पश्चिम बंगाल सरकारने अधिकाऱयांच्या बदलीच्या आदेशाचे पालन केले नाही, तर राज्यातील लोकसभा निवडणूक रद्द करू असा थेट इशारा देत निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का दिला. त्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने निवडणूक आयोगाकडे अधिकाऱयांच्या बदलीवर पुर्नविचार करण्याची मागणी केली आहे.
पश्चिम बंगालमधील एकाही अधिकाऱयाची बदली करून दाखवाच असे निवडणूक आयोगाला आव्हान दिल्याचे ममता बॅनर्जी यांचे विधान इंडियन एक्स्प्रेसने निदर्शनास आणून दिल्यानंतर निवडणूक आयोगाने बॅनर्जी यांच्या विधानाची दखल घेत कडक शब्दांत दिलेल्या आदेशाचे राज्यसरकारने पालन केले नाही, तर सदर राज्यातील लोकसभा निवडणूकाच रद्द कराव्या लागतील असे म्हटले.
निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारला काही अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश दिले होते. यावर जोपर्यंत मी प्रभारी आहे तोपर्यंत पश्चिम बंगालमधील एकाही अधिकाऱयाची बदली करुन दाखवाच, असे आव्हान देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर तोफ डागली होती. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील पाच पोलीस आयुक्त, एक जिल्हाधिकारी आणि दोन अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्यासह इतर काही अधिकाऱयांची बदली करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.