जळगावमधील अंजनी धरणात शनिवारी पाच महिलांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथील एरंडोल गावानजीक ही घटना घडली. या महिला कपडे धुण्यासाठी धरणावर गेल्या असताना हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तविण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, गावातील सहा महिला धरणावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा यांच्यापैकी कोणीतरी पाण्यात पडले आणि एकमेकांना वाचविण्याच्या नादात या पाचही महिला पाण्यात बुडाल्या. दरम्यान, यापैकी एक महिला वाचली असून तिने गावात येऊन सगळ्यांना याबद्दल सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दरम्यान, सध्या पोलीस याठिकाणी दाखल झाले असून ते हा प्रकार घातपात होता की अपघात याचा शोध घेत आहेत.