१ जानेवारीला जो हिंसाचार भीमा-कोरेगावमध्ये झाले त्या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. दंगली उसळत आहेत. धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये भेदाभेद केला जातो आहे, महाराष्ट्र बंद झाला मात्र झालेला प्रकार दुर्दैवी आहे. काही समाजकंटकांनी केलेल्या कृत्याची फळे आम्ही आत्ताही भोगत आहोत. भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली आहे. आमच्या गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या लोकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तीन दिवस गावात लाइट नाही, पाणी नाही आमचे हाल होत आहेत. मात्र अकारण आमच्या गावाची बदनामी केली जाते आहे अशी भूमिका आता भीमा कोरेगावच्या ग्रामस्थांनी केली. प्रशासनाने आमच्या गावाकडे सपशेल दुर्लक्ष केले. पाच दिवस उलटूनही आमच्या गावाबाबत विचारणा केलेली नाही. आम्ही कोणताही जातीभेद न मानता दलित, मराठा तसेच इतर जाती एकत्र गुण्या गोविंदाने नांदत आहेत. जे काही गावात झाले ते बाहेरच्या लोकांनी केले असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणातल्या दोषींना लवकरात लवकर पकडून कडक शिक्षाच केली पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. १ जानेवारीला जो हिंसाचार घडला त्यामध्ये कोरेगावातील ग्रामस्थांचे सगळ्यात जास्त नुकसान झाले. आर्थिक नुकसान झाले या सगळ्याचा आम्हाला खेद आहेत. धर्माच्या नावाखाली भेदाभेद सुरु आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे. खरी परिस्थिती दाखवली जाते तशी नाही. गावाबाहेरच्या समाजकंटकांनी येऊन इथे हिंसाचार माजवला आणि अकारण आम्हाला आणि आमच्या गावाला बदनाम केले जाते आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप डॉक्टर वर्षा शिवले यांनी केला. वर्षा शिवले मागील १६ वर्षांपासून भीमा कोरेगावच्याच ग्रामस्थ आहेत. काही चिथावणीखोर लोकांनी गावात येऊन गावाची शांतता आणि ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न केला. वादग्रस्त इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न येथे काही चिथावणीखोर लोकांनी केला. प्रशासनाने दलित समाज आणि मराठा समाजाला पुरेशी सुरक्षा पुरवली नाही. कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केली नाही त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले म्हणून हा हिंसाचार उसळला असाही आरोप शिवले यांनी केला. आमच्या गावातील दुकाने फोडण्यात आली. तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहने जाळण्यात आली. यामागे नेमके कोण आहे? हे सरकारने शोधावे कारण आमच्या गावात सगळे लोक गुण्यागोविंदाने राहतात. ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी करण्यात आली. राहुल पटांगेच्या कुटुंबाला एक कोटींची मदत द्या आमच्या गावातला मुलगा राहुल पटांगे याची हत्या करण्यात आली त्याच्या कुटुंबाला १ कोटींची मद मिळाली पाहिजे अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. या पत्रकार परिषदेला सरपंच संगिता गोविंद कांबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य वृषाणी हणमंत गवाणे यांनीही भूमिका मांडली आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घ्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली.