नागपुरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतही याचे पडसाद उमटले. मात्र या सुटीविषयी काहीही मत व्यक्त न करता, एकूणच देशाच्या प्रगतीसाठी शासकीय सुटय़ाच कमी केल्या पाहिजेत, असे मत संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी जोशी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘गोवा सरकारने महात्मा गांधंींच्या जयंती दिनाची सुटी रद्द केली असली तरी त्याबाबत माहिती घ्यावी लागेल. मात्र, आपल्याकडे ३६५ दिवसांपैकी १५० ते १५५ दिवस सुटय़ाच असतात. या सुटय़ांमध्ये लोक काय करतात, हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे या शासकीय सुटय़ा कमी करून परिश्रम केले तर देशाचा विकास होईल.’जास्तीत जास्त तरुणांना संधी द्यावी, अशी संघाची भूमिका आहे आणि ती राहणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींनी नव्या पिढीसाठी जागा उपलब्ध करून देताना त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले पाहिजे. मात्र असे असले तरी वयापेक्षा या सर्व बाबी मनाशी जुळलेल्या असतात, असेही जोशी म्हणाले. साडेसहा लाख गावांचे लक्ष्यआतापर्यंत संघाचे कार्य ५४ हजार गावांपर्यंत पोहोचले असून येत्या तीन वर्षांत साडेसहा लाख गावांपर्यंत जाण्याचे संघाचे लक्ष्य आहे. देशभरातील संघाच्या विविध कार्यक्रमांतून अनुसूचित जातीचे लोक सहभागी झाले आहेत. हिंदुत्वाचे विचार स्वीकारण्याची त्यांची मानसिकता दिसते, असे ते म्हणाले. गेल्या ३ वर्षांत साडेपाच हजार गावांत संघकार्य पोहोचले असून १० हजारांवर केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, असेही जोशी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत ऑनलाइन माध्यमातून तरुण पिढी मोठय़ा प्रमाणात संघाशी जुळली. दर महिन्याला तीन हजार नवीन चेहरे संघाशी जुळत आहेत. या प्रतिनिधी सभेत स्वयंसेवकांच्या कार्याची समीक्षा केली जात नसून ते समजून घेतले जात असल्याचे भय्याजी म्हणाले.छपाईची चूक२ ऑक्टोबरची गांधी जयंतीची सुटी रद्द केलेली नाही. शासकीय यादी छापताना झालेली ही चूक आहे, असा खुलासा गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला आहे.