उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 19 मे हा धक्कादायक ठरला असून मुंबई, पुणे येथून आलेल्या 6 रुग्णांना करोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 रुग्ण हे हायरिस्क म्हणजे गंभीर स्थितीच्या प्रकारात आहेत. तर, या 6 रुग्णाच्या संपर्कातील 46 जणांना प्रशासनाने क्वारंटाइन केले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद शहरातील 29 वर्ष रुग्णाला ब्लड कॅन्सर आहे तर तुळजापूर शहरातील करोनाबाधीत महिला ही 6 महिन्यांची गर्भवती असून त्यांना विशेष वैद्यकीय निगरणीत ठेवण्यात येणार आहे. कळंब येथील रुग्णाची प्रकृती चिंताजनक बनली असून त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी 19 मे रोजी 6 रुग्ण सापडल्याने उस्मानाबाद जिल्ह्याचा रुग्णाचा आकडा 16 वर गेला असून त्यापैकी 13 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 3 रुग्ण बरे झाले आहेत.

आणखी वाचा- सोलापुरात करोनामुळे आणखी दोन मृत्यू; पाच नवे रूग्ण

उस्मानाबाद शहरातील धारासूर मर्दिनी देवी रोड भागात असलेल्या एका तरुणाला करोनाची लागण झाली असून तो तरुण मुंबई येथून सोलापूरपर्यंत खासगी जीपने त्याच्या आईसह 5 जणसोबत आला व त्यानंतर सोलापुरहून 20 किमी पायी चालत हे आई व मुलगा उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत आले.  यानंतर त्याचा भाऊ त्यांना दुचाकीवर उस्मानाबाद शहरात घेऊन आला. या रुगणाला अगोदर पासूनच ब्लड कॅन्सर असून त्यात कोरोना ही चिंताजनक बाब  आहे. या तरुणाच्या घरी 12 जण असून इतर 7 असे 19 जण  हायरिस्क संपर्कात  प्रकारात आहेत.

तुळजापूर शहरातील 21 वर्षीय महिला पुणे येथून आली असून ती 6 महिन्याची गरोदर आहे, त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. भोसले गल्लीत राहणाऱ्या या महिलेच्या संपर्कात 12 जण आले आहेत. भूम येथील 13 वर्षीय मुलगा हा मुंबई येथून आला असून त्याची बहीण मुंबई येथे पॉझिटिव्ह आढळली व  आई नर्स आहे. हा मुलगा वडिलांसोबत गावी आला असून त्याला शाळेत ठेवण्यात आले होते, याच्या संपर्कात 2 जण आहेत अशी माहिती गलांडे यांनी दिली.

आणखी वाचा- औरंगाबाद जिल्ह्यात 41 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, करोनाबाधितांची संख्या 1117 वर

परंडा तालुक्यातील 2 रुग्ण हे भूम तालुक्यातील रुग्णाच्या सोबत प्रवास करून आले होते त्यांच्या संपर्कातील 7 जण हायरिस्क आहेत.लोहारा तालुक्यातील जेवळी येथील रुग्ण कांदिवली मुंबई येथून आला असून त्याच्या संपर्कात 6 जण आले आहेत. या सर्व 6 रुग्णावर उपचार करण्यात येणार असून संपर्कातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. कळंब येथील महसूल विभागाच्या कर्मचारी असलेल्या रुग्णाला अगोदरच किडनीचा त्रास असल्याने त्याची स्तिथी चिंताजनक बनली आहे.

आणखी वाचा- जिल्ह्याबाहेरील रुग्णांमुळे वर्धा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव!

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडीचे 2 जण, भूम तालुक्यातील गिरवलीचा 13 वर्षाचा एक मुलगा , उस्मानाबाद शहरातील एक तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळीचा एक तरुण, तुळजापूर शहरातील 1 महिला यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. विशेष म्हणजे वरीलपैकी तुळजापूरची महिला पुण्यावरून आली असून इतर सगळेजण हे मुबंईवरून आलेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर वरील सर्व 6 जणांना क्वारंटाइन केले होते.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत 19 मे रोजी उस्मानाबाद जिल्हयातील 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णीत आहे. अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली