विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती केली हीच चूक झाली नाहीतर भाजपाला १५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे या कार्यक्रमात प्रमुख वक्ते होते. भाऊ तोरसेकरांनी जी राजकीयं भाकितं केली होती त्याचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?
“भाऊ तोरसेकर यांनी २०१३ मध्ये सांगितलं होतं की भाजपाने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडलं तर संपूर्ण बहुमत २७२+ जागा भाजपाला मिळतील. त्यावेळी भाऊ तोरसेकर अशक्य वाटणारा अंदाज बांधत आहेत असं अनेकांना वाटलं. मात्र त्यांचं ते भाकित खरं ठरलं. २०१९ मध्येही काहिशी अस्थिरता होती. त्यावेळीही भाऊ म्हणाले होते की ३००+ जागा येतील. लोकसभा निवडणुकीत तेच घडलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी एक पुस्तक लिहून भाजपाला पर्याय दिले होते. भाजपा १५०+ किंवा युती २००+ त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय निवडला नसता तर तोरसेकर यांचं तिसरं भाकित खरं ठरलं असतं. आपण मोदींच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात १५०+ जागा जिंकल्या असत्या. युती केली हीच चूक झाली ” असं फडणवीस म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ

आणखी काय म्हणाले फडणवीस?

“करोनाच्या काळात सुद्धा विक्रमी FDI भारतात आला. हा आज जगाचा भारतावर असलेला विश्वास आहे.
शेतकरी वर्गासाठी सर्वाधिक कल्याणाच्या योजना पंतप्रधान मोदी यांनी राबविल्या. आता सुद्धा अनेक योजना राबविल्या जात असताना केवळ गैरसमज निर्माण केले जात आहेत.दिल्लीतील प्रस्थापितांना मोठे आव्हान देण्याचे काम त्यांनी केले. ती व्यवस्था एकतर आमच्यातील व्हा किंवा बाहेर जा, ही सांगणारी होती. पण पंतप्रधान मोदी हे त्या व्यवस्थेचे भाग न बनता त्यांनी एक नवी व्यवस्था निर्माण केली.”