाही तर जीव वगैरे जायची पाळी येईल, असं माझ्याबाबतीत अजिबात होत नाही. मी कशाहीबद्दल आग्रही नाही. आताशा तर काहीच करू नये, असं वाटत राहतं. जेव्हापासून मी ध्यानाचा अभ्यास करू लागलो, तेव्हापासून काहीही न करता निव्वळ ध्यान लावून बसावंसं वाटतं. ध्यानामुळे मी खूप शांत झालो आहे. तिच्याइतकी उत्तम गोष्ट दुसरी नाहीच.

नाटकाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अढळ आहे. नाटक थेट अनुभव देतं. त्या माध्यमातल्या उत्स्फूर्ततेची तुलना अन्य कशाशीच होऊ शकत नाही. चित्रपटात एखादी गोष्ट तुम्ही चित्रित करून ती पन्नास वर्षांनंतरही पाहू शकता. अगदी जशीच्या तशी. नाटक मात्र वर्तमानकाळात, त्याच क्षणात तुमच्यासमोर घडत असतं. एक प्रयोग आधीसारखा नाही. नवा प्रयोग, नवं घडणं. सदोदित नवा अनुभव. ही जादू वेगळीच आहे.

‘बल्लीमाराँ’चा प्रत्येक प्रयोग वेगळा असतो. त्याचा गोडवा वेगळा असतो. नाटकानं माझ्या पदरात खूप काही टाकलं. माझ्यात शिस्त भिनवली, वेळेचं बंधन आणि महत्त्व शिकवलं, बंधुभाव आणि सहअस्तित्वाचं भान दिलं, काळजी घेणं शिकवलं. खूप काही.. मला तर वाटतं की, ज्याप्रमाणे इस्रायलमध्ये प्रत्येक मुलाला शाळेपासूनच सक्तीनं सैनिकी शिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे आपल्याकडेही शालेय स्तरावर किमान दोन वर्ष तरी नाटय़शिक्षण अनिवार्य करावं. माझ्या प्राधान्यक्रमांत नाटक नेहमी अग्रस्थानी आहे. दिल्लीत मी वीस वर्ष नाटक केलं आहे. अजूनही करतो आहे.

तरुण होतो तेव्हा माझ्यावर डाव्या विचारांचा प्रभाव होता. क्रांती करण्याची धमक अन् इच्छा होती. चळवळ आणि नाटक दोन्ही पूर्ण ताकदीनिशी करायचो. त्यानंतर मुंबईत यायचं ठरवलं. इथेही खूप काम केलं. पैसा कमावला.. या माझ्या साऱ्या प्रवासाचं वर्णन ‘तुम्हारी औकात क्या है’ मध्ये मी तपशीलवार केलेलं आहे. सगळं काही स्पष्ट आणि खरं खरं सांगून टाकलं आहे. काहीही दडवलेलं नाही. पुस्तक वाचून काही मित्र म्हणालेदेखील, ‘‘यार, एवढं खरं सांगायला नको होतं.’’

हे आत्मचरित्र मी प्रथमपुरुषी एकवचनात लिहिणं सुरू केलं होतं. पण त्यात मजा वाटेना, गंमत येईना. मग मी ते तृतीयपुरूषी एकवचनात लिहिणं सुरू केलं. त्यातून ते आकाराला आलं. संपूर्ण टाळेबंदीचा काळ मी ते लिहित राहिलो.

नाटकातल्या मुलांसोबत, इतर तरुणांसोबत माझं नातं जेवढं खेळीमेळीचं आहे, तेवढंच माझ्या मुलांशीदेखील आहे. मी त्यांच्यावर वडिलकी गाजवायला जात नाही. माझ्या पत्नीचेही त्यांच्याशी असेच संबंध आहेत. ते कुठलीही गोष्ट निर्धास्तपणे आमच्याजवळ बोलू शकतील, असं वातावरण आमच्या कुटुंबात आहे. आमच्या चौकोनी कुटुंबात खोटय़ाला थारा नाही. कुठल्याही कारणामुळे खोटं बोलावं, अशी परिस्थिती नाही. मोकळं वातावरण आहे.

मी घरी असलो आणि माझ्यासाठी कुणाचा फोन आला तर मी घरात नाही, असं कुणीही खोटं सांगत नाही. ते घरात आहेत, पण तुमच्याशी बोलू इच्छित नाहीत, असं नि:संदिग्धपणे सांगितलं जातं. एक खोटं दडपण्यासाठी दुसरं खोटं रचावं न लागल्यानं फजितीचे प्रसंग येतच नाहीत. संभाव्य त्रास टळतो. माझ्या अशा स्पष्टवक्तेपणानं अनेकजण सुरुवातीला नाराज होतात. पण काम पाहिलं आणि माझा स्वभाव लक्षात आला की शांतही होतात. या माणसाला तोडून टाकू शकत नाही, तेव्हा मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात.

२०१० साली मी विपश्यनेला सुरुवात केली. इगतपुरीला पहिलं सत्र केलं. विपश्यना केल्यानंतर माझ्यात आमूलाग्र बदल झाला. मी शांत झालो. सर्वच स्तरांवर. झालं असं, मी अमेरिका दौऱ्यावर निघालो होतो. ‘गुलाल’ प्रदर्शित झाल्यावर काही महिन्यांनी माझा हा दौरा पूर्वनियोजितच होता. विमानतळावर असतानाच मला अस्वस्थ वाटू लागलं. मी साधा इमिग्रेशन फॉर्मही नीट भरू शकत नव्हतो. एक बाजू लुळी पडत चाललेली होती. फारच वाईट अवस्था झाली होती. माझ्यासोबत नेमकं काय घडतंय, हे समजायलाच चोवीस तास लागले. डॉक्टरांनी तपासलं तेव्हा ते ओरडलेच. तातडीनं इस्पितळात दाखल व्हायला सांगितलं. अर्धागवायूचा तीव्र झटका आल्याचं निदान झालं. मी यापुढे हसू, बोलू, चालू शकणार नाही. अभिनयही करू शकणार नाही. कुणाचीही मदत घेतली तरी काही उपयोग नाही, असं त्यांनी सांगितलं. माझ्या आत्मचरित्रात हा प्रसंग सविस्तर आला आहे.

माझा एक संगीतकार, दिग्दर्शक मित्र विशाल भारद्वाज मला म्हणाला, ‘‘तू सगळय़ांचं ऐकलंस. आता मी सांगतो ते ऐक. ही गोष्ट अजमावून बघ- प्राणिक हिलिंग. औषधशास्त्र त्याला अजून मान्यता देत नाही.’’ त्याच्या सांगण्यावरून एका महिन्याचा कोर्स पूर्ण केला आणि मी पूर्वीसारखाच पुन्हा उभा राहिलो. त्यानंतर मी लगेचच ‘रॉकस्टार’ चित्रपट केला. त्याचदरम्यान मला विपश्यनेबद्दल समजलं. मी विपश्यनेचा दहा दिवसांचा कोर्स पूर्ण केला. तो संपवून परतलो तेव्हा माझ्यात बदल झालेला जाणवत होता, पण तो नेमका काय, हे उमगायला मला पाच-एक वर्ष लागली. अर्धागवायूचा झटका आला होता, त्या वेळी मी शारीरिक वेदनांतून गेलो. सगळं नको वाटायचं. निराकाराची साधना करायला सुरुवात केल्यानंतर मी भूतकाळ आणि वर्तमानकाळ शांतपणे स्वीकारायला शिकलो. आधी लहानशा कारणांमुळे माझी चिडचिड व्हायची. आता कुणाशीही स्पर्धा नसल्यानं मी आनंदात आहे. मी जिथे जातो तिथे विपश्यनेबद्दल आवर्जून बोलतो. त्या कोर्सदरम्यान तुम्ही बाह्य जगाशी संपर्क तोडून स्वत: सोबत राहता. स्वत:ला भेटता. तिथे तुम्हाला मौन धारण करावं लागतं. तुम्ही व्यसनं करू शकत नाही. तिथे केवळ तुम्हाला श्वासाचं व्यवस्थापन करायला शिकवलं जातं. मी ते कायम रियाजात ठेवलं. त्यामुळे माझ्यात जमीन-अस्मानाचा फरक पडला. आता मी माझ्या शत्रूंनाही माफ करून टाकलं आहे.

एक असतं ‘सुख’ आणि एक असतो ‘आनंद’. चिदानंद. हा सुखाहून मोठा भाग असतो. तुम्हाला सुखाची आकांक्षा असेल तर दु:खाचीही कल्पना करावी लागेल. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

बुद्धीचा पैस मर्यादित असतो. त्यानंतर सुरू होतो तो अबोध मनाचा प्रदेश. तिथे हा चिदानंद असतो. विपश्यनेत सुखाचा अनुभव मिळत नाही. आनंद मिळतो. त्या आनंदानुभूतीची शब्दांत मांडणी करता येणार नाही. बाकी ऐहिक/ लौकिक यश म्हणजे चित्रपटानं बेफाम लोकप्रियता मिळवणं, पैसा-प्रसिद्धी येणं ही फार लहान आणि अल्पजीवी सुखं आहेत. ती संपतात तेव्हा उर्वरित आयुष्याचं लख्ख भान येतं. त्यामुळे पुढे चालत राहणं, हेच खरं.

उमेदवारीच्या काळात मी डाव्या चळवळीत खूप काम केलं. अगदी डोळे झाकून आणि झोकून देऊन काम केलं. माझ्या आयुष्याची तब्बल वीस वर्ष दिली. नंतर नंतर मात्र मी डाव्या चळवळीपासून दूर जाऊ लागलो.

एकतर दिल्ली सोडून मुंबईत आलो, चित्रपट करून पैसा कमावू लागलो, तेव्हा चळवळीतील नेते आता मी भांडवलवादी झालो, त्यांच्या गटात गेलो, असं म्हणू लागले. त्यांनी माझ्यावर फुली मारली. त्यांच्यालेखी पैसे कमावणं पाप होतं. चळवळीत असतानाही त्यांना प्रश्न विचारलेले चालायचे नाहीत. ते फक्त कार्ल मार्क्‍स, स्टॅलिन यांची नावं घ्यायचे. कार्ल मार्क्‍स हा खूप मोठा माणूस होता. मार्क्‍सवाद प्रचंड व्यापक आहे, पण त्यांचं म्हणणं खरोखरच यांना नीट कळलेलं आहे का? मला चळवळीतील प्रमुखांशी संवाद राखणं दिवसेंदिवस अवघड होत गेलं. कारण ते म्हणत होते, तू कुटुंब वगैरेवर पाणी सोडून पूर्णवेळ चळवळीला द्यावास. मला हे अशक्य होतं. मी नाटकही करत होतो.

शिवाय एक प्रसंग मला हादरवून गेला :

एकदा मी चित्रपट बघायला बसलो होतो. राष्ट्रगीत सुरू असताना माझ्या जेएनयूमध्ये शिकणाऱ्या मैत्रिणीचा फोन आला. मी तो त्यावेळी घेतला नाही. नंतर उलट फोन केला तेव्हा तिनं फोन न उचलण्याचं कारण विचारलं. मी सांगितलं तेव्हा तिनं माझी चक्क टर उडवली. मी तिला म्हटलो, ‘‘मी हिंदुस्थानचा नागरिक आहे, राष्ट्रगीतावेळी मी उभा राहणारच.’’ डाव्या चळवळीपासून दूर जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे, चळवळीतील मंडळी प्रत्येक गोष्ट सिद्ध करायचा आग्रह धरत. मला ते काही पटत नसे. सिद्ध करणं आलं की तिथं ‘आग्र्युमेंट’ आलं. ते कशाला करायचं? तू तुझं मत मांड, त्यावर समोरचा पक्ष आपलं मत मांडेल, इतकं सोपं असायला हवं. प्रत्येक गोष्ट सिद्धच कशाला करायला हवी? पण प्रश्न विचारणं तिथे वज्र्य असे.

 मला चालीवर गाणी लिहिणं अतिशय सोपं जातं. खरं तर ही पद्धत खूप आधीपासूनच प्रचलित आहे. गीतकारांना चाल/ धून आधी मिळते आणि त्यावर शब्द लिहावे लागतात. क्वचितच उलट प्रक्रिया घडते. आधी मी जी गाणी, कविता लिहिल्या आणि त्यांना लोकप्रियता मिळाली, हा केवळ योगायोग होता. मी पटकन लिहितो. कधीकधी तर तीनचार पर्यायही रचून देतो. जे आवडेल ते वापरा, असं सांगतो.

शिवाय मी माझ्या कविता आणि गाण्यांचा  Live band घेऊन मी जगभर फिरलो, फिरतो. तो अनुभव मला ‘रॉकस्टार’ झाल्याची अनुभूती देतो. सुरुवातीला मी हार्मोनियम घेऊन गायचो. आता तर तीदेखील घेत नाही. आता गातो तेव्हा फक्त गळय़ातून नाही, संपूर्ण शरीरातून गातो.

मी फार ‘फोकस्ड’ माणूस आहे. रात्री झोपताना माझ्या मनात कुठलाही सल किंवा किल्मिष नसतं. मी जसा आहे तसाच वागतो. आत एक-बाहेर एक मला जमत नाही. मी कामही बरंच केलं. केलं म्हणण्यापेक्षा माझ्याकडून घडून गेलं.

 ‘ I’ m not talented,  I’ m gifted.’ विपश्यनेला सुरुवात केल्यापासून मला जाणवायला लागलं आहे की, अज्ञातातून कुणीतरी सतत मला हाकारतंय, दिशा देतंय. मला तिथून संदेश येताहेत आणि त्याबरहुकूम मी काम करतो आहे. इतरांबाबतीतही तसंच असतं, मात्र ते ओळखू शकत नाहीत. निराकाराची साधना करणं सुरू केल्यानंतर सगळंच सुरळीत-स्वाभाविक होत चाललंय. गेल्या चार वर्षांपासून तर आयुष्य इतकं सुखी झालंय की निराशा, दु:ख आसपास फिरकतच नाहीत. गोष्टी सहजपणे घडत आहेत.

कुठलंही काम त्याचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. ते मिळतच. कदाचित ते आज, उद्या, परवा अशा नजीकच्या काळात मिळणार नाही. पण कधी ना कधी ते मिळेलच. मी याचा अनुभव वारंवार घेतला आहे. वीस वर्ष मी दिल्लीत नाटक करत होतो. ज्या वेळी मुंबईत आलो त्या वेळी कामं सहज मिळत गेली. मनोज वाजपेयीनं मिळवून दिलं, शुजीत सरकारनं विचारलं, अनुराग कश्यपनं तर भरभरून दिलं. हे कर्माचंच फलित मानतो मी. त्यामुळेच काम करत राहणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सगळय़ा नव्या नटांना माझं तेच एक सांगणं आहे, ‘‘तुम्हाला अभिनेता म्हणून यश मिळवायचं असेल तर अगोदर ‘अभिनय’ तर करा. ते सोडून बाकी भलतंच करत बसलात तर कसे नट व्हाल? अभिनय ही गांभीर्यानं करण्याची बाब आहे.’’

कर्म करत राहा. त्याचं फळ कुठल्या रूपानं मिळेल ते सांगता येत नाही. मी अभिनय केला तो केवळ अभिनय करण्यासाठीच. अनेकदा मी एकेकटा, समोर कुणीही नसतानाही अभिनय केलेला आहे. १९८९ साली मी मुंबईत केवळ एका वर्षांपुरता आलो होतो. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर जात असे. तिथे जाऊन विविध पात्रांचे संवाद म्हणत असे, एखादं पात्र विशिष्ट परिस्थितीत कसं वागेल, ते करून पाहायचो. त्यातली मजा काही औरच होती.

मी काही ‘स्टार’ नव्हे. ज्याच्यावर निर्माते पैसा लावायला तयार होतात, ते ‘स्टार्स’ असतात, तसा मी नव्हे. पण काम भरपूर करतो. आपल्याला काम करत राहण्यासाठी पाठवलं गेलं आहे, ते करत राहावं. निराकाराची साधना करावी.

तरुणांबाबत काम करायला आवडतं..

सध्या रंगभूमीवर माझं ‘गगन दमामा बाज्यो’ हे नाटक सुरू आहे. शहीद भगतसिंग यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या नाटकाचा सारा संच उत्साही तरुणांचा आहे. मला तरुणांसोबत काम करायला नेहमीच आवडतं. मी साठी ओलांडली असली तरी मी स्वत:ला म्हातारा समजत नाही. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी तसं होतं, या भाषेची मला घृणा आहे. मी ती वापरत नाही. हे सांगून काय फायदा होतो? काय साध्य होतं? अशी कोणती गोष्ट आहे, जी तुमच्या आधी कुणी केली नाहीये? तरुणांना विचारा, ‘तुम्ही काय करता आहात?’ ते अधिक महत्त्वाचं आहे. त्यांची भाषा मला समजून घेणं आवडतं. तुम्ही स्वत:ला त्यांच्यासमोर ‘प्रूव्ह’ करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचं म्हणणं मांडून मोकळे व्हा आणि त्यांचं काळजीपूर्वक ऐका.

सारेच पक्ष खारट..

माझी बांधिलकी डाव्या विचारसरणीशी होती. तेथील मतांचं ध्रुवीकरण हळूहळू लक्षात आल्यानंतर मी डाव्या पक्षापासून दूर गेलो. नंतर काँग्रेस, भाजप अशा सगळय़ाच पक्षांचं पाणी चाखलं, तेव्हा लक्षात आलं सगळे खारटच आहेत.

मोदी आवडते..

मला नरेंद्र मोदी आवडतात. मला ते गुलजार, रजनीकांत, धर्मेद्र यांच्यासारखे आवडतात. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसते, तर मी भाजपला मतदान केलंही नसतं. देशाचं हित ते साधू पाहताहेत. लोक म्हणतात, नरेंद्र मोदींचं आक्रमक ‘पर्सेप्शन’ निर्माण केलं गेलंय. वास्तविक ते तसे नाहीत. मी म्हणतो, ‘पर्सेप्शन’ निर्माण केलं गेलं असेलही, मला तेही आवडतं. अर्थात, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यावर वाद घालण्याची वा ते सिद्ध करण्याची मला आवश्यकता वाटत नाही.

राहुल राजकारणात काय करतायत?

काँग्रेसच्या कार्यकाळात आम्ही खूपच भोगलं. मला आठवतं, इंदिराबाई पंतप्रधान झाल्या, त्या वेळी मी तरुण होत होतो. विरोधी पक्ष नसेल तर काय परिस्थिती उद्भवू शकते, हे मी अनुभवलं आहे. १९८४ साली उसळलेल्या दंगली मी उघडय़ा डोळय़ांनी पाहिल्या आहेत. इंदिराबाईंची निर्घृण हत्या झाली. त्यांच्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. ते पायलट. पंतप्रधानपद कसं मिळालं? इंदिराबाईंचं समजू शकतो. त्यांचे वडील पंतप्रधान होते. राजीव गांधी का? आणि आता राहुल! ते तर छोटा भीम आहेत. राजकारण हे त्यांचं क्षेत्र नाही, हे वारंवार सिद्ध झालंय. ते इतर कुठलाही व्यवसाय करू शकले असते. राजकारणात ते काय करताहेत? लोक शिव्या घालतात, पण मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. तारुण्य वाया गेलं त्या पोराचं.

आधी रंगभूमीवर काम करावे..

माझ्या मते, नाटक ‘पॅशन’ आहे तर सिनेमा ‘ऑक्युपेशन’ आहे. अर्थात ऑक्युपेशनही महत्त्वाचं आहेच. चित्रपट एका रात्रीत तुम्हाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोचवतो. ही त्याची खासियत आहे. आजकाल तर प्रत्येकालाच सिनेमात जायची ओढ लागली आहे. आजचे तरुण एकवेळ ‘तू चित्रकार नाहीस’, ‘तू संगीतकार नाहीस’, ‘तू गायक नाहीस’, हे मान्य करतील, परंतु ‘तू नट नाहीस’ हे कुणीही ऐकून घेणार नाही. प्रत्येकालाच प्रसिद्ध व्हायचं आहे. सिनेमाच्या वलयाला भुलून अनेकजण तीस तीस – चाळीस चाळीस वर्ष संघर्ष करत राहतात. अभिनय करू इच्छिणाऱ्यानं आधी नाटय़माध्यमात काम करायला हवं, असा सल्ला मी नेहमीच तरुणांना देतो. जे जे ‘पॅशनेट’ अभिनेते आहेत, ते सगळे अखंडपणे नाटक करत राहिलेत, असं दिसतं.

थोरांच्या निकट जाणं टाळतो..

प्रत्येक मोठय़ा व्यक्तीत कुठला ना कुठला दोष किंवा कमजोरी असतेच, असं माझं अनुभवांती मत आहे. त्यामुळेच मी शक्यतो थोर माणसांच्या निकट जाणं टाळतोच. अमिताभ बच्चन, गुलजार यांना मी भेटत नाही. न जाणो, भेटीत त्यांचे मातीचे पाय मला दिसले तर..? तुम्ही एखाद्याच्या फार जवळ जाता, तेव्हा त्याच्या स्वभावातल्या कमजोर जागा तुम्हाला दिसतातच. मला याचा दांडगा अनुभव आहे. म्हणूनच मी जवळ जाणं टाळतो. तुम्ही एका विशिष्ट अंतरावर राहून त्यांना ऐका, त्यांचं काम पाहात राहा आणि तुमचं मत तुम्ही मांडत राहा, हे एक पथ्य मी कसोशीनं पाळतो.

सहप्रायोजक : केसरी टूर्स

पॉवर्ड बाय : एम. के. घारे ज्वेलर्स

शब्दांकन : अक्षय शिंपी