“करोना प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. “पोलिस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा,” असंही त्यांनी नमूद केलं आहे.

“प्रवासबंदी असताना काही जणांनी दूधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बाब चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेनं करोनाचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं, पोलिसांना सहकार्य करावं,” असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

आणखी वाचा- जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे नियोजन करा; उपमुख्यमंत्र्यांची स्थानिक स्वराज संस्थांना सूचना

लष्कराच्या मदतीची वेळ येऊ नये
लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे. “राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन, संचारबंदी असली तरी, दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅसचा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे,” अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.