लांबलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यतील ताडी उत्पादकांना झळ पोहोचली असून बहुतांश ठिकाणी ताडी उत्पादन प्रत्यक्ष सुरू झाले नसताना ताडी उत्पादकांना डिसेंबर महिन्यापर्यंतचे शुल्क भरावा लागणार आहे. ताडी उत्पादकांना झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी, सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचे परवाना शुल्क माफ करावे तसेच आगामी काळातील शुल्कात सवलत द्यावी अशी मागणी पालघर जिल्हा ताडी अनुज्ञप्ती (परवाना) धारक संघटनेने केली आहे. दरवर्षी १ सप्टेंबर ते ३० ऑगस्ट अशा बारा महिन्यांच्या कालावधीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे ताडी परवाना देण्यासाठी लिलाव आयोजित करण्यात येतात. ही प्रक्रिया दर वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित असते. यंदाच्या वर्षी राज्यभरात निर्माण झालेली पूरपरिस्थिती व त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका तसेच राज्याच्या किनारपट्टीला बसलेल्या चक्रीवादळाचा तडाखा यामुळे लिलाव प्रक्रिया होऊ शकली नाही. उत्पादन शुल्क विभागाने प्रथम सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर अशी व त्यानंतर पुन्हा दोन महिन्यांकरिता ३१ डिसेंबपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असली तरी त्यानंतर परवाना घेताना मागील महिन्याचा परवाना शुल्क गेल्या वर्षीच्या अनुषंगाने आकारण्यात आला आहे. लांबलेला पाऊस व चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ताडी काढण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले नव्हते. ताडाच्या झाडाला येणारा पोई येण्यास विलंब झाल्याने त्यामध्ये छिद्र करून ताडी काढणे आजून शक्य झालेले नाही. त्याचप्रमाणे शिंदीमधून ताडी काढण्यासाठी वातावरणामध्ये किमान १०-१५ दिवस उन्ह अर्थात उष्णता असणे आवश्यक असते. मात्र, यंदाच्या वर्षी आकाशामध्ये ढगाळ वातावरण कायम असल्याने ताडी उत्पादनावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. माहीम-वडराई भंडारी ताडी उत्पादन सहकारी औद्योगिक संस्था, सातपाटी ताडी माडी सहकारी संस्था, केळवे-माहीम भंडारवाडा (बंदर) सहकारी या सहकारी संस्थांसह ८० ते ९० टक्के ताडी उत्पादकांनी अजूनही प्रत्यक्ष ताडी उत्पादन सुरू केले नाही. असे असले तरी आगामी काळात परवाना शुल्क घेण्यासाठी या उत्पादकांना गेल्या वर्षीच्या आकारण्यात आलेल्या शुल्काच्या आधारावर ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या चार महिन्यांकरिता येणारी रक्कम जमा करावी लागणार आहे. पालघर जिल्ह्यात जानेवारी अखेरीस जिल्हा परिषद निवडणुका घेण्यात येणार असून पुन्हा आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत ताडी उत्पादकांची लिलाव प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहेत. हे पाहता शासनाने ऑगस्ट २०२० पर्यंत परवान्या ना मुदतवाढ द्यावी तसेच याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी येथील उत्पादकांनी केली आहे. ताडी उत्पादकांच्या मागणीचे निवेदन सादर ताडी हा शेतीपूरक व्यवसाय आहे. राज्यात शेतकऱ्यांना विविध प्रकारे सवलतीचे पॅकेज देण्यात येते. वातावरणातील बदलामुळे ताडी उत्पादनावर झालेला परिणाम पाहता राज्य शासनाने गेल्या चार महिन्यांचे परवाना शुल्क माफ करावे आणि पुढील कार्यकाळातील परवाना शुल्कामध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी पालघर जिल्हा ताडी अनुज्ञप्ती (परवाना)धारक संघटनेचे अध्यक्ष मनोज घरत यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील ताडी उत्पादकांची बैठक पालघरमध्ये संपन्न झाली असून याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ताडी उत्पादकांच्या मागणीची निवेदन सादर करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सहकारी ताडी उत्पादन संस्थांना परवाना शुल्कात सवलत देण्यात यावी. तसेच गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी परवान्यावर स्वाक्षरी करण्यात आली असताना ऑक्टोबर महिन्याचे शुल्क आकारणी झाली होती. ही रक्कम यंदाच्या शुल्क रकमेतून वगळण्यात यावी. - विजय भास्कर राऊत, माजी अध्यक्ष,