आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या नगर विभागाने ३६२ जादा गाडय़ांचे नियोजन केले आहे. येत्या दि. २३ पासून या जादा गाडय़ा सुरू होणार आहेत.
एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी जे. एन. शिरसाठ यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पंढरपूरच्या तसे जवळचे व मध्यवर्ती शहर म्हणून नगरहून दरवर्षी या काळात मोठय़ा प्रमाणावर येथून भाविक पंढरपूरला जातात त्यांच्यासाठी नगर विभागाच्या वतीने दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात येते. यंदा धुळे व जळगाव विभागातून ७५ जादा गाडय़ा मागवण्यात आल्या आहेत. याशिवाय जिल्ह्य़ातील जिल्ह्य़ातील कमी उत्पन्नाच्या काही मार्गावरील गाडय़ा तूर्त बंद करण्यात येणार आहेत. येथील प्रवाशांची काही दिवस गैरसोय होणार असली तरी आषाढी एकादशी झाल्यानंतर या गाडय़ा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. केवळ आषाढीच नव्हे तर पुढच्या महिन्यात नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीही जिल्ह्य़ातून जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. नगर शहरातील जुन्या बसस्थानकावरून पंढरपूरसाठी जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत.