महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण झाला आहे. दहावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिवसेना- भाजपाचे गोडवे गाण्यात आले असून काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षांवर मात्र पुस्तकातून टीका करण्यात आली आहे. भाजपा सरकारच्या या कारभारावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद आता शालेय अभ्यासक्रमात उमटू लागले की काय, असा प्रश्न निर्माण करणारे उल्लेख यंदाच्या पाठ्यपुस्तकात दिसून येत आहे. दहावीत यंदा प्रथमच राज्यशास्त्र या विषयाचा समावेश करण्यात आला. यातील एका धड्यात भाजपा आणि शिवसेनेची कौतुक करणारी माहिती देण्यात आली आहे. भाजपा हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा पक्ष आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. तर शिवसेनेचीही पाठ्यपुस्तकात स्तुती करण्यात आली आहे. शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष असून त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेबाबत माहिती देताना भगव्या रंगाचा वापर करण्यात आला. घराणेशाही ही लोकशाहीसमोरील मोठी समस्या आहे का, असा प्रश्न पुस्तकात विचारण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. याद्वारे काँग्रेसला चिमटा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.  काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील भाजपावर टीका केली आहे. शालेय विद्यार्थ्यांवर युतीची छाप पाडण्याचा हा प्रयत्न आहे की काय, अशी शंका विरोधक उपस्थित करत आहे.