प्रवाशांना घेऊन निघालेली भरधाव जीप उलटून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार तर सहा गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर ते कटंगी मार्गावरील नाकाडोंगरीजवळील राजापूर येथे मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. मृतांत दोन महिलांचा समावेश आहे.

कल्पना सरोदे (३५ रा. कवलेवाडा ता. तुमसर), अरूणा प्रकाश मोहनकर (वय ४५, रा. तुमसर) अशी मृतांची नावे आहेत. एकाची ओळख पटली नव्हती. मध्यप्रदेशातून प्रवासी घेऊन जीप (एमएच ३६ ४२४७) सकाळी तुमसरकडे येत होती. नाकाडोंगरीजवळील राजापूर येथील वळणावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात तिघे जागीच ठार झाले. तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तुमसर येथे पाठवण्यात आले. जखमींची नावे कळू शकलेली नाही.