उत्तर प्रदेशात असलेली मोदींची लाट आणि केंद्रातील काँग्रेस शासनाविरुद्ध असलेल्या असंतोष यावर मात करीत सलग चौथ्यांदा कानपूरमधून विजयश्री मिळवण्याचे आव्हान जैसवाल यांच्यासमोर आहे. त्यांच्याविरोधात भाजपमधील ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी मिळाली आहे. जोशी हे १५ व्या लोकसभेत वाराणसी येथून निवडून आले होते. मात्र त्यांना नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाराणसीची जागा सोडावी लागली. किंबहुना जोशी यांना येथून उमेदवारी देण्यात आल्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कानपूर मतदारसंघात पारंपरिक दृष्टीने विचार करता ब्राम्हण समाजाची (३५ टक्के) आणि मुस्लिम समाजाची मते निर्णायक ठरतात. याच मुद्दय़ाचा विचार करून आम आदमी पक्षाने आणि बहुजन समाजवादी पक्षाने येथे मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. आपचे मेहमूद हुसैन हे निष्णात डॉक्टर असून बसपचे सलीम अहमद हे व्यापारी वर्गात लोकप्रिय आहेत. त्यामुळे ही लढत जिंकणे काँग्रेस किंवा भाजपसाठी म्हणावे इतके सोपे नाही. जैसवाल यांनी या लढतीस ‘आतले’ आणि ‘बाहेरचे’ असे रुपडे देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांच्यासमोर ‘कोळसा घोटाळ्या’तील डाग धुवून काढण्याचे आव्हान आहे. येथे ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून २२ उमेदवारांपैकी केवळ ८ उमेदवारच पदवीधर वा उच्चशिक्षित आहेत.