किल्ले प्रतापगडावर सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने मागील अठरा वर्षांपासून शिवप्रताप दिन साजरा करण्यात येतो. परंतु किल्ल्यावर अफजल खानाचा वध झाला ती शिवप्रतापाची बंदिस्त जागा खुली करण्याची मागणी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली. स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी करून हिंदवी स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी परतवून लावले. हा दिवस आपण शिवप्रतापदिन म्हणून अभिमानाने साजरा करतो. अफजलखानाचा वध हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रताप आहे. या शिवप्रतापामुळे युवकांच्यामध्ये, समाजामध्ये राष्ट्रीय विचार व दहशतवाद विरोधामध्ये लढण्याची प्रेरणा मिळते. परंतु हा परिसर बंदिस्त असल्यामुळे अफजलखान वधाची जागा, अफजल खानाची व सय्यद बंडाची कबर, शिवाजी महाराजांचा प्रताप शिवभक्तांना, युवकांना, नागरिकांना, राज्यातील व परदेशातील पर्यटकांना पाहता येत नाही. हा प्रताप पाहून समाजामध्ये युवकांमध्ये दहशतवादाविरोधात लढण्याची प्रेरणा निर्माण होते, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची हुशारीची व युद्धनीतीचीही जाणीव होते. त्यामुळे वधाच्या ठिकाणाचा व कबरीचा परिसर तातडीने सर्वांना पाहण्यासाठी खुला करावा. वध केल्यानंतर मृत्यूनंतर वैर संपते या भावनेतून अफजल खान व सय्यद बंडाची बांधलेली कबर सर्वांना पाहण्यासाठी खुली केल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत नाही, असेही शिंदे म्हणाले. शिवप्रताप भूमीवर जाण्यास सध्या मज्जाव प्रतापगडाच्या पायथ्याशी सुरु झालेले उदात्तीकरण शासनाने लक्ष घालून थांबवावे. या मागणीसाठी शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्यावतीने मोठे शिवभक्तांचे आंदोलन उभे केले जाईल असेही शिंदे यांनी सांगितले