प्रशांत देशमुख

शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे कौतुकास्पद कार्य

वर्धा : विदर्भात सर्वाधिक संख्येने करोना रुग्ण हाताळणारे खासगी रुग्णालय म्हणून लौकिक झालेल्या सावंगीच्या शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पहिला करोना बळी तसेच करोनामुक्त पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. त्यास १० मे रोजी वर्ष पूर्ण झाले. तेव्हापासून ते आता वर्षपूर्ती होत असताना कार्यरत डॉक्टर व इतर वैद्यकीय सेवकांची चमू संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असून अविश्रांत सेवेचे हे पर्व आरोग्य क्षेत्रासाठी भूषणावह ठरले आहे.

८ मे २०२० ला दाखल होताच मृत्यू झालेल्या महिलेचा करोना अहवाल बाधित आला होता. ती जिल्हय़ातील पहिली करोनाबाधित ठरली. तेव्हापासून पुढे प्रशासनाने कडेकोट उपाय सुरू केले. मात्र हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर मे महिन्यातच जिल्हा प्रशासनाने सावंगी व सेवाग्रामचे रुग्णालय अधिग्रहित करून रुग्णांना मोफत उपचार सुरू केले. परिणामी, लगतच्या पाचही जिल्हय़ातील रुग्ण सावंगीच्या रुग्णालयात दाखल होत गेले. वाढत्या रुग्णसंख्येच्या पाश्र्वभूमीवर डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक यांची मोठी चमू गठित करणे भाग पडले. संपूर्ण ३६५ दिवस व पुढेही जबाबदारी असणाऱ्या चमूत डॉ. शौर्य आचार्य, डॉ. सुनील कुमार, डॉ. शिल्पा बावनकुळे, डॉ. विवेक चकोले, डॉ. तुषार सोनटक्के, डॉ. स्वप्निल लाहोले यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. तसेच परिचारिका समन्वयक माधुरी ढोरे यांच्या नेतृत्वात आठ परिचारिकांची चमू सहाय्यकांसह अद्याप कार्यरत आहे. त्यांना मदत करणारे इतरही आहेच. परंतु या डॉक्टरांची सेवा गौरवास्पद ठरल्याचे म्हटले जाते. आतापर्यंत ६ हजार ९१४ रुग्णांची तपासणी झाली. त्यापैकी ५ हजार ७२४ सुखरूप घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचा दर ९५.२३ टक्के असा आहे. आता प्राणवायू व व्हेंटिलेटरसंलग्न मिळून ६५० खाटांवर रुग्णोपचार होत आहे. त्यांच्यावर ३५२ परिचारिका, १३० डॉक्टर व १७५ आरोग्य सेवक देखरेख ठेवतात. चोवीस तास कार्यरत विशेष चमू असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी नमूद केले.

आता बोलबाला असलेल्या रेमडेसिविरचा ऑगस्ट २०२० पर्यंत उपचारात समावेशसुद्धा नव्हता. त्यापूर्वीदेखील आरोग्य खात्याने सुचवलेल्या औषधावर रुग्ण बरे करण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचा दाखला प्रशासकीय अधिकारी डॉ. विठ्ठल शिंदे  व डॉ. महाकाळकर देतात. यादरम्यान ५० डॉक्टर, २५ परिचारिका व २५ आरोग्यसेवक स्वत:च करोनाबाधित झाले. मात्र बरे झाल्यावर परत करोना रुग्णासाठी त्यांनी सेवा रूजू केली. काहींनी तर आपल्या बाळाची जबाबदारी कुटुंबाकडे सोपवत पूर्णवेळ सेवा दिली. सेवेसोबतच माणुसकीचा एक मोठा दाखला सफाई कर्मचारी वृंदा चौधरी यांनी निधन झालेल्या रुग्णाकडे पडून असलेल्या सव्वा लाख रुपये कुटुंबास परत करीत दिला. शासकीय प्रयोगशाळेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत विजय बाभूळकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील ११ ते ७० वयोगटातील एकूण दहा लोक याठिकाणी रुग्ण म्हणून दाखल झाले. ते सांगतात की एक रुपयाही खर्च न करता आम्ही सर्व रुग्णालयातून तंदुरुस्त होऊन बाहेर पडलो. अशी कीर्ती वाढत गेल्याने परजिल्हा व परप्रांतातून रुग्ण दाखल होत गेले. शेवटी प्रशासनास केवळ जिल्हय़ातीलच रुग्णावर मोफत उपचार करण्याचे बंधन घालावे लागले.

करोना रुग्णसेवेची वर्षपूर्ती होत असताना इतक्या मोठय़ा प्रमाणात रुग्ण हाताळणाऱ्या या रुग्णालयात स्वत:चा प्राणवायू प्रकल्प नसल्याबद्दल बोट दाखवले जाते. महिन्याभरापूर्वी पुरवठा खंडित झाल्याने प्राणवायूसाठी प्रशासनाला चांगलीच धावपळ करावी लागली होती. यावर बोलताना प्रशासकीय अधिकारी डॉ. उदय मेघे म्हणाले की, स्वत:चा प्राणवायू प्रकल्प असणे आवश्यक असल्याचे रुग्णसंख्या वाढल्यावरच जाणवले. मात्र आता दोन कोटी रुपये खर्चाचा प्राणवायू प्रकल्प प्रस्तावित असून काही काळाने तो उपयोगात येईल. शासनाला एका छोटय़ा प्रकल्पाची मागणी केली असून तो लगेच मार्गी लागेल.

मेघे अभिमत विद्यापीठ अधीनस्थ या रुग्णालय व्यवस्थेला मार्गदर्शन करणारे कुलगुरू डॉ. राजीव बोरले म्हणाले, उणिवांवर मात करीत आम्ही करोनाचे आव्हान ग्रामीण भागात राहूनही यशस्वीपणे परतवले आहे. राज्य शासनाने उत्कृष्ट करोना काळजी केंद्र म्हणून आम्हाला प्रशस्तीपत्र दिले. पहिल्या लाटेत केवळ ९२ मृत्यू व दुसऱ्या लाटेत ३८६ मृत्यू झालेत. विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्या हाताळत असूनही आमच्या रुग्णालयावर हलगर्जीचा ठपका कोणी ठेवला नाही. प्रशासनाशी समन्वय साधून यापुढेही करोनाचे आव्हान पेलण्याचा निर्धार आहे.