मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे अशी स्तुती मुंबई भाजपा अध्यक्षपदी नियुक्ती झालेले मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. मावळते अध्यक्ष आशिष शेलारदेखील यावेळी उपस्थित होते. मंगल प्रभात लोढा यांनी आशिष शेलारांचं कौतुक करताना आज जी गर्दी झाली आहे ती आशिष शेलार यांच्यामुळेच असं म्हटलं.

मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व ३६ जागा जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. २०१४ च्या निवडणुकीचा उल्लेख करताना त्यावेळी ४८ तास आधी युती तुटल्याने १५ जागा जिंकलो होतो. पण आता युती झाली आहे त्यामुळे ३६-० अशी मॅच जिंकायची आहे असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त राजकीय नेतृत्त्व नसून कामाचे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे असं यावेळी त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनीही यावेळी मंगल प्रभात लोढा यांचं कौतूक करताना ते हाडाचे कार्यकर्ते आहेत. काम कोणतंही दिल तरी ते त्यात स्वतःला झोकून देतात. दिलेले काम अगदी व्यवस्थित करायचे हा मंगलजी यांचा स्वभाव आहे. बॅक ऑफिसप्रमाणे सायलेंटपणे काम करणं ही त्यांची खासियत आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.