पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील तसेच प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आंबोलीची ओळख सध्या गुन्हेगारी क्षेत्र म्हणून होऊ लागल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होऊ लागला आहे. विशेष म्हणजे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातच हा भाग येत असून, पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याची मागणी होत आहे. दक्षिण कोकणचे प्रसिद्ध थंड हवेचे स्थळ म्हणून आंबोली ओळखली जाते. जागतिक नकाशावर पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणूनही आंबोलीची स्वतंत्र ओळख आहे. आंबोलीचा पावसाळा व धबधबा अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. आंबोली, चौकूळ व गेळे या तिन्ही गावांना पर्यटनदृष्टय़ा निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेले आहे. आंबोली हिरण्यकेशी तीर्थस्थान प्रसिद्ध असून ही नदी पूर्व दिशेने वाहत कर्नाटक राज्यात जाते. या ठिकाणी ४०० प्रकारच्या औषधी वनस्पती, पशुपक्षी, दुर्मीळ साप व बेडूक सापडतात. जंगल पर्यटनासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येतात. तसेच महादेव गड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, शिरगांवकर पॉइंट अशी पर्यटकांची गर्दी होणारी स्थळेदेखील आहेत. मृतदेह सापडल्याने चिंता गेल्या काही वर्षांत आंबोलीत पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अचंबित करून टाकणारा निसर्गसौंदर्य आंबोलीला मिळाल्याने येथे देशभरातील पर्यटक येतात. गेल्या काही दिवसांत आंबोलीत परप्रांतीय किंवा परजिल्ह्य़ातील मृतदेहांचे डिम्पग ग्राऊंड (मृत्यूचे ठिकाण) म्हणून चर्चा सुरू झाल्याने पर्यटनावर परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. आंबोली घाट, कावळेसाद गेळे व महादेवगड पॉइंट अशा ठिकाणी बाहेरून आणून मृतदेह टाकण्यात येत असल्याचे ऐकिवात होते. परंतु त्याचे रहस्य उजेडास येत नव्हते पण गेल्या काही दिवसांत कावळेसाद व महादेवगड पॉइंटवर मानवी सांगाडे किंवा मृतदेह मिळाले त्यावरून हे स्थळ बदनाम होऊ लागले आहे. यंदाच्या पावसाळ्यात धुक्याच्या दाट लहरीत गडिहग्लजच्या दोन तरुणांनी मद्य प्राशन करून सेल्फी काढण्याच्या नादात कावळेसाद येथे कडेलोट केला. त्यांचे मृतदेह खोल दरीत मिळाले. त्यानंतर पंजाबच्या तरुणाने आंबोलीत गळफास लावून घेण्याचा प्रकार घडला. हल्लीच सांगलीच्या पोलिसांनी पोलीस कोठडीतील संशयिताचा खून करून आंबोली महादेवगड पॉइंट येथे मृतदेह जाळण्याचे प्रकरण राज्यभर गाजले. त्यानंतर कावळेसाद पॉइंट येथे चेहरा विद्रूप केलेला एक अनोळखी मृतदेह मिळाला. काल गुरुवारी एका तरुण प्रेमीयुगुलाचे सांगाडेही सापडले. ते महिन्याभरापूर्वीचे असावेत असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस ठाणे आवश्यक ’सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आंबोली दूरक्षेत्र कार्यान्वित आहे. कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या आंबोलीतून गोवा, पुणे, बेंगलोर, मुंबई असा प्रवास करणारा मार्ग आहे. येथे पोलीस दूरक्षेत्र असल्याने एक मोटरसायकल व सहा पोलीस कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आंबोली, चौकूळ व गेळे या घाटमाथ्यावरील तीन गावांसह तळकोकणातील मिळून दहा गावांचे कार्यक्षेत्र आहे. येथे तपासणी नाकाही आहे. मात्र कॅमेरे किंवा फोन अधूनमधून बंदच असतात. आंबोलीच्या कार्यक्षेत्रात येणारी गावे आणि त्या गावातील कामकाज पाहता पोलीस बळ कमी आहे. सावंतवाडी पोलीस ठाणे २५ किमी दूर असून आंबोली घाट १९ किमी अंतराचा आहे. अवघ्या सहा पोलिसांच्या जिवावर आंतरराज्य सीमा धोक्याची बनली आहे. त्यामुळे आंबोलीला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा मिळायला हवा अशी मागणी आहे. आंबोलीच्या पर्यटनात वाढ होत असतानाच परप्रांतीय किंवा परजिल्हय़ातील मृतदेह आंबोलीत आणून टाकण्याचे प्रकार रोखायचे असतील तर पर्यटनासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाल्यास या ठिकाणी पोलीस बळ आणि यंत्रणा वाढेल. त्यामुळे गुन्हेगारी उजेडात येऊ शकते. सांगलीच्या पोलिसांनी मृतदेह महादेवगड पॉइंट येथे जाळणे किंवा कावळेसाद पॉइंट येथे अनेक मृतदेह मिळणे हे दुर्दैवी आहे. याकडे गृहखात्याने लक्ष देण्याची गरज आहे. कावळेसाद व महादेवगड पॉइंट यांच्यासह अनेक पर्यटनाचे पॉइंट वनखात्याच्या अखत्यारीत येतात. वनखात्याने स्वतंत्र गस्तीपथक नेमण्याची गरज तसेच सायंकाळी ६ वाजल्यानंतर गेट बंद करून गस्त घातल्यास गुन्हेगारीला आवर बसू शकतो. पोलीस आणि वनखात्याने मिळून स्वतंत्र गस्तीपथकेदेखील आंबोलीत पर्यटनाच्या सुरक्षेसाठी नेमावीत तसेच दूरक्षेत्र व गेळे फाटा येथे कायमस्वरूपी तपासणी नाके निर्माण करावीत आणि थंडी व धुक्याला तोंड देणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी आंबोलीवासीयांची आहे.