गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाची उधळण करीत व खड्डय़ांचे विघ्न पार करीत मंगलमय वातावरणात विघ्नहर्त्यां गणरायाचे सोमवारी आगमन झाले. जिल्ह्य़ाच्या शहरी व ग्रामीण भागात १ लाख ५६ हजार ९६४ घरगुती तर १७८ सार्वजनिक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्य़ात १,५६,९६४ घरगुती व १७८ सार्वजनिक गणरायाच्या मूर्तीची भक्तीभावाने, मंगलमय वातावरणात घरोघरी व सार्वजनिक मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शहरी व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मूर्तीची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसातील संख्या सार्वजनिक गणपतीची आहे.
रत्नागिरी ग्रामीण- १३,१२७ (०४), रत्नागिरी शहर- ७६१० (२७), जयगड- २७०० (६), संगमेश्वर- १२,५१६ (२), देवरुख- १२,१७० (५), चिपळूण- १२,७५० (१३), सावर्डे- १०२५ (१), अलोरे- ५०७३ (४), राजापूर- १९,८८८ (६), नाटे- ७२६२ (२), लांजा- १३,६०० (७), गुहागर- १४,२१४ (२), खेड- १२,८८० (१५), दापोली- ७७१४ (८), मंडणगड- ४६७२ (६) व बाणकोट- ७२३ (२).
सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते, तरीही गणेश भक्तांची मांदियाळी सुरू होती. दुपारी २ वाजता ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी गणेश मूर्तीचे आगमन झाले. जि. प.चे माजी अध्यक्ष शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयसिंग घोसाळे, माजी नगराध्यक्ष मधू घोसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेशेत गावातील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत गणेश मूर्तीची वाजत-गाजत काढलेली मिरवणूक शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या मिरवणुकीत आंबेशेत गावातील १०६ गणेश मूर्ती होत्या.
रत्नागिरीचे आमदार आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या श्री रत्नागिरीचा राजा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्यदिव्य गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मारुती मंदिर सर्कलमध्ये करण्यात आली. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश सावंत, शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ही मूर्ती १२ फूट उंचीची असून, सामंत यांच्या हस्ते त्याची पूजा करण्यात आली.