सर्वसाधारण श्रेणीतील आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या लोकांसाठी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये १० टक्के आरक्षणाच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असा आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

महाडच्या जाहीर सभेत अजित पवार यांनी केंद्र आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये भाजप सरकारवर जोरदार आसूडही ओढले. जोपर्यंत केंद्रातील आणि राज्यातील सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही असे आदेशच कार्यकर्त्यांना दिले.

अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये आरक्षणाचा मुद्दा काढला. आरक्षण द्यायचंच होतं…दानत होती तर गरीबांना द्यायचं होतं असा सवाल करतानाच आयकर भरणाऱ्याला आरक्षण आणि ज्याची एकवेळ चुलही पेटत नाही त्या गरीबाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या असा आरोपही अजित पवार यांनी केला.

ज्या शिवछत्रपतींचा आर्शिवाद आणि त्यांच्या नावाचं ब्रॅडींग करुन भाजपाने सत्ता मिळवली…लोकांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत देशातील आणि राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. त्या लोकांना धडा शिकवण्यासाठी शिवरायांच्या साक्षीने बळीराजाचे राज्य आणावयाचे आहे म्हणून हा निर्धार करण्यात आला असून तशी शपथ रायगडावर घेतल्याचे सांगत जातीयविरोधी…कामगारविरोधी…सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर करण्याचा निर्धार समविचारी पक्षांना एकत्र घेवून परिवर्तनाची मुहुर्तमेढ आज रोवली गेली आहे, त्याला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी महाडमध्ये जाहीर सभेत केले.