”देवेंद्र फडणवीस व नाथाभाऊ एकेकाळी खास मित्र होते. दोघंजण विधानसभेत एकत्रं बसून, खडसे आता ज्या पक्षात चालले त्यांचं सरकार असताना, त्यांना धारेवर धरायचे. राज्यातील अनेक प्रश्न या दोघांनी विधानसभेत मांडले आहेत. आमच्यात बिनसलं नाही, बिनसवणारे दुसरेच आहेत. आमच्यात काही गैरसमज नव्हते. काही बातम्यांमुळे, आरोप-प्रत्यारोपांमुळे अशा घटना घडल्या. परंतु नाथाभाऊ यांनी जायला नको होतं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.” असं केंद्रीयमंत्री व भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आता राष्ट्रवादी काँग्रेममध्ये प्रवेश करणार आहेत. तर, आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं खडसे म्हणाले आहेत. यावरून खडसे व फडणवीस यांच्यातील मतभेद किती टोकापर्यंत पोहचले होते हे जरी दिसत असलं, तरी, एकेकाळी हे दोन्ही नेते खास मित्रं होते असं रावसाहेब दानवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

आणखी वाचा- ‘त्या’ वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

यावेळी दानवे म्हणाले, ”फडणवीस यांच्या स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. ते राज्याचे प्रमुख राहिलेले आहेत. तसेच, खडेंच्या स्वभावाबद्दलही सर्वांना माहिती आहे. खडसेंच्या पोटात जे असेल तसं ते बोलून दाखवतात. पण आमच्यात मनभेद नव्हते. मतभेद असू शकतात. एकाच राजकीय पक्षात काम करताना एखाद्या विषयावर मतभेद असणं, हे काही नवीन नाही. परंतु, आता अलिकडच्या काळात समोरच्या पक्षानं त्यांना काही ऑफर दिली असेल व ते जर तिकडं गेले असतील, तर तो त्यांचा राजकीय निर्णय असू शकतो.” तसेच, राजकारणात अशा घटना घडत असतात, असं दानवे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “दोर तुटला नाही, अस वाटलं होतं पण…” खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

दरम्यान, भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर फडणवीस यांच्यावरील नाराजी व्यक्त करताना खडसे म्हणाले की, “देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली… त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”. तसेच, फक्त फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडत असल्याचंही खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.