३१ मार्चला रात्री उशिरापर्यंत कामकाजाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : वित्तीय वर्ष २०२०-२०२१ हे ३१ मार्च रोजी पूर्ण होत आहे.  या दिवशी  व्यवहार वाढण्याची शक्यता  असल्याने त्या दिवशी  कामकाजाची वेळ वाढवून रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे.

३१ मार्च २०२१ हा वित्तीय वर्षांचा शेवटचा दिवस असल्याने कोषागार व उपकोषागार कार्यालयाच्या गणना फलकावर (काऊंटरवर)  सादर होणारी सर्व प्रकारची देयके स्वीकारून ती नियमानुसार पारित करणे आवश्यक असल्याने त्यांचे धनादेश, ईएफटी, सीएमपी त्याच दिवशी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना निर्गमित करणे आवश्यक आहेत. त्यामुळे या दिवशी शासकीय व्यवहार वाढण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित बँकांची नियमित कामकाजाची वेळ वाढविणे अपरिहार्य आहे.

महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ४०९ मध्ये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार पालघर जिल्ह्यतील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका  ३१ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवून शासकीय प्रदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी,  या दिवशी पालघर जिल्ह्यमधील कोषागार, उपकोषागार कार्यालयाशी प्रत्यक्ष समन्वय साधून शासकीय व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच बँका बंद करण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ल्ल बँका २७ मार्च ते ४ एप्रिल या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये केवळ एकच दिवस सुरू राहणार असल्याच्या केवळ अफवा ठरल्या आहेत.