औरंगाबाद येथील आंबेडकर नगर चौकात भरधाव वेगात जाणाऱ्या खासगी बसने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला. तर दुसऱ्या अपघातात दुचाकीवर असलेले दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. तासाभराच्या अंतराने झालेल्या दोन अपघातांमुळे संतापलेल्या नागरिकांनी खासगी बसवर दगडफेक करुन काचा फोडल्या. या घटनेमुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिसाररवाडी भागातील गल्ली क्रमांक १० या ठिकाणी राहणारे मोहम्मद सिद्दीक लियाकत अली शेख (वय ६५) हे दुपारी चारच्या सुमारास आंबेडकर नगर चौकातून जात होते. त्यावेळी कंपनी कामगारांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसने मोहम्मद शेख यांना धडक दिली. ज्यानंतर शेख जखमी होऊन रक्ताच्या थाऱोळ्यात पडले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हा अपघात होऊन एक तास उलटत नाही तोच हर्सुल येथील टी पॉईंटवर भरधाव वेगाने जाणाऱ्या खासगी बसने दुचाकीवर बसलेल्या दाम्पत्याला धडक दिली. त्यामुळे हे दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे संतापलेल्या नागरिकांनी बसवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक बाळासाहेब अहेर यांच्यासह दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सौम्य बळाचा वापर करत पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या जमावाला हुसकावून लावले.