सोलापुरातील बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न सतत चर्चेत विषय ठरला असताना सोलापूरची ही बदनामी दूर करण्यासाठी, पर्यायाने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी अखेर शहरात दोन उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून सातशे कोटींचा निधी मिळण्यासाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी या दोन्ही उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी मंजुरीचे पत्र सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांना दिले आहे. जुना पुणे नाका ते सात रस्ता आणि बोरामणी नाका ते कुमठा नाका या दोन मार्गावर उड्डाणपुलाची उभारणी केली जाणार आहे. हे काम सुरू होण्यासाठी मंजूर झालेला निधी उपलब्ध होण्यासाठी व त्यानुसार ठरलेल्या वेळेत उड्डाणपूल उभारणीचे काम पूर्ण होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असल्यामुळे हे काम लवकरच मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जुना पुणे नाका ते सात रस्ता तसेच बोरामणी नाका (हैदराबाद मार्ग) ते कुमठा नाका हे दोन्ही मार्ग राष्ट्रीय महामार्ग व शहरातील प्रचंड वाहतुकीने व्यापले आहेत. हलक्या व जड वाहनांच्या वाहतुकीने याठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यातून अधुनमधून लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी अनेक दिवसांपासून होती. १२ वर्षांपूर्वी शहरात एमएसआरडीमार्फत रस्ते विकास प्रकल्पांतर्गत उड्डाणपुलांचा प्रस्ताव होता. परंतु त्यास प्राधान्य दिले गेले नाही. आता उशिरा का होईना एकाचवेळी प्रत्येकी ३५० कोटी खर्चाचे दोन उड्डाणपूल मार्गी लागत असल्यामुळे सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे.