काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे गडगडल्यानंतर भाजपच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या रालोआ सरकारची प्रतीके बदलली आहेत. एरव्ही काँग्रेससाठी प्रिय नसलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती संसदेत जोषात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे आज राजनाथ सिंह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर गृहमंत्रीपदाचा कारभार स्वीकारला.  त्यांच्यासमवेत गृह सचिव अनिल गोस्वामी उपस्थित होते. अतंर्गत सुरक्षा व केंद्र-राज्य सुरक्षा संबंध सुधारण्यावर आपला भर असेल, असे राजनाथ सिंह यांनी या वेळी सांगितले.
सीमेवरील तणाव, राज्यांतर्गत असुरक्षितेतची भावना कमी करण्यासाठी गृह मंत्रालय विशेष परिश्रम करेल. कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी राजनाथ सिंह यांनी सविस्तर चर्चा केली.  चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी राजनाथ सिंह यांना विभागनिहाय माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील घुसखोरी, नक्षलवाद, जम्मू-काश्मिरमध्ये अशांतता पसरण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करण्यात येत असून लवकरच उपाययोजनांची ‘ब्लू प्रिंट’ प्रसिद्ध केली जाईल.
ठळक मुद्दे
लवकरच उपाययोजनांचा आराखडा, ईशान्य भारताच्या सुरक्षेस प्राधान्य, त्यादृष्टीने सर्व राज्यांना ईशान्य भारतीय नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याचे पत्र