राज्यात करोनाचं सावट गडद होऊ लागलेलं असतानाच दुसरीकडे राजकीय सुंदोपसुंदी देखील तेवढ्याच वेगाने सुरू आहे. भाजपा नेते आणि खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्यासंदर्भात पोस्ट केली असून यामध्ये थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं आहे. "तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोललं पाहिजे", असं निलेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. काय म्हणाले निलेश राणे? भाजपामध्ये महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी असणाऱ्या निलेश राणेंनी शुक्रवारी सकाळीच ट्वीट करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं. "अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपाचे आमदार येतात ते पाहा. पवार साहेब, ते तुमच्याकडे नाही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल, त्या दिवशी आमदार सोडा नारळपाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. विचार करून बोललं पाहिजे", असं निलेश राणे म्हणाले आहेत. अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पहा. पवार साहेब ते तुमच्याकडे नाही ही तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडा नारळ पाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, विचार करून बोललं पाहिजे. — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2021 राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून करोनाचं संकट राज्यात ठाण मांडून बसलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसताना अनेकदा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील भाजपाकडून थेट लक्ष्य केलं जात आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येण्याआधी अजित पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी राजभवनावर शपथविधी घेतला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती झाल्याची खळबळ आख्ख्या महाराष्ट्रात झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांचा पाठिंबा भाजपा सरकारला देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, तीन दिवसांमध्ये अजित पवारांनी आपला पाठिंबा काढला आणि देवेंद्र फडणवीसांचं राज्याच्या इतिहासातलं सर्वात अल्पकाळ चाललेलं सरकार पडलं. तेव्हापासून अनेकदा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगताना दिसून येतो.