|| प्रदीप नणंदकर भूकंपग्रस्तांच्या नव्या पिढीची कृतज्ञता; लातूरच्या प्रलयंकारी भूकंपाला रविवारी पंचवीस वर्षे पूर्ण लातूरजवळील किल्लारी परिसरात बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याला येत्या रविवारी २५ वर्षे पूर्ण होत असून, भूकंपानंतर सामाजिक, आर्थिक असे विविध संदर्भ बदलले. याच वेळी भूकंपग्रस्तांच्या मदतीला हजारोंचे हात आले अन् भूकंपग्रस्तांच्या नव्या पिढीला जीवनाची नवी आशा दिली गेली. मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटना, एसओएस बालग्राम, रा. स्व. संघ जनकल्याण समिती या संस्था तर महिलांच्या क्षेत्रात प्रामुख्याने विधवांना जीवनात उभे करण्यात स्त्री आधार केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक संघटनांनी पाय रोवून दीर्घकाळ काम केले. त्यातून नवी पिढी उभी राहू शकली. लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यातील नांदुर्गा गावातील इयत्ता सहावीत शिकणारा औदुंबर बनसोडे हा गावाशेजारच्या उजनपूर गावात मावशीकडे राहायला गेला होता. त्याच रात्री भूकंप झाला. भूकंपात आई, वडील, भाऊ व मावशी मरण पावले, गोंधळामुळे जाग आली त्यामुळे औदुंबर वाचला. भूकंपाच्या कटू आठवणी सोबत असतानाच शांतीलाल मुथा यांच्या भारतीय जैन संघटनेने भूकंपग्रस्त भागातील मुलांच्या कायम शिक्षणाची पुण्यात सोय केली. सहावीत औदुंबर पुण्यात शिकायला गेला. जैन संघटनेच्या वसतिगृहात राहून तो बीए झाला. बीएड् व एमए केल्यानंतर लातूरच्या शाहू कॉलेजमध्ये त्याने काही दिवस तासिका पद्धतीवर नोकरी केली व गेल्या आठ वर्षांपासून गोल्डक्रीस्ट हाय या संस्थेत तो शिक्षकाची नोकरी करतो आहे. त्याची पत्नी रेखा घोडके ही भूकंपग्रस्त नांदुग्र्यातीलच. ती एसओएस संस्थेच्या वसतिगृहात लातुरात राहिली व तिनेही सहावीपासून बारावीपर्यंत त्यानंतर एएनएमचा नìसगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. औदुंबर व रेखा विवाहबद्ध झाले. आम्हाला शिक्षणाची साथ मिळाली त्यामुळेच आम्ही जीवनात उभे राहू शकलो. अगदी दोन दिवसांपूर्वी औदुंबरच्या शाळेत तो वरच्या मजल्यावर शिकवत असताना खालच्या मजल्यावर स्पिकरचा आवाज आला त्यावेळी त्याला भूकंप झाला असे वाटून त्याने वर्गातील मुलांना भूकंप झाला चला बाहेर असे म्हणताच मुलांनी सर खालील मजल्यावर स्पिकरचा आवाज आहे भूकंप नाही असे सांगितले तेव्हा कुठे औदुंबरने सुटकेचा नि:श्वास टाकला. उस्मानाबाद जिल्हय़ातील लोहारा तालुक्यातील कास्ती गावचा सुनील साबळे हा भूकंप झाला तेव्हा पहिलीत होता. रा. स्व. संघ, जनकल्याण समितीने १९९५ मध्ये लातूर शहरात मुला-मुलींसाठी शिक्षणाची सोय केली. पाचवी ते दहावीपर्यंत त्याने या शाळेत राहून शिक्षण घेतले. अकरावी, बारावी शाहू महाविद्यालयात केल्यानंतर त्याने औरंगाबादच्या शासकीय दंतवैद्यकीय महाविद्यालयातून बीडीएस पूर्ण केले. सध्या मुंबई येथील विरारमध्ये तो व्यवसाय करतो आहे. डॉ. सुनीलने २५ वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा दिला. गावातील आमचे घर जमीनदोस्त झाले त्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये दहा वष्रे घरच्यांना राहावे लागले. मी जनकल्याणमध्ये शिकलो तर माझा मोठा भाऊ अनिल हा भारतीय जैन संघटनेच्या शाळेत पुण्यात शिकला. तो बीए होऊन गावात नोकरी करतो आहे. आम्हाला शिक्षणासाठी मदतीचा हात मिळाला म्हणून आम्ही काही शिकू शकलो अन्यथा आम्ही गावाकडेच तशाच पिचलेल्या अवस्थेत राहिलो असतो. सामाजिक ऋण आपण कदापिही विसरणार नसल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख डॉ. निलम गोऱ्हे यांनी १९९३ च्या भूकंपानंतर महिला समस्यासंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलली. भूकंपानंतर आठ हजारांपेक्षा अधिक महिला विधवा होत्या. काही महिलांचे कत्रे पुरुष गेले. मुले लहान. शेती कसायची कशी? असे प्रश्न होते. तेव्हा महिलांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पेलणे त्यातही शेतीसारखी कामे स्वत करणे हे समाजमान्य नव्हते. नीलमताईंनी महिलांचे स्वमदत गट तयार केले. प्रारंभी काही महिलांना थेट आíथक मदत देत स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. शेतीची पेरणी ते माल विक्रीपर्यंत त्यांना सहकार्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्यात आली. त्यातून किमान चारशे कुटुंबे थेट स्वतच्या पायावर उभी राहू शकली. आजही त्यातील अनेक महिला स्त्री आधार केंद्र आम्हाला आधार द्यायला नसते तर आम्ही आमच्या जीवनातून पुन्हा उभे राहणे कठीण होते, अशा भावना व्यक्त केल्या. रा. स्व. संघ, जनकल्याण समितीच्या वतीने कायमस्वरूपी पुनर्वसनाबरोबरच भूकंपग्रस्त भागात विविध उपक्रम राबविले गेले. त्यात प्रामुख्याने लातूर जिल्हय़ातील सहा, तर उस्मानाबाद जिल्हय़ातील सहा गावांत भारतमाता मंदिर उभारण्याची अभिनव कल्पना पुढे आली. गावात आपापल्या दैवतांची मंदिरे असतात, मात्र गावचे म्हणून भारतमातेचे मंदिर व त्या मंदिरातून गावातील सर्व प्रकारची सामाजिक कामे चालावीत हा त्यामागील हेतू होता. या मंदिरात राज्यभरातील विविध भागांतून काहीजण वर्षांसाठी, तर काहीजण त्यापेक्षा अधिक काळासाठी सेवाव्रती म्हणून काम करण्यास आले. स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार विवेकानंद रुग्णालयाच्या वतीने भूकंपग्रस्त भागात काही ठिकाणी त्यावेळची गरज लक्षात घेऊन रुग्णसेवा केंद्र सुरू करण्यात आली होती. गरज संपल्यानंतर ही केंद्रे बंद करण्यात आली. नदीहत्तरगा या गावी जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या केंद्राचे व्यवस्थापक बस्वराज पके हे स्वत: दिव्यांग आहेत. या केंद्रात १२ दिव्यांग राहतात. त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना काम देत स्वावलंबी बनवण्याचा उपक्रम या केंद्रात सुरू आहे. पाण्याची अडचण लक्षात घेऊन पाणी फाऊंडेशनने जलसंधारणाचे काम काही गावांत हातात घेतले. नदीहत्तरग्यात या कामात बस्वराज पके यांनी मोठा पुढाकार घेतला व तालुका पातळीवर या गावाला दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. जनकल्याण समितीचे प्रांत सहकार्यवाह अरुण डंके यांनी गेल्या २५ वर्षांपासून या भागात सातत्याने आपला संपर्क असून समाजाची गरज लक्षात घेऊन कालानुरूप उपक्रमात बदल करून कार्यक्रम घेतले जात आहेत. भूकंपानंतर काही वष्रे या भागात सातत्याने संपर्क ठेवणारे लातूर येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दिनेश पाटील यांनी त्याकाळी भूकंपग्रस्त भागाशी सतत संपर्कात राहणे ही गरज होती. तो काळच चिंताजनक होता. २५ वर्षांनंतर या भागाकडे पाहताना भूकंपामुळे भौतिक विकास झाला. साधने नवनवीन आली, मात्र समस्यात फारसा बदल झाला नाही असा अनुभव असल्याचे सांगितले. गावातील भांडणे तशीच आहेत. जगण्याची पद्धत तीच आहे, उलट आपुलकी, स्नेह, जिव्हाळा हे शब्द मात्र शब्दकोशात शोधावे लागतील अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले. अडचणीत सापडल्यानंतर आपण मदतीला धावून जायला हवे ही शिकवण भूकंपाने दिली. ओरिसातील भूकंप असो अथवा गुजरातमधील. भूकंपग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात देऊ केला. २५ वर्षांनंतर भूकंपग्रस्त भागातील लोकांच्या मनात समाजऋण फेडण्याची भावना वाढीस लागणे हेच कौतुकाचे आहे.