आज पशुपालक दुग्धव्यवसाय परवडत नाही, अशी ओरड करतात. खरे म्हणजे गोठय़ावर जातिवंत जनावरे विकसित करणे, वैरणीवरच्या खर्चावर विविध उपाय योजणे आणि स्वत गोठय़ावर काम केल्यास आपल्याला दुग्धव्यवसायात मोठय़ा प्रमाणात नफा मिळविणे शक्य आहे. असे निरीक्षण नोंदवणारे सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी धोंडिबा खाडे यांनी यशस्वी केलेल्या मुक्त गोठय़ाची ही यशोगाथा.

निवृत्तीनंतर करायचे काय? असा प्रश्न एका अधिकाऱ्यास पडला. त्यांनी अधिक विचार न करता ज्या क्षेत्रात इतकी वष्रे सेवा करण्यात घालवली तोच पशुपालनाचा व्यवसाय पुढे सुरू ठेवायचे ठरवले आणि त्यातूनच आज त्यांनी बेडग या गावी  ८० जनावरांचा यशस्वी मुक्त गोठा पद्धत यशस्वी करून दाखवली. शंकर धोंडिबा खाडे असे या अधिकाऱ्याचे नाव. ‘शीतल फार्म्स अ‍ॅण्ड नर्सरी’च्या माध्यमातून त्यांनी पशुपालन व्यवसायाला नवा आकार नि आयाम प्राप्त करून दिला आहे.

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

मुक्त गोठा पद्धत अलीकडे चांगलीच रुजत आहे. त्यामागे दूध व्यवसायातील पूर्वापार पद्धतही कारणीभूत आहे. भारतीय दूध उत्पादक शेतकरी वर्षांनुवष्रे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे. प्रति गाय व म्हैस या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन  करण्याची सरासरी ही फारच कमी आहे. बहुतांशी दूध उत्पादकाकडे २ ते ३ याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची संख्या व वंशावळीची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य नाही. याला पर्याय म्हणून मुक्त गोठा पद्धत पुढे आली. अति कष्ट वाचावेत यासाठी मुक्तसंचार गोठा व वर्षभराच्या पौष्टिक चाऱ्याचे नियोजन व्हावे म्हणून मुरघास निर्मिती केली पाहिजे. दुभत्या गाईंचे संगोपन करताना त्यांच्यासाठी मुक्तसंचार  गोठा पद्धतीचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच गाईचे स्वास्थ्यही चांगले राहते. परिणामत दूध उत्पादनात वाढ होते.

कोल्हापूर येथे जिल्हा दूध विकास अधिकारीपदावर काम केलेले शंकर खाडे आपला स्वानुभव उलगडतात. ते म्हणतात, आज अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडतो. मी ३५-३६ दुग्धव्यवसायांत विविध पदांवर काम करून निवृत्त झालो आहे. निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम मी जनावरांच्या गोठय़ात गुंतविली. आणि त्या रकमेवर बँकेतून मिळाला असता त्यापेक्षा जादा परतावा उत्पन्न स्वरूपात मला नियमितपणे मिळू लागला आहे.

मी दुग्धव्यवसाय विभागात कृषी अधिकारी, दुग्ध प्रकल्प अधिकारी, पशुपदास व संगोपन केंद्र, पालघर, आरे मिल्क कॉलनी येथे १९८४ ते २००५ या कालावधीत कृषी अधिकारी होतो. स्वत कृषी पदवीधर आहे. आरे दुग्ध वसाहत येथे वैरण आणि दुधाळ जनावरांचे संगोपन या विभागांत काम केल्याने जनावरे संगोपनाची गोडी निर्माण झाली. निवृत्तीपर्यंत कोल्हापूर येथे जिल्हा दूध विकास अधिकारी म्हणून काम केले. यापूर्वीच दुग्ध व्यवसायाची आवड होती. त्यात खासकरून वासरू संगोपन या विषयात रस घेतला. सेवेत असतानाच वडिलोपार्जति जमिनीवर पत्नीच्या सहकार्याने वासरू संगोपन सुरू केले. १५-२० जनावरे यातून तयार झाली. हाच माझ्या  गोठा व्यवस्थापनाचा पाया आहे, असे खाडे यांनी सांगितले.

शेतकरी जनावरांमध्ये काही दोष असेल तरच तो गोठय़ातून जनावरं विक्रीसाठी काढतो, असली दुय्यम दर्जाची जनावरे खरेदी करण्यात काहीही अर्थ नाही. चांगले, दुग्ध, जातिवंत जनावर कोणीही शेतकरी, कितीही अडचणीत असला तरी काढत नाही. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच बाजारातून जनावरे खरेदी करायचे नाही, असे ठरविले. पूर्वी मी एक गोठा चालवत होतो त्यातील उत्तम प्रकारच्या कालवडी खरेदी केल्या. त्याच माझ्या यशाचे गमक ठरल्या आहेत. बाहेरचे जनावर खरेदी न करण्याच्या धोरणाची आज अखेर नीट अंमलबजावणी केली. हे माझ्या यशस्वी गोठय़ाचे वैशिष्टय़ म्हणून सांगता येईल.

आज माझ्याकडे ३० दुधाळ गाई आहेत. दररोज सरासरी ३२५ ते ३५० लिटर दूध संकलन होते. संपूर्ण दूध गोकुळ डेअरी जागेवरून घेऊन जाते. तसे पाहिले तर माझ्याकडे आज एकूण लहान-मोठी ८० जनावरे आहेत. सहा महिन्यांखालील २५ वासरे आहेत. सहा महिन्यांवरील २५ वासरे आहेत. ३० दुधाळ गाई आहेत. एक गाय २२ लिटपर्यंत सकाळ-संध्याकाळी दूध देते. तुम्हाला गोठय़ातून नफा कमवायाचा असेल तर वैरण ही तुमच्या शेतातीलच असली पाहिजे. यासाठी मी अनेक प्रयोग केले. अलीकडच्या काळात बेबी कॉर्नर मका लागवड जास्त प्रमाणात केली जात आहे. दोन महिन्यांत कणसे काढली जातात. त्याचे सरासरी एकरी ३० हजार रुपये मिळतात. उर्वरित वैरण गोठय़ासाठी वापरली जाते. याशिवाय हैड्रोफोनिक्स, आझोला, मुरघास गवत निर्मितीचे नियोजन केले. दर दिवशी प्रत्येक जनावराला १० किलो ओली वैरण मिळते. पाच एकर क्षेत्रावर केवळ अन् केवळ वैरणीचे नियोजन केले आहे. बेबी कॉर्नर मका, ऊस, नेपीअर गवत असे ६०० किलो वैरण यातून मिळते. हैड्रोफोनिक्स केंद्रातून तसेच शेतीतील विविध वैरण पिकातून ५० टन ओल्या वैरणीचे मुरघास साठवण केंद्र तयार केले आहे. गोठय़ात जागोजागी सॅलेज बॅगमध्ये वैरण साठवून ठेवली आहे. याशिवाय प्रति जनावरास २ ते अडीच किलो आझोला शेवाळयुक्त गवत मिळेल, असेही नियोजन केले आहे.

जनावरांना ठरावीक कालावधीने उसाचा पाला टाकल्याने ४-५ महिन्यांत उत्कृष्ट पद्धतीने सेंद्रिय खत तयार होते. त्याचेच गांडूळ खत तयार करून खाडे ते शेताला वापरतात. शिवाय एकूण सहा एकरांवर आम्ही व्यवस्थापन करतो. वैरणीचे नियोजन स्वतचे असल्याने दूध विक्री, शेणखत विक्रीमधून मिळणारे उत्पन्न विचार करता गोठा व्यवस्थापन अतिशय फायदेशीर आहे. या प्रकल्पाला वासरू संगोपन, गोठय़ावर जनावरे तयार करणे असे अंदाजे ३० लाख रुपये गुंतवणूक करावी लागली असती. सेवानिवृतीच्या आधीच वासरू संगोपन सुरू केल्याने सेवानिवृत्तीच्या पशातून कमीतकमी १० ते १५ लाख रुपयांत हा प्रकल्प उभा राहिला आहे.

मनुष्यबळ महत्त्वाचे..

मुक्त गोठा पद्धतीमुळे मजूर खर्चात मोठी बचत झाली आहे. गोठय़ात जनावरांचा मुक्त संचार असतो. या ठिकाणी जनावरांना पुरेसे पाणी, गवाणीत वैरण उपलब्ध करून दिली आहे. वैरण घालणे, पाणी पाजणे, शेणघाण काढणे यावरील खर्च कमी झाला आहे.

मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय?

  • या गोठय़ात गाईंना बांधले जात नाही.
  • गाईंना एका मोठय़ा कंपाउंडमध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
  • त्यांच्या चाऱ्याची व पाणी पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणामध्ये करण्यात येते.
  • शेण वारंवार काढले जात नाही.

dayanandlipare@gmail.com