इलेक्ट्रिक वाहनांच्या इंजिनचा आवाज अतिशय कमी असतो. त्यामुळे अनेक वेळा वाहन जवळ आले तरी त्याचा फारसा आवाज होत नसल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढतो. भारतीय वाहन उद्योगाची नियामक संस्था असलेल्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (एआरएआय) रस्ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याबाबत केंद्र सरकारला इलेक्ट्रिक वाहनांच्या इंजिनचा आवाज वाढविण्याची शिफारस केली होती. केंद्र सरकारने संबंधित नियमावलीला नुकतीच मंजुरी दिली असून, आता ती अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. ती होईल, तोवर आवाजबळाचा प्रश्न उपस्थित करणारे विनोदमुद्दे आणि गुद्दे..

ज्या वेळी ई-वाहनाचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा कमी असतो, त्या वेळी त्याचा आवाज येत नाही. त्यामुळे यापुढे अ‍ॅकॉस्टिक व्हेईकल अलर्टिग सिस्टीमच्या (AVAS) माध्यमातून आवाज निर्माण केला जाईल. वाहनामध्ये बसविलेल्या ध्वनिक्षेपकातून हा आवाज प्रक्षेपित होईल. त्यामुळे आगामी काळात जवळ आलेल्या ई-वाहनाची चाहूल वेळीच लागणे शक्य होणार आहे. हा आवाज वाहनांच्या इंजिनाच्या आवाजाशी सुसंगत ठेवला जाणार असून, एका कंपनीच्या वाहनाचा आवाज हा इतर वाहनांपेक्षा वेगळा असल्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख कायम राहील असा सरकारचा दावा आहे. एकीकडे जगभर ध्वनिप्रदूषणाबद्दल बोंबाबोंब सुरू असताना, शांतपणे चालणाऱ्या वाहनांना बोंबलायला लावण्याचा हा निर्णय सरकारने सुमडीत घेतलेला आहे. हा निर्णय साधकबाधक विचारविनिमय न करता केवळ आवाजी मतदानाने घेतला असावा असा माझा कयास आहे.

Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्ग टिपताना..

मध्यंतरी आपले वाहतूकमंत्री म्हणाले होते की, वाहनांचे सध्याचे कर्कश हॉर्न बंद करून भारतीय पारंपरिक वाद्यांचे आवाज असलेले हॉर्न बसवणार! त्यांच्या त्या ट्वीटवर उत्तर देताना मी त्यांना म्हटलं, ‘‘साहेब, तुमचा निर्णय आम्हाला आवडलेला आहे. तुम्ही जनतेचं ऐकून घेणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी आहात म्हणून तुम्हाला एक विनंती करतो. ज्या ज्या विभागातील गाडी आहे त्या विभागाचं किंवा तेथील लोकप्रिय नेत्याचं वैशिष्ट्य असेल असे हॉर्न गाडीला लावले तर आणखी मज्जा येईल. उदाहरणार्थ, दिल्लीच्या गाड्यांना खोकल्याच्या आवाजाचा हॉर्न, पश्चिम बंगालच्या गाड्यांना ‘खेला होबे’ असं बोलणारा हॉर्न, भांडुपच्या गाड्यांना रोखठोक आवाजाचा हॉर्न, सिंधुदुर्गातील गाड्यांना चिरक्या आवाजाचा हॉर्न, गुजरातेतील गाड्यांना मोठ्या आवाजाचा आणि लांब फेक असलेला बॅटरी संपली तरी वाजणारा हॉर्न नागपुरातील गाड्यांना ‘‘मी पुन्हा येईन’’ असं बोलणारा हॉर्न, बारामतीच्या गाड्यांना ती गाडी येऊन आपल्या बुडाला टेकली तरी कळणार नाही असा हॉर्न आणि त्यासोबतच उजवीकडे वळायचे असेल तर डावीकडचा सिग्नल पेटेल अशी व्यवस्था, भोकरदनच्या गाड्यांना ‘हट बे साले’ असं बोलणारा हॉर्न, नरिमन पॉइंटच्या गाडयांना ‘‘अध्यक्ष महोदय’’ असं बोलणारा हॉर्न, मलबार हिलच्या गाड्यांना ‘‘चाय ला चला’’ असं बोलणारा हॉर्न, वसईच्या गाड्यांना शिट्टी, शिवाजी पार्कच्या गाड्यांना सतत आवाजाची दिशा बदलणारा हॉर्न आणि वांद्र्याच्या गाडयांना मुळमुळीत आवाजाचा हॉर्न, किंबहुना हॉर्न नकोच!’’

सरकारचा सामान्य माणसांच्या जीवनात हस्तक्षेप वाढत चालल्याचं या निर्णयावरून अधोरेखित होत आहे. आधी त्यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे करून स्कूटी आणि अ‍ॅक्टिवा चालकांच्या सौंदर्यास्वादापासून आम्हाला वंचित केलंच होतं. त्यानंतर त्यांनी दादा, डॉन असल्या फॅन्सी नेम-कम-नंबरप्लेटवर बंदी आणून लोकांच्या क्रिएटिव्हिटीवर घाला घातला. आता त्यांनी ई-वाहनांचा आवाज वाढवायचा घाट घातलाय. उद्या ते ट्रकच्या मागील सुविचारांवर निर्बंध टाकून ट्रॅफिकभरल्या रस्त्यावरील उरलंसुरलं मनोरंजनही संपवून टाकतील. शप्पथ सांगतो, या निर्णयाचा निषेध म्हणून, माझ्याकडे एखादा पुरस्कार असता तर दाणकन् सरकारच्या तोंडावर परत फेकला असता!

आवाजाचं, गोंगाटाचं आपल्याला अजिबात वावडं नाहीये. शांततेला कायमस्वरूपी टाटा करून ‘हॉर्न ओके प्लीज’ या आवाजाला प्रोत्साहन देणाऱ्या सुविचारावरच हा देश मार्गक्रमण करीत आहे. आपण भारतीय लोक जितके वाहनांचे हॉर्न वाजवतो तितके जगात इतरत्र क्वचितच कुणी वाजवत असतील. मध्यंतरी एकदा मी माझ्या दुचाकीचे ब्रेक दुरुस्त करण्यासाठी रस्त्याशेजारच्या गॅरेजमध्ये गेलो तेव्हा माझ्या दुचाकीची प्राथमिक तपासणी करून तो मेकॅनिक म्हणाला, ‘‘साहेब, ब्रेक दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल. तुम्हाला कुठे जायची घाई असेल तर टेम्परवारी हॉर्नचा आवाज वाढवून देतो. मग जावा बिंधास्त!’’

डॉल्बी आणि डीजे ही आपल्या आवाज आणि गोंगाटाप्रति असलेल्या प्रेमाची प्रतीकं आहेत. हा देश, इथली जनता, इथलं पर्यावरण, इथला निसर्ग या सगळ्यावर याच एका जोडगोळीची दरारायुक्त सत्ता आहे. संपूर्ण देश त्यांच्या तालावर बेभान होऊन नाचतोय, गातोय, किंचाळतोय. त्या दोघांना शेकडो प्रायोजक आणि असंख्य खूशमस्करे यांच्या ऑक्सिजनची नशा चढल्याने देशवासीयांच्या अंतरंगात लपलेली गौतमी पाटील बेभान झाली आहे. एखाद्या हुकूमशहालाही हेवा वाटावी अशी या अभूतपूर्व जोडगोळीची ही सत्ता आहे. डॉल्बी-डीजेची ही डबल बॅरल बंदूक आपल्या कानांवर सतत रोखलेली आहे. या डॉल्बी-डीजेच्या आवाजाने आपल्याला इतके हिप्नोटाइझ केलंय की, बाहेरचे इतर आवाज तर सोडाच, आपल्या आतलाही आवाज आपल्याला ऐकू येऊ नये अशी कडेकोट व्यवस्था आहे. या डॉल्बी-डीजेच्या विरोधात कुणी चुकून आवाज उठविण्याचा प्रयत्न केलाच तर डीजेला त्याच्या आईची शपथ घालून आवाज अजून वाढविण्याची गळ घालणारे नागीण डान्सर आजूबाजूला तैनातच आहेत. त्यामुळे एकतर डीजेच्या तालावर बेभान नाचा किंवा बिन-डीजेच्या प्रदेशात चालते व्हा हे दोनच पर्याय शांतताप्रिय जनतेकडे आहेत.

पाणी, वीज, रस्ते, रोजगार, भ्रष्टाचार असे हजारो प्रश्न आपल्याला पावलोपावली भेडसावत आहेत. पण याविरुद्ध आवाज उठविण्याऐवजी मूग गिळून बसणे आपण पसंत करतो. काळाकुट्ट धूर सोडत, रस्त्यातल्या खड्ड्यात खडखडाट करीत, चित्रविचित्र हॉर्न वाजवीत रहदारी सुरू आहे. दहाही बाजूंनी रस्ते, मेट्रो, फ्लायओव्हर, सागरी मार्ग, भुयारी मार्ग, इमारती असे विविध प्रकारचे बांधकाम सुरू आहे. तिथला खणण्याचा, तोडण्याचा, फोडण्याचा, अवजारांचा, माणसांचा, हायड्रॉलिक पायिलग मशीनचा, घणघण गोंगाट रात्रंदिवस सुरू आहे. फेरीवाले ओरडताहेत, बाजारात कलकलाट चालूच आहे. ढोल, ताशे, बँड, डीजे, फटाके याशिवाय लग्न-मुहूर्त, सण-उत्सव साजरेच होत नाहीयेत. बसमध्ये, ट्रेनमधे किंवा चालता-चालता लोक एकतर मोबाइल स्पीकर-मोडवर ठेवून बोलत तरी आहेत किंवा गाणी तरी ऐकत आहेत. राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा सरकारने घालून दिलेली अमुक डेसिबल आवाजाची मर्यादा मोडण्यात धन्यता मानत आहेत. एकापेक्षा एक कर्कश आवाजात नेते स्टेजवरून कोकलताहेत. या ध्वनिप्रदूषणाविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे असं आपल्याला वाटतच नाही. आपल्याला जणू या सगळ्या आवाजांचा काही त्रासच होत नाही. आपल्याला शांततेचा त्रास होतो. आपल्याला त्रास होतो तो आवाज न करता चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचा आणि आपण त्या वाहनांनी आपला आवाज वाढवावा असा कायदाच करून टाकतो.

सरकारच्या या निर्णयावर टीका करताना, विज्ञानाचा प्राध्यापक असलेला माझा एक मित्र मला म्हणाला, ‘‘निसर्गापासून आपण काही शिकतच नाही हा आपला खरा प्रॉब्लेम आहे. बहिऱ्या व्यक्तीलाही इतरांच्या पादण्याचा आनंद घेता यावा म्हणून निसर्गाने आवाजासोबत त्याला एक गंधही दिला आहे. आवाजाऐवजी तसा एखादा विशिष्ट गंध आपल्याला या ई-वाहनांना देता आला असता.’’

‘‘सरकारच्या या निर्णयाविषयी तुम्हाला आवाज उठवावासा वाटत नाही का?’’ असं मी आमच्या ऑफिसमधील तरुण पोरांच्या टोळक्याला विचारलं तर ते म्हणाले, ‘‘आपण आपलं शांततेत काम करायचं. जो काही आवाज करायचाय तो आपली बुलेट करील.’’

‘‘आवाजाचे दुष्परिणाम तुम्हाला जाणवत कसे नाहीत?’’ असे मी माझ्या सरकारधार्जिण्या मित्राला विचारले. तर तो च्युइंगगम चघळत चघळत म्हणाला, ‘‘आवाजाचे जसे दुष्परिणाम आहेत तशाच काही चांगल्या गोष्टीदेखील आवाजामुळे घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ, च्युइंगगमचा शोध! अरे च्युइंगगमचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाची बायको खूप वरच्या आवाजात बडबडत असे. अशी आतल्या गोटातली बातमी आहे.’’

या जगात केवळ मी आणि तोंडात मावा असणारे लोक याव्यतिरिक्त कुणालाच शांततेचं काही पडलेलं नाहीये. या प्रश्नाचं गांभीर्य माझ्या इतकं दुसऱ्या कुणालाच वाटत नाही हे पाहून मला खूप नैराश्य येतं. सगळं जग आवाजाच्या समृद्धी हायवेवरून तुफान वेगाने पुढे चाललंय आणि फक्त आपणच शांततेच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकलोय असं मला वाटू लागलंय. कोकिळेचा आवाज मधुर असल्याचं आलम दुनियेचं मत असलं तरी मला मात्र काही काही कोकिळेच्या आवाजाचाही भयंकर त्रास होतो. माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, सगळ्याच कोकिळा सुस्वर असतात असं नव्हे. त्यांच्यातही दीदी ते मामी अशी भलीमोठी रेंज असते.

आवाजाच्या समस्येच्या बाबतीत राजकीय पक्षांची भूमिका पक्षपातीपणाची असते असा माझा स्पष्ट आरोप आहे. दिवसातील केवळ काही मिनिटे आवाज करणाऱ्या मशिदीतील भोंग्यावर कारवाई करण्यासाठी रान उठविणारे राजकीय पक्ष, दिवसभर वाजणाऱ्या घरातल्या भोंग्यांच्या बाबतीत तोंडातून ब्र देखील काढत नाहीत.

हेही वाचा – दुबळ्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी..

एकंदरीतच मोठमोठाले आवाज, विविध प्रकारच्या आवाजांनी होणारे ध्वनिप्रदूषण या गोष्टींचा आपल्याला उपद्रव होत नाही किंवा झाला तर त्याकडे कानाडोळा करण्याचं बाळकडू आपल्याला जन्मापासून पाजलं गेलंय. आयुष्यातल्या ९० टक्के कौटुंबिक, सामाजिक, राजकीय समस्या केवळ त्यांकडे कानाडोळा केल्याने सुटत असतील तर माणसाला ऐकू न येणे याला त्रास, रोग किंवा विकार का म्हटले जाते हे मात्र अनाकलनीय आहे.

डीजेच्या भिंती उभारून दणदणाटी आवाजात उत्सव साजरे करण्याचा मला आधी खूप त्रास व्हायचा, खूप रागही यायचा. पण नुकत्याच आमच्या सोसायटीत साजऱ्या झालेल्या एका उत्सवप्रसंगी ‘‘आवाज वाढव डीजे तुला आयची शप्पथ आहे.’’ हे अत्यंत लोकप्रिय गाणं मी ध्यान देऊन ऐकलं आणि या गोंगाटप्रिय समाजाला समजून घेण्यात आपलीच काहीतरी गफलत होतेय हे माझ्या लक्षात आलं. थोडा विचार केल्यास, हे गाणं म्हणजे नाचगाण्यात बेभान झालेल्या कुणा छछोर तरुणाचे मनोगत नसून ईश्वरभक्तीत लीन झालेल्या भक्ताने ईश्वराची केलेली आळवणी आहे हे तुमच्याही लक्षात येईल. भक्त म्हणतोय की, भगवंता, या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज, माझ्या आतला डीजे क्षीण झालाय. माझ्या भक्तीची, विश्वासाची बॅटरी डिस्चार्ज झालीय. भगवंता माझ्या आतल्या डीजेचा हा आवाज तू वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्याशी तादात्म्य पावण्यासाठी माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर.. या भक्ताचं भगवंताशी नातं इतकं जवळचं आहे की, तो हक्काने देवाला प्रेमळ धमकीही देतो की, हे भगवंता, तू हे करणार नसशील तर जगन्नियंता असलेल्या तुझ्या मातेची तुला शपथ आहे.’’

sabypereira@gmail.com