चिखलफेक आंदोलन केल्याबद्दल माझ्यावर टीका होते आहे. हे आंदोलन कुणाला आवडो किंवा न आवडो बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांना हे आंदोलन नक्कीच आवडलं असतं असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे. उप अभियंत्याच्या अंगावर बादली भरून चिखल ओतल्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना अटक करण्यात आली होती. जामिनावर त्यांची बुधवारी सुटका करण्यात आली. सुटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी माझं कौतुक केलं असतं. शाब्बास नितेश तू केलंस ते चांगलं केलंस असं ते म्हटले असते असंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं. नितेश राणे यांना दर रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यावर विचारलं असता, बरं झालं दर रविवारी कणकवलीत यायला मिळेल. न्यायलयाने माझा प्रचार सोपा केला अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी दिली आहे. दरम्यान नितेश राणे त्यांची भूमिका फेसबुक लाइव्ह करून मांडणार आहेत. त्यासंदर्भातले ट्विटही त्यांनी केले आहे.

नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना चिखलफेक प्रकरणात ४ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा न्यायालयाने त्यांना ९ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर नितेश राणे यांनी स्वतःच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी मला या आंदोलनाबद्दल शाबसकीच दिली असती असंही ते म्हटले आहेत. आम्हाला शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. आंदोलन केलं ते योग्यच झालं अशी जुन्या शिवसैनिकांचीही भावना होती. आंदोलनानंतर आता रस्ता तयार करण्यास सुरूवात झाली आहे असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यांवर खड्डे असल्याने नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उप अभियंत्याला चिखलाने अक्षरशः अंघोळ घातली होती. ज्याप्रकरणी नितेश राणे आणि त्यांच्या १८ समर्थकांना जामीन मंजूर करण्यात आला. २० हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला. नितेश राणेंसह सर्व आरोपींना दर रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. तसंच असे पुन्हा करणार नाही आणि पोलिसांना तपासात सहकार्य करू अशी हमीही द्यावी लागणार आहे.