जिल्ह्यात लाचखोरीने कळस गाठला असून शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. अस्मानी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्याची शासकीय पातळीवर सुरू असलेली पिळवणूक या निमित्ताने समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महावितरणचा सहाय्यक अभियंता सुधीर बुरनापल्ले, वरिष्ठ तंत्रज्ञ सरदार खान पठाण व खासगी इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग जाधव या तिघांना अटक करण्यात आली आहे. शेतातील रोहित्र दुरुस्त करून बसविण्यासाठी या तिघांनी पीडित शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केली होती.

तुळजापूर तालुक्यातील होर्टी गावात एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात विंधन विहीर होती. मात्र, ते रोहित्र नादुरुस्त असल्याने मागील सहा महिन्यांपासून विंधन विहीर बंद होती. यामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होत होते, त्यामुळे रोहित्र दुरुस्त करणे गरजेचे होते. मात्र, ते दुरुस्त करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर या मागणीला वैतागून शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि १ लाख रुपयांचा पहिला हप्ता या तीघांना देण्याचा दिखावा रचण्यात आला. लाचेची हा हप्ता मुरूम मोड येथे स्विकारताना पोलिसांनी या तिघांना रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.