अशोक तुपे

टाळेबंदीच्या काळात पतसंस्थेमध्ये पाच हजार कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. एका बाजूला ठेवी वाढत असतांना दुसरीकडे चांगले कर्जदार मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता परप्रांतीय वित्तसंस्थेची मक्तेदारी मोडीत काढून सोनेतारण कर्ज वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

राज्यात १६ हजार नागरी पतसंस्था असून त्यांच्यामध्ये सुमारे एक लाख रुपयांच्या ठेवी आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्या काळात पतसंस्थानी ग्राहकांना घरी जाऊन सेवा दिली. लग्न, वाढदिवस, पर्यटन, जीवनशैलीकरिता केला जाणार खर्च वाचला. तर काहींचा तो कमी झाला. या काळात सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या.  त्याचबरोबर  कर्जवितरण ही एक मोठी समस्या बनली आहे. अनेक व्यवसाय एक तर बंद पडले किंवा मंदीचा त्यांना फटका बसला. त्यामुळे चांगले कर्जदार ही एक नवी समस्या उभी ठाकली आहे.

सोनेतारण कर्ज वाटपावर लक्ष

पतसंस्था पूर्वी स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज देत असत.पण बांधकाम व्यवसायात मंदी आली आहे. अनेक विकासक अडचणीत आले असून पूर्वी दिलेल्या कर्जाची वसुली करतांना अडचणी येत आहेत. वाहन खरेदी कमी झाली आहे. बांधकाम व्यवसायाकरीता यंत्रसामग्री लागत असे पण आता त्याची खरेदी थांबली आहे. हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे कर्ज वाटपाकरीता चांगले कर्जदार मिळत नाहीत. त्यामुळे आता सोनेतारण कर्ज वाटपावर पतसंस्थानी लक्ष केंद्रीत केले आहे.

राज्यात  दोन खासगी परप्रांतीय वित्तसंस्थांनी सोनेतारण कर्जात आघाडी घेतली आहे.  अत्यंत सुरक्षित असलेल्या कर्ज वितरणात या दोन संस्था आहेत. आता सोन्याच्या किंमती वाढत आहेत. आपल्याकडे अनेक जण हे सोन्यात गुंतवणूक करतात. अडचणीत सोने हे कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडते. खरीप व रब्बी हंगामात पेरणीच्या वेळी शेतकरी सोने तारण ठेवून कर्ज काढतात. हा कर्जदार अत्यंत सुरक्षित आहेत.

सोने तारण कर्ज वितरण करण्यासाठी पतसंस्थांकडे आवश्यक यंत्रणा नव्हती. तसेच पतसंस्थामध्ये सोने तारण कर्ज सुविधा उपलब्ध असल्याची ग्राहकांना माहिती नव्हती. पण आता या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. पतसंस्था फेडरेशनने त्याकरीता अनेक उपाययोजना केल्या आहेत. जाहिराती मोठय़ा प्रमाणात केल्या जात आहेत. पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे म्हणाले की, सहकारावर राज्यातील गुंतवणूकदारांचा विश्वास आहे.त्यामुळे जिल्हा सहकारी बँका, नागरी बँका व पतसंस्थामधील ठेवी वाढत आहे. मात्र ठेवी वाढल्या तरी चांगले कर्जदार हे सोने तारण कर्जात उपलब्ध होतात. हे कर्ज पूर्ण सुरक्षित आहे. त्याकरिता पतसंस्थानी स्ट्रॉंगरूम तयार केल्या आहेत. पूर्वी गोल्डव्हॅल्यूअर हे सोन्याच्या व्यापाऱ्यांना नेमले जात असे. त्यांच्यापैकी काहींनी गैरप्रकार केले. आता त्यांच्याकडून बँकगॅरंटी घेतली जाते. पण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. फेडरेशनने आतापर्यंत २०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने तारण कर्ज त्याच्या घराजवळ असलेल्या संस्थेत उपलब्ध होऊ शकेल असे ते म्हणाले.

नागेबाबा मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे म्हणाले, टाळेबंदीच्या काळात ठेवीत २० कोटींनी वाढ झाली. लोकांची बचत हे ठेवी वाढण्याचे एक कारण असले तरी टाळेबंदीच्या काळात पतसंस्थानी लोकांना घरी जाऊन पैसे दिले. वेळेचे बंधन पाळले नाही. आजारी लोकांना तर रुग्णालयात पैसे दिले. त्यामुळे आता जेष्ठ नागरिक व ग्राहक पतसंस्थेत नव्याने खाते उघडून ठेवी ठेवत आहे. त्यांच्या ठेवी वाढत असल्याने चांगले कर्जदार शोधावे लागेल. असे ते म्हणाले. तर मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सोनेतारण हा चांगल्या कर्जाचा पर्याय असल्याचे सांगितले.

राज्यात सोनेतारण कर्जवितरणात  २५ हजार कोटीचे सोनेतारण कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. समता पतसंस्थेने ३६ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. फेडरेशनने २०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्याकरिता संस्था जाहिराती करत आहे. पतसंस्थाचा सोनेतारण कर्जाचा व्याजदर हा साडेआठ टक्के वर्षांला आहे. त्यात छुपे खर्च नाहीत. पण काही खाजगी वित्तसंस्थां या छुप्या पध्दतीने सोळा टक्केपर्यंत व्याजदर आकारतात. पूर्वी पर्याय उपलब्ध नव्हता. आता पातसंस्थामुळे ग्राहकांना रास्त दरात कर्ज उपलब्ध झाले असून त्यास प्रतिसाद मिळत आहे.

– ओमप्रकाश उर्फ काका कोयटे, अध्यक्ष ,पतसंस्था फेडरेशन