आंदोलनात जामीन नाकारल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांना पोलीस आणि तुरुंग प्रशासनाने त्रिस्थळी यात्रा घडवली. पाथर्डीहून नगर, येथून विसापूर आणि आज पहाटे तेथून औरंगाबाद येथील हर्सूल कारागृह अशी त्यांची रवानगी करण्यात आली. या त्रिस्थळी यात्रेमुळे ढाकणे यांना ऐन थंडीत रात्र जागून काढावी लागली.शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे नऊ महिन्यांचे पगार थकीत आहेत. ते मिळेपर्यंत प्रशासनास लेव्हीची साखर उचलण्यास विरोध करण्यात आला असून त्यासाठी आंदोलन सुरू आहे. ज्येष्ठ नेते ढाकणे हेच कारखान्याचे संस्थापक आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे. लेव्हीची साखर उचलण्यास विरोध करणाऱ्या या आंदोलकांना पोलिसांनी परवा (गुरुवार) रात्री अटक केली. अटकेनंतर ढाकणे यांच्यासह अन्य आंदोलकांनी जामीन नाकारल्याने त्यांना शुक्रवारी शेवगाव येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्यांना आठ दिवस म्हणजे दि. १५ नोव्हेंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.ढाकणे यांच्यासह अन्य आंदोलकांना शुक्रवारी सायंकाळी शेवगावहून नगरला आणण्यात आले. येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर नगरच्या सबजेलमध्ये जागा नसल्याने त्यांना रात्री विसापूर येथे हलवण्यात आले, मात्र नव्या नियमानुसार विसापूर येथे त्यांना ठेवणे शक्य नव्हते. हे कारागृह खुले कारागृह असल्याने ढाकणे यांना येथे ठेवून घेण्यास विसापूर कारागृह प्रशासनाने असमर्थतता दर्शवली. त्यामुळे मध्यरात्री त्यांना पुन्हा नगरला आणण्यात आले. थंडीच्या कडाक्यात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच पहोटपर्यंत त्यांना ठेवण्यात आले. या सर्वानी थंडीत या आवारातच रात्र जागून काढल्यानंतर शनिवारी सकाळी हर्सूल कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. पाथर्डी-शेवगावला बंददरम्यान, ज्येष्ठ नेते ढाकणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाथर्डी व शेवगाव येथे शनिवारी जोरदार आंदोलने करण्यात आली. पाथर्डी येथे मोर्चा काढून सुमारे दोन तास रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. पाथर्डी येथे बंदचेही आवाहन करण्यात आले होते, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.