नंदुरबार शहरात शनिवारी दोन गटांमधील वैमनस्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी ५ जून रोजी खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर एका व्यक्तीला काही जणांकडून मारहाण करण्यात आली होती. या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नंदुरबार शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. याचा फायदा घेत काही समाजकंटकांनी दगडफेकीला सुरूवात केली. तसेच काही ठिकाणी दुकानांची तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. त्यामुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. दरम्यान, यानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. त्यामुळे सध्या संपूर्ण शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असून या ठिकाणी अघोषित संचारबंदीचे वातावरण दिसून येत आहे. तसेच दगडफेक करणाऱ्या १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदुरबार शहरातील शास्त्री मार्केटलगत असणाऱ्या एका खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडीवर ५ जून रोजी दोन गटात वाद निर्माण झाला होता. यावेळी एकाने पेट्रोलची बाटली फेकल्याने येथील खाद्यपदार्थ विक्रेता भाजल्याने त्याच्यावर मुंबईत उपचार सुरु होते. त्याचा आज पहाटे मृत्यू झाला. यानंतर मृत व्यक्तीच्या घराजवळ काही लोक जमा झाले होते. याचा फायदा घेत काही समाजकंटकांनी गावात दगडफेक सुरु करत दुकानांमध्ये घुसुन तोडफोड आणि जाळपोळ करायला सुरुवात केली. शहरातील सुभाष चौक, मंगळबाजार, सोनार खुंट अशा विविध परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. या परिसरात दगड, विटा, आणि काचेच्या फुटलेल्या बाटल्यांचा सर्वत्र खच दिसून येत होता. तर दादा गणपती शेजारील फ्रिजच्या दुकांनाची तोडफोड करत या दुकानातील फ्रीज पेटवून देण्यात आले. येथील सोनार खुंट परिसरात एका घरातही जाळपोळ करण्यात आली. नगरपालिका चौकातील आझाद लस्सी या दुकानाची तोडफोड करत हे दुकानही जाळण्यात आले. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नंदुबार पोलिसांनी शहरात मोठ्या स्वरुपात बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकाराबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी जाळपोल करणाऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या संपूर्ण घटनेप्रकरणी पंधरापेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त होत आहे. धुळ्याहून राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्यांसह अतिरिक्त पोलीस कर्मचारी या ठिकाणी मागवण्यात आले आहेत. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.