मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला असल्याची सुत्रांची माहिती आहे. १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुनगंटीवार म्हणाले होते. शिवसेना आणि मित्र पक्षांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणं मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल, असे सूतोवाच मुनगंटीवारांनी केले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवनियुक्त केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी खातेविस्तार आणि बदल होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली होती. रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री झाल्याने नव्या प्रदेशाध्यक्षाचीही नियुक्ती केली जाणार असून त्याबाबतही फडणवीस आणि शहा यांच्या बैठकीत बोलणी झाली होती.
दिल्लीत ९ जून रोजी भाजपची महत्त्वाची बैठक झाली होती. यावेळी मंत्रिमंडळ, पक्षाध्यक्ष, दुष्काळ आदी मुद्दय़ांवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले होते. गुरुवारी संध्याकाळी फडणवीस यांनी शहा यांची भेट घेऊन राज्यातील दुष्काळ परिस्थितीची माहिती दिली होती. केंद्राने राज्याच्या मागणीनुसार दुष्काळनिधी दिलेला आहे. वास्तविक फडणवीस यांची शहा यांच्याशी झालेली भेट ही शुक्रवारी मुंबईत भाजपच्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर झालेली. राधाकृष्ण विखे-पाटील भाजपामध्ये प्रवेश करण्यास असल्याने त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचेही समजते. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार राज्यातील अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही दिली होती.