लॉकडाउन आठ महिन्यानंतर आज सकाळी महालक्ष्मी मंदिरात भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले असल्याचे चित्र दिसून आले. करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरे शासन निर्णयानुसार आज सकाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी देवदर्शनाची ओढ लागल्याने सकाळपासूनच भाविकांची पावले मंदिराकडे वळली.

अल्पावधीतच भाविकांची गर्दी वाढत गेली. पहाटेच मंदिरातनिर्जंतुकीकरण,स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमावलीचे काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीत हजारो भाविक येण्याची शक्यता असली तरी दररोज दोन ते तीन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार असून पाच फुटांचे सामाजिक अंतर ठेवले जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय देवस्थान समिती अंतर्गत ३०४२ मंदिरात सुद्धा भाविकांना दर्शनाची सोय केली असल्याचेही त्यांनी सांगितले.